‘रोबोटिक्स’ हे अतिशय वेगाने विकसित होणारे तंत्रज्ञान. केवळ पाश्चिमात्त्य देशांतच नाही, तर भारतातही ‘रोबोटिक्स’ आणि ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आधारित तंत्रज्ञानाला गतिमानता प्राप्त झालेली दिसते. मोठमोठ्या कंपन्यांसह अनेक स्टार्टअप्सही ‘रोबोटिक्स’च्या या विश्वात आपले नजीब आजमावत आहेत. नुकतेच केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी रोबोटिक्स क्षेत्राशी संबंधित राष्ट्रीय धोरण नागरिकांच्या अभिप्रायासाठी खुले केले आहे. भारत सरकारच्या या ‘मिशन रोबोटिक्स’निमित्ताने या तंत्रज्ञानाचा, त्याच्या उपयुक्ततेचा आढावा घेणारा हा लेख...
‘रोबोटिक्स’ तंत्रज्ञान देशांतर्गत विकसित करण्यासाठी, त्याला सर्वस्वी प्रोत्साहन देण्यासाठी आता भारतानेही कंबर कसली आहे. त्याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे, तांत्रिक प्रगतीला ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ची झळाळी देणे, ही आता काळाची गरज. जगातील ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा वाढलेला प्रभाव लक्षात घेता, मानवाला अशक्यप्राय वाटणारी कामे ‘रोबोटिक्स’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सहज शक्य होणार आहेत. असे हे मानवाचे आयुष्य सुकर करणारे ‘रोबोटिक्स’तंत्रज्ञान 19व्या शतकाच्या अखेरीस पूर्णपणे विकसित होण्यास प्रारंभ झाला. संगणकशास्त्र, इंजिनिअरिंग व मेकॅनिकल प्रक्रियांच्या वस्तुनिष्ठ अभ्यासातूनच ‘रोबोटिक्स’ तंत्रज्ञान विकसित होत गेले. त्याला आता ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ची जोड मिळाली आहे. मुख्यतः वैद्यकीय, मूलभूत सोयीसुविधा, इलेक्ट्रॉनिक, टेलिकम्युनिकेशन, टेक्नोलॉजी, बायोमेडिकल, आयटी अशा अनेक क्षेत्रांत ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.
मानवाचा मेंदू ज्याप्रकारे इंद्रियांना आज्ञा देतो व त्याचे पालन शरीरातील इतर अवयवांकडून केले जाते, त्याच संकल्पनेवर ‘रोबोटिक्स’चा उदय झाला. 1948 साली नोरबर्ट विनेर यांनी ‘सायबरनेटिक’ची संकल्पना आणल्यामुळे ‘रोबोटिक्स’ म्हणजे नेमके काय, हे शास्त्रज्ञांना ठाऊक झाले. कालांतराने या तंत्रज्ञानात प्रगती होत पूर्ण स्वयंचलित अत्याधुनिक ‘रोबोटिक्स’ तंत्रज्ञान 20व्या शतकात विकसित झाले आणि आजही हे तंत्रज्ञान जलद गतीने विकसित होताना दिसते.काळाची पावले ओळखून केंद्र सरकारनेही भारताला ‘रोबोटिक्स हब’ बनवण्यासाठी व्यापक स्तरावर प्रयत्न आरंभिले आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे, त्या तंत्रज्ञानाचा वापर भारताला अत्याधुनिक वस्तू, सेवा व औद्योगिक क्षेत्रातील विकासासाठी होऊ शकतो. याविषयी नुकतेच बोलताना केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ‘रोबोटिक्स’ धोरणावर राष्ट्रीय रणनीती आखणार असल्याचे स्पष्ट केले. याचा सर्वाधिक लाभ उत्पादन क्षेत्र व ‘सायबर फिजिकल सिस्टीम’साठी होणार आहे. त्यामुळे सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेलाही बळकटी मिळणार आहे.
त्याचबरोबर ‘स्टार्टअप इंडिया मिशन’लादेखील भरारी मिळणार असून, या क्षेत्रातील गुंतवणुकीला अनुकूल वातावरण देशात निर्माण होईल, असा कयास आहे.याच कारणास्तव सरकारने एक ’माय गव्हर्न्मेंट प्लॅटफॉर्म’ नावाचे पोर्टलदेखील सुरू केले असून, या विषयातील जाणकार, तज्ज्ञ यांना, रोबोटिक्स राष्ट्रीय धोरणाविषयी आपला अभिप्राय मंगळवार, दि. 31 ऑक्टोबरपर्यंत नोंदवता येणार आहे. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा बहुदा सगळ्याच क्षेत्रात वापर सुरू झाला असताना, ‘रोबोटिक्स’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मोठ्या पायाभूत सुविधांचीस उभारण करणे, सरकारला शक्य होणार आहे. खासगी व शासकीय अशा दोन्ही क्षेत्रात याचा वापर केल्यास, वेळेची बचत होतानाच संसाधनांचा अपव्ययदेखील कमी होईल. म्हणूनच ‘नॅशनल रोबोटिक्स मिशन’अंतर्गत ‘रोबोटिक्स इनोव्हेशन युनिट’ (आरआरयु)ची निर्मिती होणार असल्याचे समजते.
कृषी, आरोग्य, राष्ट्र सुरक्षा या क्षेत्रातही ‘रोबोटिक्स’ तंत्रज्ञानाचा मोठा वाटा असेल. ‘अॅप्लिकेशन बेस’ प्रणालीमुळे अशाप्रकारे विविध क्षेत्रातील गरजेनुरुप निराकरण या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन करणे सहज शक्य होईल. यासाठी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रोग्रामिंग’चा वापर करत प्रचंड वेगाने मोठी कामे पटकन करता येतील. अर्थातच, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ला पूर्णपणे समाजमान्यता मिळालेली नाही, हे वास्तवही इथे प्रकर्षाने अधोरेखित करावे लागेल. कारण, अनेक तज्ज्ञांनी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे रोजगार निर्मिती कमी होऊन बेरोजगारी वाढण्याचे संकट व्यक्त केले होते. याशिवाय ‘एआय’ने चुटकीसरशी काम केले तरी त्याची सांख्यिकी व संकलन केलेल्या माहितीतील मानवी मेंदूच्या तुलनेत अचूकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. परंतु, हेही तितकेच खरे की, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ने पूर्वी अशक्यप्राय समजल्या जाणार्या क्षेत्रांमध्येही आता शिरकाव केलेला दिसतो. ‘रोबोटिक्स’ तंत्रज्ञान ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ला जोडले गेल्यास, उत्पादनाचा वेग दुपटीने वाढून वेळेची मोठी बचत होईल.
या विषयातील जिज्ञासू व्यक्तींनी एकत्र येत 2011 मध्ये ‘द रोबोटिक्स सोसायटी’ या संस्थेची स्थापना केली. त्यामुळे खासगी-शासकीय क्षेत्राने एकत्र येत या विषयावर अभ्यास करून संयुक्त उपक्रम राबविल्यास उद्योजकांना त्याचा नक्कीच लाभ होईल. तसेच अनेक परिस्थितीजन्य घटकांचे उत्तर ‘रोबोटिक्स’ तंत्रज्ञानातून विकसित केल्यास येणार्या परिस्थितीचा अंदाज घेणे मानवी बुद्धीला शक्य होईल. याच अनुषंगाने नुकत्याच दाखल झालेल्या ‘नो कोड टेक्नोलॉजी’चा विचार करता येईल, ज्यामुळे मानवी मेंदूला किचकट वाटणारी कामे सहजसोप्या पद्धतीने या तंत्रज्ञानाद्वारे करता येतील.त्याचबरोबर भविष्यातही ‘मेटावर्स’चा वापर ही काळाची नांदी ठरणार आहे. त्यामुळे काळानुरूप ‘रोबोटिक्स’ तंत्रज्ञानाचा वापर ‘मेटावर्स’सारख्या नवीन दुनियेत करता येईल का, याची चाचपणी आगामी काळात होऊ शकते. अगदी कृषी क्षेत्रात हवामान चाचणी करत ‘एआय’च्या माध्यमातून पर्जन्यमानाचा अचूक अंदाज बांधून आवश्यक निर्णय घेणे, हे शेतकर्यांसाठी फायद्याचे ठरेल. शेतीसाठी आवश्यक त्या सगळ्या प्रक्रियांसाठी तांत्रिक पद्धतीचा अवलंबून केल्यास, अचूकतेने वेगवान कामे करता येतील. राष्ट्रीय सुरक्षेतही ‘रोबोटिक्स’ हेच भविष्य असेल.
‘रोबोटिक्स इंटेलिजन्स’चा वापर केल्याने संरक्षण क्षेत्रातही सैन्याला अनेक उपकरणे, शस्त्रास्त्रे विकसित करता येतील. अगदी बॉम्बशोधक पथकालाही ‘रोबोटिक्स’ तंत्रज्ञानाचा खूप फायदा होऊ शकतो. ‘रोबोटिक्स’चा विचार करतानाही विविध प्रकार त्यात मोडतात. जसे की, इंडस्ट्रीयल रोबोट, सर्व्हिस रोबोट, मेडिकल रोबोट, ह्युमनाईड रोबोट, कोबोट, एक्सप्लोरेशन व स्पेस रोबोट, डिफेन्स रोबोट, एज्युकेशनल रोबोट, एंटरटेनमेंट रोबोट. उपयुक्तता असली तरी रोबोटलाही शेवटी काही मर्यादा आहेत, हे नाकारता येणार नाही. स्वतःहून अगदी सखोल विश्लेषण करण्याची क्षमता रोबोटिक्सने पूर्णपणे अजून प्राप्त केलेली नाही. दिलेल्या कमांडचे शास्त्रशुद्ध आकलन करत रोबोट आपले उत्तर शोधण्यासाठी मदत करतो. यात सांख्यिकी व तर्कशुद्ध विचाराचे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ विकसित केल्याने चुका होण्याची शक्यता विरळ असते.पाश्चिमात्य देशांमधील उपकरणांवर अवलंबून न राहता, भारतात येणार्या काळात ‘रोबोटिक्स’ तंत्रज्ञानाची निर्यातदेखील करू शकतो. वैद्यकशास्त्रात ‘रोबोटिक्स’ आल्यास त्याची परिणती ‘एफडीआय’ (फॉरेन डायरेक्ट इनव्हेसमेंट) साठी होऊन जागतिक कंपन्या भारतात आल्यास अर्थव्यवस्थेला नक्कीच चालना मिळणार आहे.