खलिस्तानींचा हिंदूद्वेष

    27-Nov-2023
Total Views | 99
Editorial on Khalistanis creating ruckus outside Lakshmi Narayan Temple

कॅनडातील खलिस्तान्यांनी आता हिंदू मंदिरांचा वापर भारतविरोधी घोषणा देण्यासाठी करण्याचे तंत्र अवलंबलेले दिसते. तथापि, हिंदूंनी खलिस्तान्यांना ‘वंदे मातरम्’चा जयघोष करत चोख प्रत्युत्तरही दिले. त्यामुळे भारतद्वेष्ट्या आणि आता हिंदूंच्या जीवावरही उठलेल्या खलिस्तानी दहशतवादाला मुळापासून उखडून टाकण्याशिवाय पर्याय हा नाहीच!
 
रविवारी कॅनडातील सरे येथील लक्ष्मी नारायण मंदिराबाहेर खलिस्तानी समर्थकांनी हिंदू भाविकांचा अनादर केला. त्यानंतर हिंदूंनी शांततापूर्ण मार्गाने त्यांना प्रत्युत्तरही दिले. खलिस्तान्यांना प्रत्युत्तर म्हणून भगवे झेंडे फडकावण्यात आले; तसेच ‘वंदे मातरम्’चा जयघोष करण्यात आला. खलिस्तान्यांविरोधात जोरदार नारेबाजीही केली गेली. पोलिसांनी काही खलिस्तान्यांना ताब्यात घेतले असले, तरी मंदिराची तसेच भाविकांची सुरक्षा यानिमित्ताने धोक्यात आली असल्याचे मंदिर प्रशासनाने म्हटले आहे. पोलिसांसमोरच एका खलिस्तान्याने हिंदूला मारहाण केली, ही गंभीर बाब. त्यांच्याविरोधात मंदिर प्रशासनाने वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, कॅनडा सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

सरे येथे हा प्रकार घडण्यापूर्वी एक दिवस आधी मिसिसागा येथील कालीबारी मंदिराबाहेरही खलिस्तान्यांनी अशीच निदर्शनबाजी केली. एक डझनाहूनही अधिक खलिस्तानी समर्थकांनी खलिस्तानी झेंडा फडकवत भारतविरोधी घोषणा दिल्या. निज्जरला न्याय मिळावा, अशी त्यांची मागणी. खलिस्तान्यांनी सप्टेंबर महिन्यातही सरे येथील श्री माता भामेश्वरी दुर्गा देवी सोसायटीची तोडफोड केली होती. तसेच फेब्रुवारीत मिसिसागा येथील श्रीराम मंदिराची भारतविरोधी भित्तीचित्रे लावून विटंबना करण्याचा प्रयत्न केला होता. खलिस्तानी प्रवृत्तींनी कॅनडात अनेकदा हिंदू मंदिरांची विटंबना करण्याचे प्रकार केले आहेत आणि चिंताजनक बाब म्हणजे, हे प्रकार थांबवण्यात कॅनडा सरकार अपयशीच ठरले आहे.

कॅनडा सरकार कशाप्रकारे खलिस्तान्यांना पाठीशी घालते, याची ही काही उदाहरणे. तेथील खलिस्तान्यांचा हिंदूद्वेष का पराकोटीला पोहोचला आहे. त्याचवेळी ‘खलिस्तान’च्या मागणीसाठी हिंदू मंदिरांचा उपयोग करून घेण्याचे तंत्र त्यांनी अवलंबले आहे. या सर्व घटनांवरून कॅनडा उच्चालयातील अधिकारी तसेच तेथील हिंदू हे सुरक्षित नाहीत, हेच अधोरेखित होते. निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी तेथील संसदेत भारतावर त्याचा ठपका ठेवला. भारताने संतप्त प्रतिक्रिया देत, या हत्येत आपला कोणताही सहभाग नसल्याचे स्पष्ट शब्दांत कॅनडाला सांगत, या प्रकरणाचे पुरावे मागितले. भारतीय उच्चाधिकार्‍याला परत पाठवले म्हणून भारतानेही कॅनडाला ४१ उच्चाधिकार्‍यांना भारतातून परत बोलावून घेण्यास सांगितले. कॅनडाने अमेरिकेसह अन्य राष्ट्रांच्या मदतीने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकाही देशाने भारतावरील आरोपाचे समर्थन केले नाही. त्याचवेळी कॅनडाने एकही पुरावा भारताला देण्यात यश आलेले नाही.

कॅनडातील खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारताचा कोणताही सहभाग नसतानाही, कॅनडाने भारतावर केलेले दोषारोपण हे सर्वस्वी अयोग्यच. त्याचवेळी या प्रकरणाचा तपास पूर्ण होण्यापूर्वीच भारताला दोषी ठरवण्यात आले, असे भारतीय उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांनी म्हणत, कॅनडाच्या भूमिकेवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भारताने निज्जरला २०२० मध्ये ‘दहशतवादी’ म्हणून घोषित केले होते. मात्र, कॅनडाने त्याच्याविरोधात कोणतीही कारवाई केली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. हेच कायद्याचे राज्य आहे का? असाही प्रश्न त्यांनी कॅनडाला उद्देशून उपस्थित केला. त्यामुळे कॅनडाने केलेल्या आरोपानंतर भारत-कॅनडा संबंधांत कमालीचे वितुष्ट आले आहे.

कॅनडामध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांना राजरोसपणे आजही आश्रय मिळतो. अनेक दहशतवादी हल्ल्यांसाठी खलिस्तानी जबाबदार आहेत. मात्र, कॅनडा सरकार त्यांना सर्रास पाठबळ देते. भारतीय वाणिज्य दूतावासाला ‘लॉकडाऊन’ करण्याचा इशारा याच खलिस्तान्यांनी दिला होता. कॅनडा सरकारला या सर्व घटकांविरोधात पुरेसे पुरावे भारताने वेळोवेळी दिले आहेत. मात्र, खलिस्तान्यांविरोधात कारवाई करण्याचे नैतिक धैर्य कॅनडा आणि तेथील दुबळ्या ट्रुडो यांचे सरकार दाखवू शकलेले नाही. कारण, शीख समुदाय तेथे मोठ्या संख्येने असल्यामुळे त्यांची शेवटी ती राजकीय हतबलता आहे. पण, हीच हतबलता आता हिंदूंच्या जीवावर उठली आहे.

खलिस्तान्यांना बळ न देता, त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करावी, ही भारताची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी. कॅनडातील हिंदूंनाही धमकावण्याचे प्रकार अलीकडे वाढलेले दिसतात. हिंदूंनी कॅनडा सोडून मायदेशी परत जावे, अशा आशयाच्या धमक्या त्यांना दिल्या जातात आणि कॅनडा सरकार त्याविरोधात कोणतीही ठोस भूमिका घेत नाही. हिंदू तेथे असुरक्षित आहेत, याच्याशी मुळी कॅनडाला देणेघेणेच नाही. मात्र, एक खलिस्तानी दहशतवादी गोळीबारात ठार झाला, म्हणून त्याच्या हत्येबद्दल थेट भारताला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याची तत्परता दाखवणारा असा हा देश. खरं तर स्वातंत्र्य आणि समानतेचे नारे देणार्‍या याच देशातील हा सगळा विरोधाभासच सर्व काही सांगून जातो.

अन्य एक खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंतसिंह पन्नू याने ‘एअर इंडिया’चे विमान उडविण्याची धमकी दिली असल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून दिल्ली तसेच पंजाब विमानतळावर प्रवाशांची कसून चौकशी करण्यात येत आहे. पन्नू हा ‘सीख्ज फॉर जस्टिस’ या दहशतवादी संघटनेचा संस्थापक म्होरक्या. उत्तर अमेरिकेत स्थायिक झालेला पन्नू पाकिस्तानी ‘आयएसआय’च्या मदतीने भारतविरोधी प्रचार करतो. कॅनडा, अमेरिका तसेच इंग्लंड येथे खलिस्तानचा प्रचार करण्याचे काम पन्नू करतो. मध्यंतरी तर त्याच्या हत्येचा कट भारताने रचला आणि अमेरिकेने तो उधळून लावला, अशा आशयाच्या बातम्याही पसरल्या. म्हणजे हजारो हिंदूंपेक्षा कोण कुठचा खलिस्तानी पन्नू हा या पाश्चात्त्य देशांना बिचारा नागरिक वगैरे वाटावा, हेच मुळी अनाकलनीय!

हिंदू मंदिरांची सुरक्षितता खलिस्तान्यांनी धोक्यात आणूनही कॅनडा सरकार त्यांच्याविरोधात काहीही कारवाई करण्यास असमर्थ असेल, तर मग भारत-कॅनडा संबंध पूर्ववत होणे कठीणच. म्हणूनच कॅनडाने ही खलिस्तान्यांची कीड वेळेवर ठेचावी, हीच अपेक्षा; अन्यथा ‘अज्ञात’ शक्तींतर्फे कॅनडातील अन्य खलिस्तानी दहशतवाद्यांचाही ‘निज्जर’ झाल्याशिवाय राहणार नाही!

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121