मध्य आशियाचे प्रवेशद्वार चाबहार

    20-Aug-2022
Total Views | 373

as 
 
 
 
आपल्या मुंबईत एक प्रसिद्ध स्मारक आहे, ‘गेटवे ऑफ इंडिया.’ ब्रिटिश सरकारची व्यावसायिक, म्हणजेच व्यापारिक पद्धतीने भारतात, मुंबईतून सुरुवात झाली आणि त्यांची प्रातिनिधिक शेवटची तुकडीदेखील 1947 साली या ‘दरवाजा’तूनच आपल्या मायदेशी परत गेली, असे समजले जाते. त्यामुळे या स्मारकाचे आपल्या इतिहासात एक महत्त्वाचे स्थान आहे. असेच एक आधुनिक इतिहासात महत्त्वाचे स्थळ आपल्या पश्चिमेकडील इराण या देशात आहे. त्याचे नाव चाबहार! याला कित्येक ठिकाणी ‘चाह बहार’ असे देखील म्हणतात. हे काय प्रकरण आहे, त्याचे आधुनिक इतिहासात भारतासाठी काय महत्त्व आहे, यासंबंधी आजच्या लेखातून आपण थोडी माहिती घेऊया!
 
 
इराणच्या आग्नेय दिशेला अगदी टोकाला हे एक नैसर्गिक बंदर आहे. याचे नाव म्हणजे दोन फारसी शब्दांचा संगम. ‘चाह’ म्हणजे क्रमांक चार, व ‘बहार’ म्हणजे वसंत ऋतू. असे म्हणतात. ऐतिहासिक काळी या शहराचे हवामान इतके उत्तम आणि आल्हाददायक होते की, वर्षभर चारही ऋतू हे वसंत ऋतू, म्हणजेच स्प्रिंग इतके उत्तम वाटत. म्हणून याचे नाव ‘चाहबहार’ असे ठेवले गेले. या भौगोलिक विभागाला पण याच नावाने ओळखले जाते.
 
 
इराणच्या दक्षिण पूर्वेस आणि पाकिस्तानच्या दक्षिण पश्चिमेस बलुचिस्तानचा वाळवंटी प्रदेश पसरलेला आहे. तो संपूर्ण प्रांत इराणी भागात ‘सिस्तान-बलॉचिस्तान’ अशा जोडनावाने ओळखला जातो. पाकिस्तानात अर्थातच त्यास ‘बलुचिस्तान’ म्हणतात. या प्रांतात अतिशय विरल वस्ती आहे आणि ती मुख्यतः सुन्नी बलोच टोळीवाल्यांची आहे. इथे एक खूप जुने बंदर होते त्याचे नाव ‘तिस’ किंवा ‘तिझ.’ हे बंदर अरबी समुद्राच्या किनार्‍यावर होते आणि तिथून मासेमारी, तसेच इतर माल आणि उतारू वाहतुकीची जहाजे पर्शियन आखात, तसेच ओमान, येमेन आणि भारताच्या पूर्व किनार्‍यावरील भडोच बंदराकडे प्रवास करीत. ही गोष्ट साधारण 2 हजार, 500 वर्षांपूर्वीची! अ‍ॅलेक्झांडरच्यास्वारीच्या परततेवेळी तो या बंदरावरून पुढे पर्शियन आखातात गेल्याचे उल्लेख आहेत.
 
 
पुढे इसवी सन 1000 मध्ये प्रसिद्ध अरबी प्रवासी अलबेरूनी हा इथे येऊन तिथून पुढे भारतात गेला. त्याने लिहून ठेवले आहे की, “ ‘तिस’ला पोहोचल्यावर इथे हिंदुस्थानला पोहोचण्याचे उद्दिष्ट साध्य झाल्यासारखेच होते, इतकी येथील प्रजा आणि परिस्थिती हिंदुस्थानसारखी होती.” म्हणजे भारतीय संस्कृतीचा प्रभाव इथपर्यंत निर्विघ्न पोहोचलेला होता! आजसुद्धा हे ‘तिस’ गाव अस्तित्वात आहे. येथून फक्त दोन किलोमीटरवर ‘बानमेसिती’ (बलुच भाषेत, सिद्ध पुरुषाचे मंदिर), नावाच्या काही गुंफा आहेत. त्यात देवळे आहेत व त्यावरचे गुजराती आणि देवनागरी लेखन अजूनसुद्धा वाचता येते! ती निश्चितच जुनी मंदिरे असली पाहिजेत! या जुन्या भारतीय संस्कृतीच्या खुणा अजून तेथे पाहायला मिळतात.
 
 

modi 
 
 
 
या तिस गावापासून दहा किलोमीटरवर आहे सध्याचे ‘चाबहार’ हे बंदर. या बंदराचा आधुनिक पद्धतीने संपूर्ण विकास भारताने इराणसाठी केला आहे. इथे प्रत्यक्षात दोन गोद्या बांधल्या आहेत. यांना दोन इराणी हुतात्म्यांची नावे दिली आहेत. एक ‘हुतात्मा बेहेश्ती’ हे बंदर आणि दुसरे ‘हुतात्मा कलन्तरी’ हे बंदर. हे बंदर खोल पाण्याजवळ असल्याने इथे उत्तम प्रकारे मोठी मालवाहू जहाजे धक्क्याला लागू शकतात. तसे पाहिले तर हे इराणचे एकमेव खोल पाण्यातील बंदर आहे. इराणचे दुसरे सुप्रसिद्ध बंदर म्हणजेच ‘बंदर अब्बास’, जे पर्शियन आखातात असल्याने तिथे पाणी फार खोल नाही.
 
 
ते बंदर सर्वस्वी तेलाच्या वाहतुकीसाठीच वापरले जाते. त्यामुळे आता इराणला आपल्या तेलाव्यतिरिक्त इतर सर्व मालाच्या आयात व निर्यातीसाठी हे चाबहार बंदर वापरायचे आहे. भारताने हा प्रकल्प इराणबरोबर केलेल्या एका करारानुसार 2016 साली सुरू केला. हा प्रकल्प सुरू करण्याचे मूळ कारण म्हणजे, 2013 साली पाकिस्तानने चीनबरोबर एका करारान्वये ‘सीपेक’ म्हणजेच ‘चायना-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर’ हा 67 अब्ज डॉलर्सचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला. बलुचिस्तानच्या किनार्‍यावर चाबहारपासून फक्त 170 किलोमीटरवर ग्वादार हे उत्तम खोल पाण्यातील बंदर आहे.
 
 
 त्या बंदराचा विकास आणि त्याला पुढे 3700 किलोमीटर अंतरावर उत्तरेला चीनच्या शिनझियांग प्रांतातील काश्गरला जोडायचे! तिथपर्यंत दोनपदरी रेल्वे, सहापदरी उत्तम हायवे आणि शिवाय पाईपलाईन्स (तेल किंवा नैसर्गिक वायूच्या वाहून नेण्यासाठी) आणि शिवाय या प्रकल्पाच्या गरजेसाठी विद्युत निर्मिती प्रकल्प, नद्यांवरची धरणे इत्यादी अनेक लहानमोठे प्रकल्प उभे राहणार होते. पण, या सगळ्या प्रकल्पांमध्ये बलुच प्रजेच्या हाताला अजिबात काहीही काम मिळणार नव्हते. सगळे कामगार चीनमधूनच आयात करण्यात आले.
 
 
पाकिस्तानने फक्त त्या प्रकल्पाचा खर्च वहन करायचा आहे, तोसुद्धा चीनकडून अफाट व्याज-कर्ज घेऊन! शिवाय या प्रकल्पात पाकिस्तान सरकार आणि तेथील सेना या सर्वांनी प्रचंड भ्रष्टाचार केला. शिवाय बलुच लोकांनी या प्रकल्पविरुद्ध एक सशस्त्र दहशतवादी आघाडीच उघडली आहे. त्यात सध्या अनेक चिनी कामगारांचे खून पडत आहेत. त्यामुळे आता हा प्रकल्प बारगळल्यातच जमा आहे. नुकतीच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांंनी प्रकल्पाचे प्रातिनिधिक कार्यालय बंद करण्याची घोषणा केली आहे. या प्रकल्पाने चीन आपले इंधन तेल पर्शियन आखातातून आणून पाईपलाईन्सद्वारे चीनला नेणार होता.
 
 
या प्रकल्पाला तोडीस तोंड म्हणून भारताने हा चाबहार प्रकल्प उभा केला आहे. यात चाबहार येथून उत्तर इराणमधून रेल्वे आणि रस्ते व पाईपलाईनद्वारे मध्य आशियातील तेल आणि नैसर्गिक वायू संपन्न देशांशी संपर्क साधायचा आहे. तसेच हाच संपर्क पुढे रस्ते आणि रेल्वेच्या जाळ्याचा वापर करून रशियातील मॉस्कोपर्यंत न्यायचा आहे. म्हणजे हा एक अतिशय उत्तम व्यापारी मार्ग उपलब्ध होणार आहे. या संपूर्ण महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे नाव आहे ‘इंटरनॅशनल नॉर्थ-साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडोर’ अर्थात ‘आयएनएसटीसी.’हा प्रकल्प म्हणजे भारत सरकारचे, चीनच्या ‘बीआरआय’, म्हणजेच ‘बेल्ट अ‍ॅण्ड रोड’ उपक्रमाला उत्तर आहे आणि त्यासाठी चाबहार हे बंदर तसेच तिथून पुढे इराणच्या झाबोल या उत्तरेच्या शहरापर्यंत रेल्वेलाईन आणि रस्ता करून देणे, हेदेखील संमिलित आहे.
 
 
 

modi 
 
 
 
 
भारत सरकारने हे सर्व प्रकल्प पूर्ण करत आणले आहेत. लवकरच या रेल्वेची यशस्वी चाचणी घेण्याचे कामही पूर्ण होईल. झाबोलहून पुढे हा मार्ग इराणच्या रेल्वे नेटवर्कला जोडला जाईल, तसेच तेथून पूर्वेकडे वळून हा मार्ग अफगाणिस्तानमधील बमियन येथील लोखंडाच्या खाणीपर्यंत नेला जाईल. म्हणजे अफगाणिस्तान आपले लोह खनिज चाबहारमार्गे निर्यात करू शकेल. भारताला अफगाणिस्तान, तसेच मध्य आशियातील कजाखस्तान, ताजिकिस्तान या सर्व देशांशी खुश्कीच्या मार्गाने संपर्क करता येत नसे. कारण, पाकिस्तानमध्ये घुसलेली पाचर! आता या नव्या मार्गामुळे पाकिस्तानला पूर्णपणे बायपास करून भारत अफगाणिस्तान व इतर देशांशी मनःपूत व्यापार वाढवू शकेल.
 
 
आपल्याला मध्य आशियातील देशांकडून तेल व नैसर्गिक वायू तसेच इराणकडून देखील तेल, हे सर्व अतिशय कमी अंतर वहन करून स्वस्तात आणता येऊ शकेल. नुकतेच तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यावर तिथल्या जनतेची उपासमार व्हायला लागली. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्यागरजेसाठी भारत पाठवत असलेला गहू आपल्या प्रदेशातून नेण्यास नकार दिला. त्याबरोबर भारताने तोच गहू, चाबहार बंदरात जहाजाने नेला आणि तेथून हा 57 हजार टन गहू ट्रकने अफगाणिस्तानात पोहोचविला गेला. पाकिस्तान हात चोळीत बसला!
 
 
31 जुलै या दिवशी भारतात आणि इराणमध्ये ‘चाबहार दिवस’ साजरा केला गेला. मुंबई बंदरात भारताचे जहाज वाहतूक आणि बंदरे, मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत आणि इराणचे राजदूत यांच्या संयुक्त विद्यमाने हा दिन साजरा झाला. आता सोनोवाल नुकतेच चार दिवसांच्या इराण दौर्‍यावर गेले आहेत. तिथे ते या प्रकल्पाबाबतचे इतर करार आणि त्या प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीची दिशा ठरवतील. त्यामुळे एकूणच हा प्रकल्प भारत, इराण, मध्य आशियातील देश आणि रशिया या सर्वांसाठी एक मोठे वरदान ठरेल. एकूणच व्यापाराची यामुळे खूपच प्रगती होईल याची खात्री आहे. या सर्वात भारत देशाची शान आणि देशाचा मान आंतरराष्ट्रीय क्षेत्रात वाढला आहे, हे निश्चित! या सर्व योजनेमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन आणि निर्धार दिसून आला. या प्रकल्पाला मनापासून शुभेच्छा!
 
 
 
- चंद्रशेखर नेने
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
पंतप्रधान मोदींकडून अहमदाबादमधील दुर्घटनास्थळाची पाहणी, रुग्णालयातील जखमींची घेणार भेट

पंतप्रधान मोदींकडून अहमदाबादमधील दुर्घटनास्थळाची पाहणी, रुग्णालयातील जखमींची घेणार भेट

(Ahmedabad Plane Crash updates) अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनसाठी उड्डाण केलेलं एअर इंडियाचे विमान गुरुवारी दि. १२ जून दुपारी नागरी वस्तीत कोसळले. या भीषण विमान अपघातात एकूण २६५ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये वसतीगृहातील राहणाऱ्या डॉक्टर आणि विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये दाखल झाले असून त्यांनी सर्वप्रथम दुर्घटनास्थळी जाऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू, गुजरातचे ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121