ठाणे : राज्य सरकारने दिलेल्या ६०५ कोटी रुपयांच्या निधीतून ठाण्यात सुरू असलेली रस्त्यांची सर्व कामे कोणत्याही परिस्थितीत १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण झालीच पाहिजेत. रस्त्यांची जी कामे प्रलंबित राहतील त्याबद्दल जबाबदारी निश्चित केली जाईल, असे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रात रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी ६०५ कोटी रुपयांच्या निधीतून एकूण २८२ रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. त्यात, विविध ठिकाणी यूटीडब्ल्यूटी, सिमेंट काँक्रिटीकरण, मास्टिक पध्दतीने रस्त्यांची कामे केली जात आहेत. नागरिकांना चांगल्या प्रकारचे व खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करुन देण्यासाठी सुरू असलेली ही कामे ८० ते ९० टक्के पूर्ण झाली आहेत. पावसाळ्याच्या मोसमात, जुलै महिन्यापासून ही कामे थांबविण्यात आली होती. आता ती कामे पुन्हा सुरू झालेली आहेत. त्यापैकी, जी कामे अपूर्ण आहेत ती महिन्याभरात आणि जी कामे नव्याने सुरू करायची आहेत ती दोन महिन्यात पूर्ण करण्याचे बंधन सर्व कार्यकारी अभियंता यांच्यावर टाकण्यात आले आहे. त्याचबरोबर, पावसाळ्यापूर्वी सुरू किंवा पूर्ण करण्यात आलेल्या कामाच्या व्यतिरिक्त इतर काही रस्त्यांची पावसाळ्यात दुरुस्ती करावी लागली असेल तर अशा रस्त्यांची प्रभाग समितीनिहाय माहिती सादर करावी. त्यात, रस्त्यांची नावे, लांबी, मालकी, दोष दायित्व कालावधी आदींची माहिती द्यावी. त्यातून त्या रस्त्यांचे पुढील पावसाळ्यापूर्वी नियोजन करणे शक्य होईल, असेही स्पष्ट करून आयुक्त बांगर यांनी नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे बजावले.
प्रलंबित कामांची संयुक्तिक कारणे द्या
ठाण्यातील सर्व अपूर्ण व नवीन रस्त्यांच्या कामाची यादी करून त्यांची कालमर्यादा आखून घ्यावी. वर्षानुवर्षे या प्रकल्पातील कामे सुरू आहेत असे होता कामा नये. त्यात, प्रलंबित कामांसाठी, भूसंपादन करण्याचा विषय वगळता कोणताही अपवाद केला जाणार नाही. कार्यकारी अभियंत्यांनी पुढाकार घेऊन कामांना गती द्यावी. जिथे काही अडचणी येतील त्यावर पर्याय शोधावा. तरीही मार्ग निघाला नाही तर वरिष्ठांशी बोलून मार्ग काढावा. काही कामे शक्य नसतील तर त्याची सयुक्तिक कारणमीमांसा सादर करावी. तशा कामांबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेतला जाईल, असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले.