प्रदुषणाविरोधात सहा वर्षांत काय केले? सर्वोच्च न्यायालयाचा केजरीवाल सरकारला सवाल!
10-Nov-2023
Total Views | 42
नवी दिल्ली :दिल्ली सरकारने वायु प्रदूषणाविरोधात सहा वर्षांत काय केले, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल सरकारला शुक्रवारी केला आहे.देशाची राजधानी दिल्लीमधील वायु प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाला असून त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायालयात दिल्ली सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल केले. यावेळी दिल्लीमध्ये गुरुवारी मध्यरात्री व शुक्रवारी झालेल्या पावसामुळे वायु प्रदूषणात घट झाली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून लागू होणारी सम – विषम वाहनव्यवस्था तूर्तास स्थगित करण्यात आल्याची माहिती दिल्ली सरकारतर्फे न्यायालयास देण्यात आली आहे.
दिल्ली सरकारच्या प्रतिज्ञापत्राविषयी सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरवर्षी न्यायालयाने ताशेरे ओढल्यावरच दिल्लीच्या वायु प्रदूषणाविरोधात दिल्ली सरकारतर्फे कार्यवाही करण्यात येते. मात्र, गेल्या सहा वर्षात या समस्येवर नेमकी काय उपाययोजना केली, हे दिल्ली सरकारने सांगावे असे न्यायालयाने म्हटले आहे. त्याचप्रमाणे दिल्लीकरांची प्रार्थना ऐकून देवाने गुरुवारी रात्री पाऊस पाडला आणि त्यामुळे प्रदूषणाच्या पातळीत घट झाली. सरकारकडून काहीही साध्य होणार नाही, असे वाटल्यानेच पाऊस पाडला, अशीही गंभीर टिप्पणी न्यायालयाने केली आहे.त्याचप्रमाणे, पराली जाळणाऱ्या शेतकऱ्याविरोधात गुन्हे दाखल करून समस्या सुटणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. पंजाब सरकारने राज्यातील शेतकरी संघटनांशी चर्चा करून या मुद्द्यावर उपाय काढावा, असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत.