‘कोविड’ महामारीच्या दोन वर्षांच्या अंधःकारानंतर येणारा प्रत्येक सण हा सर्वांना पर्वणीसारखाच. मग आनंदाची पर्वणी असणार्या पंढरीच्या वारीला काय उपमा द्यावी? वारी हा ऐकण्याचा, वाचण्याचा, बोलण्याचा विषय नाही, तो अनुभवण्याचा विषय आहे. ‘एकतरी ओवी अनुभवावी’च्या धर्तीवर ‘एक तरी वारी अनुभवावी’ असंच म्हटलं पाहिजे. रिक्त हातानं कसं जावं, भरल्या मनानं जातोय, तर भरल्या हातानं जावं म्हणून परिवारातील, मित्र परिवारातील मंडळींसोबत राजगिरा लाडू घेऊन जाण्यास सुरुवात केली. यावर्षीदेखील दि. २ व ३ जुलै रोजी दिंडीमध्ये तुकोबांच्या आणि माऊलींच्या दर्शनाचा योग आला. त्याचे शब्दचित्रण...
शनिवारी सकाळी ६च्या सुमारास घर सोडलं, एकेकाला घेत घेत खारघरला पोहोचायला तासापेक्षा जास्त वेळ गेला. आम्ही एकूण साडेनऊ जण होतो. माझ्यासोबत लहान भाऊ अजय, त्याची छोटी शरयू, मित्रवर विशाल, ‘चक्रधर’ सागर, ‘हॅप्पीवाली फिलिंग’वाला विजय, बर्याच दिवसांनी भेटलेली सीमा आणि बंधुवर दत्ता व काका त्यांच्या आईसोबत होते. दोन चारचाकी वाहने होती. देहू रोड, खडकी, पुणे, उरळी कांचन करीत इंदापूर जवळ करत होतो. आज जगद्गुरू तुकोबारायांची पालखी निमगी केतकाववरून निघून इंदापुरात दुपारच्या विसाव्याला पोहोचणार होती आणि तिथेच मुक्काम करणार होती.
लहान-लहान दिंड्यांचं दर्शन व्हायला लागलं. अंगावर सदरा-लेंगा, हातात टाळ, खांद्यावर भगवी पताका, कपाळी बुक्का, गळ्यात तुळशीची माळ लेऊन नामजप करत चालणार्या वारकर्यांचं दर्शन होण्यास सुरुवात झाली आणि इंदापूर जवळ आल्याची जाणीव झाली. इंदापुरात शिरता शिरता तुकोबारायांचे भक्त निळोबाराय यांच्या पालखीचे दर्शन झाले. डौलदार बैलजोडी जुंपलेल्या रथामध्ये निळोबारायांची पालखी, आजूबाजूला अब्दागिरी, दंड घेतलेले चोपदार, टाळकरी, विणेकरी, तुळशी वृंदावन घेलेल्या आयाबाया पाहताच मन प्रसन्न झालं. गाडी बाजूला लावून ओढीने पालखीतळाकडे धाव घेतली, पण अजून पालखी रिंगण करून पोहोचली नव्हती. थोडक्यात, रिंगण चुकल्याची चुटपुट लागली पण आता ओढ होती दर्शनाची !
थोड्याच वेळात पालखी आली. विसाव्याला थांबली आणि आरती सुरू झाली. आरतीनंतर आगत स्वागत झाले आणि दर्शनाची झुंबड उडाली. इतक्यात, भक्त निळोबारायसुद्धा जगद्गुरूंच्या दर्शनाला आले. लगबग वाढली. दर्शनासाठी रांगेत उभा राहिलो अन् मनात वाचलेले तुकाराम महाराज आठवू लागलो. पादुकांवर माथा टेकवला अन् भरलेल्या मनाने बाहेर पडलो. आता ओढ लागली होती, माऊलींच्या दर्शनाची. दर्शनानंतर गाडीत बसलो आणि निघालो फलटणच्या दिशेने. कालपासून माऊलींचा मुक्काम फलटणला होता. उद्या सकाळी पालखी बरडच्या दिशेने निघणार होती. आजच तळावर दर्शन घ्यायच्या हिशेबाने निघालो. रमतगमत फलटण मुक्कामी पोहोचलो. उपळेकर महाराजांंचे समाधी मंदिर, गणपतीचे मंदिर असलेला परिसर, अत्यंत शांत वसाहत, इमारतीच्या तळमजल्यावर मुक्कामी असलेले वारकरी, तीन खोल्यांचे साफसूफ असलेले घर, निवासाला अजून काय हवे ? हातपाय धुवून निघालो पालखी तळाच्या दिशेने. पालखी तळावर पोहोचलो. सर्वत्र राहुट्यांची दाटी झाली होती.
‘अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक’ म्हणत वारीस जाणार्या वारकर्यांनी आपला एका दिवसाचा तात्पुरता संसार उभा केला होता. एका बाजूला भला थोरला मंडप उभारून मुदपाकखाना उभारला होता. डाळभाताची पंचपक्वाने रांधली जात होती. द्रोण पत्रावळ्यांच्या चळती, भातवाढ्या, वगराळी स्वयंपाक घराची शोभा वाढवत होत्या. वरच्या अंगाला पाण्याच्या पिंपांचा पाणवठा होता. आग्रह करत करत जेवणाच्या पंगती चालल्या होत्या. कुणी उठून श्लोक म्हणत होतं.
एकीकडे दिंडी प्रमुख आपल्या जवळच्यांना घेऊन कोंडाळं करून उद्याचं नियोजन करीत होते, तर दुसरीकडे मोकळ्या पटांगणात मध्ये तुळशी वृंदावन ठेवून त्याच्या भोवतालनं आयाबायांनी फेर धरला होता. राधाकृष्ण-गोपालकृष्ण म्हणत फुगड्या चालल्या होत्या. एकेका दिंडीच्या पंगतीमध्ये जाऊन दिंडीप्रमुखांची आणलेले राजगिरा लाडू वाटण्यासाठी परवानगी मागितली. अर्थातच ‘रामकृष्ण हरी’ म्हणत सर्वांनी स्वागत केलं. एकीकडे लाडू वाटप, त्याच्या जोडीला दिंडीप्रमुखांशी गप्पाटप्पा, मग कोणत्या गावची दिंडी इथपासून सुरू झालेल्या गप्पा सामायिक ओळखीची नावं निघाल्यावर अजूनच खुलत गेल्या. दुसरीकडे विजयने छायाचित्रे, चलचित्रे काढण्याचा सपाटा लावला होता. त्याची गाडी आता चित्रीकरणाहून खेळण्यावर पोहोचली होती. त्यासोबत फुगड्यांच्या गिरक्या सुरू झाल्या. विजय, शरयू, सीमा, सागर सगळ्यांनी मस्त आनंद लुटला. या जन्मात नाहीच, पण कदाचित मागच्या जन्मांतही भेट झाली नसल्याची शक्यता असणारी ही मंडळी चार-सहा मिनिटांत जुनं नातं असल्यासारखी मिसळून गेली. पंगतीमध्ये आम्ही दोन लाडू वाढले काय, आम्हा सगळ्यांना जेवून जायचा आग्रह केला. किती जणांना नाही म्हणायचं, मग उभ्या उभ्या काही प्रसाद घेऊन पुढे सरकत होतो, पण कोल्हापूरकरांची बातच निराळी.
त्यांच्या आग्रहाने त्यांच्या पंगतीला प्रसादाचा लाभ झाला. थेट जमिनीवरती मांडी घालून पत्रावळीवरचं जेवण! अहाहा ! काय ती गरमागरम पोळी, काय ती तिखट शाक, काय ती घट्ट सायीची बासुंदी, समदं ओक्केमंदी! खरंच त्या मूळच्या रुचकर जेवणाची चव त्या वातावरणाने कैकपटीने वाढवली होती. भरल्या पोटाने आणि भारल्या मनाने माऊलींच्या पालखीच्या दर्शनासाठी निघालो. खूप गर्दी असल्याने, रांगेत बराच वेळ जाईल म्हणून दुरूनच दर्शन घेतले. सकाळी उठायला अंमळ उशीरच झाला.
5.30 होऊन गेले होते. बाजूच्याच रस्त्यावरून वारकरी शिस्तीत जाताना दिसले. चौकशी केली, तर 6.30 वाजता तळावरून पालखी याच रस्त्याने जाणार असे समजले. रस्त्यावर मंडळी दर्शनासाठी जमायला लागली होती. आम्ही सारेजण रस्त्यावर येऊन उभे राहिलो, एकेक दिंडी यायला लागली, रथापुढे दहा, रथापुढे नऊ अशा उतरत्या क्रमाने दिंड्या येत होत्या आणि उत्सुकता ताणली जाऊ लागली. रथापुढे दिंडी एकचा फलक दिसला अन् उत्कंठा अगदी शिगेला पोहोचली. आम्ही किमान अर्धा तास पुढे चाललेल्या दिंड्या पाहत होतो. विठूनामाचा गजर ऐकत होतो. अशातच आजूबाजूला गलका झाला, आणि... आणि...त्या वळणावर माऊलींच्या रथाचे दर्शन झाले. डौलदार सजवलेली, बैलजोडी जुंपलेला, फुलांनी आच्छादलेला आपल्या संथ गतीने चालणारा रथ, त्याच्या दर्शनी भागावर फुलांनीच लिहिलेली ’माऊली’ अशी अक्षरे. रथ जवळ आला.
आतल्या पालखीचं, त्यातल्या माऊलींच्या पादुकांचं दर्शन झालं आणि आनंदाचं भरतं आलं. अक्षरशः रोम रोम पुलकित झाला. नकळत गळ्यात हुंदका दाटून आला. डोळे पाझरू लागले. भान हरपून गेलं. ‘ज्ञानियांचा राजा, कैवल्याचा पुतळा’ अशा नावाने ज्या ज्ञानोबांना ज्ञानीमंडळी हाक मारतात ते ज्ञानेश्वर महाराज नव्हतेच मुळी तिथे, इथे होती ती माऊली! भारावल्या अवस्थेत पटापट आवरून घेतलं आणि लगेच लाडू वितरणासाठी दिंडीमध्ये शिरलो. दिंडी कसली ही, हा तर विठुनामाचा प्रवाह.. त्या भक्तीच्या गंगौघात आम्ही सार्यांनी स्वतःला झोकून दिलं. ‘माऊली माऊली’ करीत एकेक हात पुढे येत होता आणि आम्ही प्रसाद म्हणून लाडू त्या हातांवर ठेवत होतो. त्यानिमित्ताने वारीतल्या अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून आलेल्या विठ्ठलमय जीवनाचा आम्हाला स्पर्श होत होता.
त्या स्पर्शासरशी अंगावरची अहंकाराची, मोठेपणाची, कृत्रिमतेची पुटं गळून पडत होती. आभाळ भरून आलं होतं, मळभ दाटलं होतं, पण मनातलं मळभ मात्र दूर झालं होतं. मनात, अंतरंगात लख्ख प्रकाश पडला होता. त्या प्रकाशात पुढील एक वर्षाची वाट निश्चितच दिसणार होती. पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी परत या स्वर्गीय अनुभूतीसाठी यायचं आहेच आणि परत परत अनुभवायचे आहेत, आनंदाचे डोही, आनंद तरंग...!
- अभय जगताप