सोळाव्या शतकापासून पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच आणि डच या सत्ता स्वतःच्या आरमाराच्या बळावर हिंदुस्थानावर स्वारी करून आल्या. त्यांनी कोलकाता, चेन्नई, गोवा, वेंगुर्ला, राजापूर, मुंबई, सुरत अशा विविध ठिकाणी आपल्या वसाहती निर्माण केल्या. हे सर्व पाहून त्यावेळच्या सत्ताधीशांनी आरमार उभारण्याचा साधा विचारही केला नाही. आपले स्वतःचे आरमार असावे, असे त्यांना वाटले नाही. आपले समर्थ आरमार निर्माण करण्यासाठी कोणीही पुढे सरसावले नाही. अपवाद होता तो फक्त शिवरायांचा...
अष्टौ गुणा: पुरूषं दीपयन्ति
प्रज्ञाच कौल्यंच दम: श्रुतंच
पराक्रमश्च अबहुभाषिताच
दानं यथाशक्ति कृतज्ञताश्च
भावार्थ - माणसाला मोठेपणा मिळवून देणारे आठ गुण आहेत. 1) प्रज्ञा 2) कुलीनता 3) संयम 4) पराक्रम 5) मितभाषण 6) ज्ञान 7) यथाशक्ती दान करणे. 8) कृतज्ञता.
हा श्लोक वाचल्यानंतर असे वाटते की, सुभाषितकाराने शिवरायांना समोर ठेवून हा श्लोक रचला असावा.
शिवरायांच्या काळात ज्या इस्लामिक सत्ता होत्या, त्यांच्या सत्ताधीशांना आरमाराकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ नव्हता. 11व्या शतकात चोल राजा रामराज याने आरमाराकडे लक्ष दिले होते, असे आरमाराकडे लक्ष देणारा तोच अखेरचा हिंदू राजा होता.
पंधराव्या शतकात संगमेश्वरचा जखुराय नावाचा एक जहागिरदार होऊन गेला. तथापि, आरमाराचे महत्त्व जाणणारा चोल राजा रामराज याच्यानंतर 600 वर्षांनी शिवरायांनी आरमाराची स्थापना केली. शिवरायांना सागरावरच्या शत्रूची चाहूल लागली. सागरावर वर्चस्व प्रस्थापित केलेल्या बलाढ्य शत्रूच्या विरोधात तेवढ्याच सामर्थ्याने उभे राहावे लागणार होते. याची शिवरायांना जाणीव होती.
हिंदवी स्वराज्याचा विस्तार करणे, हे शिवरायांचे ध्येय होते. कोकणात आपल्या राज्याचा विस्तार त्यांना करायचा होता. तिथे आपले राज्य टिकवायचे असेल, तर स्वतःचे सामर्थ्यशाली आरमार हवे. त्याचबरोबर बळकट जलदुर्ग असलेच पाहिजेत, हे शिवरायांनी ओळखले. आरमार उभे करायचे, तर बंदर आणि गोद्या हव्यात. वर्ष 1656-1657 पासून शिवरायांनी आरमाराच्या उभारणीला प्रारंभ केला. त्यांनी सिंधुदुर्ग, खांदेरी यांसारखे किल्ले उभे केले. विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग यांसारखे बळकट किल्ले कोकणच्या किनार्यावर उभे करून अशा बळकट किल्ल्यांची एक माळ निर्माण केली. यापूर्वी कोणत्याही राजाने जलदुर्ग उभारण्याचा विचारही केला नव्हता.
वर्ष 1656 मध्ये कल्याण आणि भिवंडीवर भगवा डौलाने फडकला. त्याच शुभमुहूर्तावर शिवरायांनी कल्याणला लढाऊ नौका बांधण्याच्या कार्याला आरंभ केला. विजयदुर्गाजवळ गड नदीच्या खाडीत जहाज बांधणी, जहाज दुरूस्तीसाठी गोद्या बांधल्या.
महानायक भंडारी, कान्होजी आंग्रे, धुळप अशी अनेक निष्ठावान मंडळी समर्थपणे आरमाराची धुरा सांभाळत होते. या वीरांनी मराठ्यांच्या आरमाराचा वचक शत्रूवर बसवला होता. शिवरायांनी आरमाराची स्थापना केली तो दिवस दि. 24 ऑक्टोबर, 1657 म्हणजे आश्विन वद्य द्वादशी अर्थात वसुबारस शके 1579.
आरमार म्हणजे राज्याचे एक स्वतंत्र अंग आहे. ‘ज्याच्याकडे अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आणि ज्याच्या जवळ समर्थ आरमार त्याचा समुद्र!’ या उक्तीला अनुसरून शिवाजी महाराजांनी सागरावरून होणार्या आक्रमणाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आपल्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली.
कोकणचा किनारा हा बहुतांशी उथळ आहे. तिथल्या खाड्यांची पात्रेसुद्धा उथळ आहेत. भरतीच्या वेळी खाड्यांमध्ये पाणी काही मैलांपर्यंत भरते. ओहोटीच्या वेळी ती पात्रे उघडी पडतात. त्यामुळे या खाड्यांमधून वाहतुकीला निमुळत्या बुडाची जहाजे कुचकामी ठरतात. हे ध्यानात घेऊन शिवरायांनी खास सपाट बुडाच्या छोट्या होड्या बांधून घेतल्या. या होड्यांनी खांदेरीच्या युद्धात इंग्रजांच्या तोंडचे पाणी पळवले. इंग्रजांच्या बलाढ्य युद्धनौकांना नामोहरम करण्यात या छोट्या नौका यशस्वी झाल्या.
अत्यंत अल्पकाळात शिवरायांनी स्वराज्याच्या आरमारात गुराबा, तरांडी, गलबते, महागिर्या खोड्या, मचवे, पगार, तिरकटी, पाल अशा विविध प्रकारच्या नौका समाविष्ट झाल्या. त्यांची एकूण संख्या 700 पर्यंत पोहोचली.
शिवरायांनी अत्यंत अल्पकाळात आपले आरमार दल इंग्रजांच्या तोडीस तोड बनवले. जंजिर्याच्या विशिष्ट भौगोलिक स्थानामुळे शिवरायांना तो जलदुर्ग जिंकता आला नाही. तथापि सिद्दीच्या ताब्यातले जमिनीवरचे सर्व गड-किल्ले आणि भूभाग यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्यावर आपल्या स्वामित्वाची मोहोर उमटवली.
शिवरायांनी हिरोजी इंदुलकरांना पत्रातून केलेले मार्गदर्शन
“आमचे लक्ष सिंधुदुर्ग स्थिरावले आहे. सर्व काम उत्तम प्रकारे करावे. काम करणारी माणसे नवीन आहेत. त्यांचा योग्य तो उपयोग करून घ्यावा. त्यांना सांभाळून घ्यावे. पाया खूप रुंद घालावा. खाली सर्व कातळ आहेत. त्यावर इमारत उभी राहणार आहे. त्याच्या दोन्ही बाजूला दोन हात जागा सोडावी. त्या जागेत तट उभारता येतील एवढी रुंद जागा सोडलेली असावी. तट काही ठिकाणी रुंद तर काही ठिकाणी अरुंद ठेवावा लागतो. ते अनुकूलता पाहून ठरवावे. पायात ओतण्यासाठी शिशाची व्यवस्था केली आहे. सर्व माल तपासून मोजून मगच घ्यावा.
इंग्रज सरकार लबाड आहे. डोळ्यातील काजळसुद्धा चोरून नेतील आणि पत्ताही लागणार नाही. परत येऊन त्याच्या कामाचे दाम मागतील तेव्हा सावधगिरी बाळगा. आपल्याकडे गोड पाणी भरपूर आहे. पाणवठ्याच्या जवळ टाक्या बांधा. त्यात वाळू साठवून ठेवा. गोड्या पाण्यात वाळू दोन-चार वेळा भिजवून ठेवा. म्हणजे वाळूतला खारटपणा निघून जाईल, अशी धुतलेली वाळू बांधकामासाठी उपयुक्त ठरेल.
चुनखडी घाटावरून पाठवत आहोत. तीसुद्धा तपासून घ्या. त्यात भेसळ नाही ना याचीही खात्री करून घ्या. रोजच्या कामाची मजुरी देत जा. त्या बाबतीत कोणताही प्रश्न निर्माण करू नका.
सिंधुदुर्ग स्वराज्याची सागरी राजधानी आहे. हा दुर्ग अजेय राहावा म्हणून त्याच्या पुढ्यात असणार्या खडकावर पद्मगड म्हणजेच रामदुर्ग उभारला जाणार आहे, हेही ध्यानात घ्या.”
मुरुड तालुक्यातील जंजिर्याचा इतिहास
पोर्तुगीज, हबशी आणि इंग्रज हे तिघेही दर्यावर्दी, संधिसाधू आणि लढण्यामध्ये वाकबगार होते. व्यापार्याचे सोंग घेऊन राजकारणाच्या क्षेत्रात त्यांनी प्रवेश केला. त्यांच्या आकांक्षा, आत्मनिष्ठा, उद्दिष्ट, युद्धसामग्री आणि युद्धपद्धती या सर्व गोष्टी ते वरचढ होते.
हबशी लोकांना त्यांच्या मूळ भूमीकडून कोणत्याही प्रकारचा पाठिंबा अथवा सहकार्य मिळत नव्हते. पोर्तुगीज हे अत्याचारी होते. क्रौर्य त्यांच्या रोमारोमातून उसळी मारून वर येत होते. सात्विकता, सभ्यता याचा लवलेशही त्यांच्यात आढळत नव्हता. इंग्रजांनी धूर्तपणाने हिंदुस्थानची अधिकाधिक भूमी आपल्या सत्तेखाली आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
पोर्तुगिजांनी गोवा काबीज केले. हबशांनी जंजिरा ताब्यात घेतला. इंग्रजांनी प्रारंभी सुरत आणि नंतर मुंबईत आपली सत्ता स्थापन केली.
सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावणार्या नद्या समुद्राला जिथे मिळतात त्याच्या तोंडाशी खाड्या तयार होतात. त्यामुळे पश्चिम किनारा हा उंदरांनी कुरतडल्या सारखा झाला आहे. या खाड्यांच्या तोंडाजवळ आणि काही ठिकाणी अंतरभागांमध्ये चांगली बंदरे, व्यापारी उतारपेठा असल्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी भूशिरांच्या टोकांवर किंवा वेगवेगळ्या निर्माण झालेल्या बेटांवर मजबूत कातळ पाहून त्या कातळांवर लहान-मोठे किल्ले बांधण्यात आले.
हबशांनी बांधलेला किल्ला जलदुर्गांमध्ये अग्रगण्य आहे. समुद्राच्या पाण्याने वेढलेला कोट बुलंद गच्ची रुंद, असा अजिंक्य किल्ला हबशांनी उभारलेला आहे.
राजापूरची खाडी मुखाजवळ सहा किलोमीटर रुंदीची आहे. आतमध्ये तिची रुंदी 35 किलोमीटर आहे. हा भाग दळणवळणासाठी उपयुक्त आहे. राजापूरची खाडीला आतल्या भागात दोन फाटे फुटले आहेत. त्यातला एक फाटा दक्षिणेला दुसर्याकडे जातो. तोच फाटा पुढे तळे खाडी आणि उत्तरेकडे वळलेला आहे. या उत्तरेकडच्या भागात मांदाड खाडी आहे. या खाडीच्या काठावर प्राचीन लेणी आहेत, त्या लेण्यांमध्ये महाभोज यांचे शिलालेख पाहायला मिळतात.
जंजिर्याचा किल्ला हा पक्क्या कातळावरती उभा असलेला किल्ला आहे. पूर्ण ओहोटीच्या वेळी पौर्णिमेच्या आसपास हा खडक उघडा पडतो. पूर्ण भरतीच्या वेळी मात्र समुद्र पातळीपासून तटाची उंची सुमारे 15 मीटरपर्यंत सहज भरते. जंजिरा किल्ला ज्या कातळावर उभा आहे, त्याचा घेर अडीच किलोमीटर आहे. जंजिर्यावर एकूण 24 (22+2) बुरुज आहेत. तटबंदीमध्ये 22 बुरुज आहेत. 23 वा बुरुज गगनबुरुज असून तो शेपटीच्या तोफेचा आहे. 24 वा बुरुज खुनीबुरुज असून तो मध्यभागी आहे.
जंजिरा किल्ल्याला दोन दरवाजे आहेत. महादरवाजा पूर्व दिशेला तोंड असलेला आहे. पश्चिमेला एक धक्का आहे तिथे एक दरवाजा आहे त्याला ‘दर्या दरवाजा’ म्हणतात. जंजिरा किल्ल्याचा परीघ अडीच किलोमीटरचा आहे. वर्ष 1669 मध्ये या किल्ल्यावर 572 तोफा होत्या, अशी नोंद आढळते. जंजिरा किल्ल्याच्या आत 70 मीटर उंचीच्या उंचवट्यावर एक बालेकिल्ला आहे. याच्या तोडीचा एकही किल्ला अन्यत्र नाही.
सिद्दीबरोबर मराठ्यांची अनेक युद्धं झाली. तथापि मराठ्यांना सिद्धिचा पूर्णपणे पराभव करता आला नाही. यामागचे कारण असे की, हबशांच्या सहकार्यामुळे मुघलांना महाराष्ट्रात टिकाव धरता आला. मराठी आणि हबशी यांच्यामध्ये वैर असल्यामुळे इंग्रज बलाढ्य झाले. मराठ्यांनी आपल्या राज्याचा विस्तार केला. मराठ्यांना पश्चिम किनार्यावरचे सिद्दीचे वर्चस्व नष्ट करण्यात यश आले असले, तरी सिद्दीला जंजिर्यातून हाकलून लावता आले नाही. याची कारणे अनेक आहेत. त्यापैकी दक्षिण हिंदुस्थानामध्ये निर्माण झालेली राजकीय परिस्थिती, जंजिर्याला मिळालेले सह्याद्रीचे संरक्षण, जंजिर्याची नैसर्गिक परिस्थिती, सिद्धीचा एकोपा, चिकाटी, दुर्दम्य निष्ठा ही महत्त्वाची कारणे आहेत.
सिद्दीने जंजिर्यावर ताबा मिळवण्यापूर्वीचा इतिहास
बहमनीच्या राज्यातून मलिक अहमद बाहेर पडला. त्याने पंधराव्या शतकाच्या अखेरीला निजामशाहीची स्थापना केली. उत्तर कोकणचा प्रदेश त्याने आपल्या ताब्यात घेतला. दंडा राजापुरी हे त्याचे प्रमुख ठिकाण होते. मिर्झाअली, कलबअली यांची ठाणेदार म्हणून नियुक्ती केली. या भागामध्ये कोळी लोकांची मुख्य वस्ती होती. कोळी हे या भागातले मूळचे रहिवासी होते. चाचे आणि लुटारू यांचा कोळ्यांना सतत उपद्रव होत होता. त्याच्यावर उपाय म्हणून ठाणेदारांच्या अनुमतीने कोळ्यांच्या प्रमुखाने म्हणजे राम पाटील यांनी दंडाराजपुरीच्या खाडीतल्या बेटावर मेढेकोट बांधला. (मेढेकोट म्हणजे लाकडी ओंडक्यांचा किल्ला.) या किल्ल्यात श्रीरामपंचायतन आणि शंकराचे मंदिर बांधण्यात आले.
या ठिकाणाचे महत्त्व राम पाटलाला कळले होते. त्याने हळूहळू आपला दबदबा वाढवला. तो तिथल्या ठाणेदाराला जुमानेसा झाला. राम पाटलाचे वाढते वर्चस्व निजामशाहीला सहन झाले नाही. राम पाटलाचा मेढेकोट ताब्यात घेण्यासाठी निजामशाहीने पिरमखानाला पाठवले.
पिरमखान आक्रमकाच्या रूपात दंडा राजापुरीला गेला नाही. त्याने दारूचा व्यापारी म्हणून तिथे प्रवेश केला. आपली गलबते मेढेकोटला लावण्यासाठी त्यांनी राम पाटलाचे पाय धरले. त्याला भरपूर दारू पाजली. दारूचा नजराणा दिला. दारूच्या नशेत असलेल्या राम पाटलाला पराभूत करायला पिरमखानला वेळ लागला नाही. जहाजाच्या बुधल्यामध्ये लपलेले निजामशाहीचे सैनिक बाहेर पडले. दारुच्या नशेत असलेल्या कोळ्यांना त्याने मारून टाकले. राम पाटलाला बंदी बनवून नगरला पाठवले. तिथे त्याला ‘एतबारराव’ हा किताब देऊन बळाने इस्लाम धर्माची दीक्षा दिली. पण, राम पाटलाने आपले हिंदुत्व टाकले नाही. तो मेढेकोटात परत आला. पुन्हा तिथे तो प्रबळ होऊ लागताच त्याचा शिरच्छेद करण्यात आला.
राम पाटलाकडून मेढेकोटचा किल्ला हिसकावून घेताना कामी आलेल्यांच्या कबरी आणि या पायगुणी जहाजांचे तीन गंजलेले नांगर विजयाचे प्रतीक म्हणून मुसलमान राज्यकर्त्यांनी स्मरणपूर्वक जतन केले. पिरमखानाच्या मृत्यूनंतर त्याच्या जागी बुर्हाणखानाची नियुक्ती करण्यात आली. त्यानेच मेढेकोटच्या जागी पक्का दगडी जंजिरा बांधला. जंजिर्याच्या महाद्वाराच्या दोन्ही बाजूला असणारी दुर्गद्वारशिल्पे त्याच्याच काळातली आहेत. चार पंजात चार हत्ती. तोंडात आणि शेपटीत एक एक हत्ती, असे शिल्प त्याने त्या महाद्वाराजवळ उभे केले. या शिल्पातून त्याला मराठ्यांना संदेश द्यायचा होता की, तुम्ही स्वतःला हत्ती समजत असाल तर मी शेर आहे.
1567 ते 1571 या चार वर्षार्ंत या पाणकोटचे मूळ बांधकाम करण्यात आले. ‘किल्ले महरूब’ असे त्याचे नामकरण करण्यात आले, असे असले तरी शिवरायांनी निर्माण केलेल्या छोट्या नौका इंग्रजांच्या आरमाराला शह देण्यास पुरेशा होत्या. मराठ्यांच्या या नौकांबाबत इंग्रजांचा कॅप्टन केज्विन याने इंग्रज सरकारला कळवले, “मराठ्यांच्या लहान नौका आम्हाला गुंगारा देऊन खांदेरीवर सहज पोहोचतात त्या छोट्या नौकांचा वेग अफाट आहे, अशा चलाख, चपळ नौका आपल्या जवळ नसल्याने मराठ्यांच्या कार्यात अडथळा आणणे अशक्य आहे.”
सुरतकरांना शिवाजीराजे चार हजार सैन्यासह मुंबईवर चाल करून येत असल्याची वार्ता कळताच त्यांचे धाबे दणाणून गेले आणि त्यांनी मुंबई सरकारला पत्राने कळवले... “शिवाजीचे सैनिक बेटावर कुमक पाठवतात, तटबंदी उभारतात, पण तुम्ही त्यांना अडथळा निर्माण करून ते काम अडवू शकत नाही. म्हणून तुम्ही शिवाजीबरोबर तडजोड करावी. बेटावर हल्ला करण्यासाठी तुमच्याकडे पूर्वीच दोन गलबते दिली आहेत. तुम्ही प्रयत्न करून पाहा. पण, ध्यानात ठेवा तुम्ही अपयशी ठरलात, तर शिवाजी तुमच्याशी कोणतीही बोलणी करणार नाही. तह करायला गेलात, तर धुडकावून लावेल. तसे झाले, तर मुंबईचे रक्षण करण्यास तुम्ही समर्थ आहात का याचा विचार करा.”
अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना केली. आपल्या आरमाराचे सामर्थ्य वाढवले. आपल्या आरमाराचा दरारा निर्माण केला. त्यांच्या या पराक्रमी आरमाराविषयीचे आणि दुर्गांविषयी एका कवीने चार ओळीत त्याचे वर्णन करताना म्हटले....
देशी भार्गव क्षेत्र सागरतिरी,
नाना स्थळे योजुनि।
बांधी दुर्ग अनेक डोंगर शिरी,
बेटे बळे पाहुनी।
जहाजे अरमार जलधी,
दुष्टांसी शिक्षा करी।
बारा मावळ देश पर्वत दरी,
बांधोनि किल्ले गिरी॥
दुर्गेश परुळकर
(लेखक ज्येष्ठ व्याख्याते आणि लेखक आहेत.)
9833106812