हिंदी महासागरात (दिबोटी) आणि प्रशांत महासागरात (सॉलोमन बेटे) येथे चीनतर्फे केल्या जाणार्या विस्तार वादाच्या आक्रमक हालचाली पाहता ‘अगलेगा‘ या बेटांचे भारतासाठीचे सामरिक महत्त्व लक्षात येते. ६ हजार ४०० एकर एवढे क्षेत्रफळ असणार्या ‘अगलेगा‘ या बेटांमुळे भारताला आपल्या नाविक हालचाली सक्षमपणे करण्यासाठी आणि तेथे उपलब्ध करण्यात आलेल्या आणि अजून होत असलेल्या या बेटांवरील सोईसुविधांचा खूप उपयोग होऊ शकतो.
अनेक वर्षे आपण चीनकडून कशाप्रकारे भारताच्या भोवती पसरलेल्या देशांमध्ये गुंतवणूक करून त्या देशांना चीनकडे ओढले जात आहे, असे ऐकत होतो. नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका या देशांमध्ये चीनकडून मोठी गुंतवणूक होत होती. या देशांना जर जोडले तर त्याला भारताभोवतीची ‘मोत्यांची माळ’ (स्ट्रिंग ऑफ पर्ल्स) असे संबोधले जात होते. २०१४ नंतर दिल्लीमध्ये आलेल्या मोदी सरकारच्या काळात आक्रमकपणे भारताने चीनकडून ‘ओवल्या’ गेलेल्या या देशांना चीनच्या प्रभावातून मुक्त करण्याचे धोरण राबविले. नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांना चीनच्या धोक्याची जाणीव झालेली आहे. भारताकडूनही हिंदी महासागरात अंदमान आणि लक्षद्वीप या भारताचाच भाग असलेल्या बेटांवरील पायाभूत सुविधांचा विकास केला जात आहे. तसेच हिंदी महासागरामधील मॉरिशसच्या ‘अगलेगा’ बेटांवर भारतातर्फे पायाभूत सुविधांचा विकास केला जात आहे. मॉरिशसकडून भारताला या बेटांवर पायाभूत सुविधा उभारण्यास संमती मिळालेली आहे. या बेटांचे मोठे सामरिक महत्त्व आहे.
मॉरिशसच्या किनार्यापासून सुमारे एक हजार किलोमीटर अंतरावर असणार्या दोन बेटांचे नाव आहे ‘अगलेगा.’ हिंदी महासागरातील सामरिकदृष्ट्या अत्यंत मोक्याच्या जागी असणारी ही दोन बेटे मॉरिशसने भारताला पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी सध्या सुपूर्द केलेली आहेत. भारतातर्फे ज्याअर्थी मोठी गुंतवणूक या बेटांवरील पायाभूत सुविधांमध्ये केली जात आहे, ते पाहता भारत आणि मॉरिशसमध्ये कोणत्यातरी करारान्वये ही बेटे भारताकडे सुपूर्द करण्यात आली असावीत. कराराचा तपशील उपलब्ध नाही. पण सध्या हिंदी महासागरात (दिबोटी) आणि प्रशांत महासागरात (सॉलोमन बेटे) येथे चीनतर्फे केल्या जाणार्या विस्तार वादाच्या आक्रमक हालचाली पाहता ‘अगलेगा‘ या बेटांचे भारतासाठीचे सामरिक महत्त्व लक्षात येते. नकाशा समोर ठेवला तर या बेटांच्या स्थानाच्या विषयाचे गांभीर्य आणि महत्त्व लक्षात येईल. ६ हजार ४०० एकर एवढे क्षेत्रफळ असणार्या ‘अगलेगा‘ या बेटांमुळे भारताला आपल्या नाविक हालचाली सक्षमपणे करण्यासाठी आणि तेथे उपलब्ध करण्यात आलेल्या आणि अजून होत असलेल्या या बेटांवरील सोईसुविधांचा खूप उपयोग होऊ शकतो. तसेच या बेटांपासून फक्त १७०० किलोमीटर अंतरावरच ‘दिएगो गार्सिया’ बेट असून तेथे अमेरिकेचा मोठा नाविक तळ आहे, हे नोंद घेण्याजोगे.
१२ किलोमीटर लांब आणि १०५ किलोमीटर रुंद असे या बेटांचे स्वरूप आहे. या बेटाचे सामरिक महत्त्व समजून घ्यावयाचे असेल, तर चीनने ‘दिबोटी’ या इथिओपियाजवळील अत्यंत मोक्याच्या जागेवर असणार्या ठिकाणी नाविक तळ आणि त्यासाठी लागणार्या मालाचा चढ-उतार, रहदारी यासाठी उत्तम सोईसुविधा उभ्या केल्या आहेत. सध्या हिंदी महासागरात होर्मूझचे आखात (ओमानजवळ असणारा मालवाहू जहाजांचा अत्यंत व्यस्त असणारा मार्ग) मोझाम्बिकचा आखाती सागरी मार्ग येथून मोठ्या प्रमाणात होणारी सागरी वाहतूक लक्षवेधी आहे. फ्रान्सचाही दिबोटी येथे पूर्वीपासूनच वायुदलाचा तळ आहे. जर्मनी, अमेरिका, इटली याही देशांची येथे छोट्या प्रमाणात का होईना, लष्करी उपस्थिती आहे.
त्यामुळे भारताला हिंदी महासागरात आपला स्वतःचा तळ असणे, अत्यंत महत्त्वाचे आहे. भारताने मोठी मालवाहू विमाने उतरविण्यासाठी ‘अगलेगा’ येथे मोठी धावपट्टी उभी केली आहे. मोठ्या जहाजांना बेटांजवळ उभे करण्यासाठी खोल समुद्रात ‘धक्का’ बांधला आहे. नाहीतर पूर्वी मोठ्या मालवाहू जहाजांना खोल समुद्रात उभे राहावे लागत असे आणि तेथून छोट्या बोटींमधून मालाची चढ-उतार आणि ने-आण होत असे. पण हे खूप वेळखाऊ काम होते. बेटावर कर्मचार्यांना राहण्यासाठी मोठे रहिवासी प्रकल्पही बांधण्यात आलेले आहेत.
नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ‘क्वाड’ बैठकीसाठी जाण्यापूर्वी दक्षिण कोरियाला भेट दिली होती. दक्षिण कोरियामध्ये नुकतेच निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष यून सुक येऊल यांची त्यांनी भेट घेतली. यून सुक येऊल यांनी चीनसमोर कणखरपणे उभे राहण्याचे त्यांच्या निवडणूक प्रचारातून जाहीर केले होते. त्यांच्या या भूमिकेमुळे ही भेट एवढ्या लवकर घडली असावी. अर्थात, जो बायडन यांनी ‘सॅमसंग’ या कंपनीच्या प्रकल्पालाही भेट दिली होती. सध्या इलेक्ट्रॉनिक सुट्ट्या भागांचे तसेच ‘सेमीकंडक्टर चिप्स’चे जागतिक ‘शॉर्टेज’ आहे. तैवानमधील ‘टीएसएमसी’ आणि दक्षिण कोरियातील ‘सॅमसंग’ या हे सुट्टे भाग बनविणार्या आघाडीच्या कंपन्या आहेत. या कंपन्या आपापली उत्पादन क्षमता वाढविण्याच्या प्रयत्नात आहेत. ‘सॅमसंग’ तर अमेरिकेतच उत्पादन सुरू करण्याच्या विचारात आहे.
दक्षिण कोरियाच्या दौर्यावर निघण्यापूर्वी जो बायडन म्हणाले होते की, पुढील काही दशके हिंदी महासागर आणि प्रशांत महासागरामधील घडामोडी संपूर्ण जागतिक पटलावर सर्वाधिक महत्त्वाच्या आणि प्रभाव टाकणार्या असतील. त्यांच्या या विधानामागे चीनचा या विभागात झालेला प्रचंड विस्तार, चीनकडून आग्नेय आणि दक्षिण आशियातील देशांवर असलेला प्रभाव आणि दक्षिण चिनी महासागरातील अनेक चीनपुरस्कृत कृत्रिम बेटांचे पसरत चाललेले जाळे हेच डोळ्यांसमोर असणार, असे आपण म्हणू शकतो. चीन हा जगातील अमेरिकेनंतरचा दुसरा मोठी अर्थव्यवस्था ठरलेला देश आहे. सॉलोमन बेटांबरोबर चीनने सुरक्षा करार केल्यानंतर आणि तो विषय तापलेला आणि ताजा असतानाच आता चीनने प्रशांत महासागरातील ‘सॉलोमन’ बेटांजवळील अजून चार बेटांवरील चिमुकल्या देशांबरोबर गुंतवणूक आणि लष्करी सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. ‘किरिबाटी’ आणि ‘वनातू’ ही त्यामधील दोन बेटांची नावे आहेत. चीनने सध्या एक नवीन पवित्रा घेतलेला दिसतो. नवीन बेटांवरील राज्यकर्त्यांना त्या बेटांजवळील समुद्रात मासेमारीचा अधिकार मागणे. त्या बदल्यात त्या बेटांवर काही विकासासाठी गुंतवणुकीचे आमिष दाखवून त्या बेटांवर चंचूप्रवेश मिळवणे. ‘सॉलोमन’सह ही दोन्हीही बेटे ऑस्ट्रेलियापासून फक्त दोन हजार किलोमीटर अंतरावर आहेत. ‘किरिबाटी’ बेट, तर अमेरिकेच्या ‘हवाई’ बेटांपासून फक्त तीन हजार किलोमीटर अंतरावर आहे.
प्रशांत महासागरात अमेरिकेचा ‘गुआम’ येथे नाविक तळ आहे, तर हिंदी महासागरात ‘दिएगो गार्सिया’ येथे अमेरिकेचा दुसरा लष्करी नाविक तळ आहे. अमेरिकेच्या पाणबुड्यांसाठी, विमानवाहू जहाजे आणि लढाऊ जहाजांसाठी या दोन्हीही बेटांवर सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. ‘दिएगो गार्सिया’ या तळाजवळ असणारा पिटुकला देश म्हणजे मॉरिशस.
‘दिएगो गार्सिया’ हे बेटही पूर्वी मॉरिशसच्या अंतर्गत येत होते. मॉरिशस पूर्वी ब्रिटिशांच्या अंमलाखाली असताना ब्रिटनने ‘दिएगो गार्सिया’ बेट अमेरिकेकडे सुपूर्द केले होते. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा या बेटांसंदर्भात उपस्थित होत असल्याने या बेटांबद्दल जाहीरपणे बोललेले दिसून येत नाही. गेली अनेक वर्षे चीनकडून प्रशांत महासागरात आणि दक्षिण चिनी समुद्रात ज्याप्रकारे अनेक कृत्रिम बेटांची संख्या वाढवून आणि या व इतर बेटांवर त्यांचे विविध लष्करी तळ उभे करण्याची धडपड चालू आहे ते बघता भारतही हिंदी महासागरातील आपले वर्चस्व टिकवण्यासाठी आणि वाढविण्यासाठी कसा प्रयत्न करत आहे, याची सर्वांना माहिती व्हावी म्हणूनच हा लेखन प्रपंच. ‘अगलेगा’ बेटांवरील पायाभूत सुविधांमध्ये भारताकडून जर एवढी मोठी गुंतवणूक होत असेल, तर त्यामागे निश्चितपणे आपल्या जहाजांसाठी थांब्याची आणि इंधन भरण्याची सोय या गोष्टीही विचारात घेतल्या असणारच. भारताच्या सर्व जहाजांना तेथे थांबण्यासाठी आणि इतर गोष्टींसाठी या बेटांचा उपयोग होऊ शकतो.
भारताकडे अंदमान हेही असेच अत्यंत सामरिक महत्त्व असलेले बेट आहे, हे ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. अंदमानमध्ये भारताकडून मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची उभारणी चालू आहेच. या सुविधांचा भारताला भविष्यात मोठा उपयोग होणार आहे, हे वेगळे सांगणे न लगे.