नोकरी असो वा व्यवसाय, ताणतणाव हा कोणालाही चुकलेला नाही. परंतु, कोरोनानंतरच्या कालावधीत या ताणतणावाचे शारीरिक व मानसिक आरोग्यावरील परिणामही प्रकर्षाने जाणवू लागले आहेत. तेव्हा, नेमकी या ताणतणावाची कारणे व त्यावर संस्थांना काय उपाययोजना करता येतील, याचा आढावा घेणारा हा लेख...
काम आणि कामाचे ठिकाण या दोन्ही ठिकाणी ताणतणाव ही एक महत्त्वपूर्ण बाब समजली जाते. कोरोनानंतरच्या बदललेल्या नव्या व्यवसाय स्थितीत तर या ताणतणावात निश्चितपणे भर पडल्याचे दिसून येते. रोजच्या जीवनात अनुभवास येणार्या या बाबीला काही अभ्यासांमुळे पाठबळ मिळाले आहे. मुख्य म्हणजे, सद्यःस्थितीत कामाच्या ताणाचा परिणाम कर्मचार्यांच्या वैयक्तिक आरोग्यावर कसा आणि कुठवर होत आहे, त्याचाच हा मागोवा...
या संदर्भातील सद्यःस्थिती म्हणजे कर्मचार्यांच्या विविध मुद्द्यांवर काम करणार्या ‘ऑप्टम’ कंपनीद्वारा भारतातील खासगी क्षेत्रातील सुमारे ३० मोठ्या कंपनीतील दोन लाखांवर कर्मचार्यांचे आरोग्यविषयक सर्वेक्षण करण्यात आले. या कंपन्यांमधील सुमारे ४६ टक्के कर्मचारी हे कामाच्या संदर्भात तणावग्रस्त असून ते ताणतणावासह काम करीत असल्याचे आढळून आले. कोरोनानंतरच्या काळात कंपन्यांमध्ये काम करणार्या कर्मचार्यांच्या तणावाची ही आकडेवारी अनेकांसाठी चिंताजनक ठरली आहे.
कर्मचार्यांच्या आरोग्यविषयक वरील सर्वेक्षण हे ‘कोविड’च्या दुसर्या टप्प्यातील असून, नंतरच्या काळात कर्मचार्यांची आकडेवारी व टक्केवारीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यादरम्यान प्रकर्षाने जाणवलेली बाब म्हणजे, ‘कोविड’मुळे उद्भवलेल्या आरोग्यविषयक समस्या, व्यावसायिक व आर्थिक अस्थिरता या सार्यांचा परिणाम कर्मचार्यांच्या एकूणच आरोग्यावर झाला होता.
वैयक्तिक व औद्योगिक आरोग्याच्या संदर्भात परंपरागतरित्या भारताला जागतिक स्तरावर मधुमेहाची राजधानी समजले जाते. यासाठी तथ्य आणि वस्तुस्थितीची पार्श्वभूमीही आहे. त्यातही भारतात तिशीतील कर्मचार्यांमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात मधुमेहाची लागण वाढलेली दिसते. त्यामुळे कर्मचार्यांच्या आरोग्याच्या संदर्भात सांगायचे झाल्यास, या वयोगटातील नवागत कर्मचार्यांमध्ये सुद्धा मधुमेहाचा शिरकाव झाला आहे, असा अनुभव येतो.
व्यवसाय व उद्योगात कंपनीतील कर्मचार्यांच्या आरोग्याच्या संदर्भात सांगायचे म्हणजे, विविध पाळ्यांमध्ये काम करणे, कामाचे प्रदीर्घ तास, शारीरिक श्रमाचे काम, कामाचा ताण, दैनंदिन जीवनातील अनियमितता, स्पर्धात्मक स्थितीत काम करावे लागणे, परस्पर संबंधातील ताणतणाव, आहारातील अनियमितता व त्यातच दैनंदिन व नियमित व्यायामाचा अभाव या सार्यांचा परिणाम कालानुरूप कर्मचार्यांवर दिसून येतो. आता मात्र तरुण वयातच कर्मचार्यांना कळत-नकळत होणार्या मधुमेहामुळे कर्मचार्यांच्या आरोग्य विषयक समस्यांचे स्वरूपच पूर्णपणे बदलून गेले आहे. त्याचा परिणाम कर्मचार्यांच्या आरोग्यावर विपरितपणे होत असतो. ही वस्तुस्थिती कोरोनामुळे प्रकर्षाने जाणवली आहे.
पूर्वी केवळ शारीरिक श्रमाचे वा खडतर काम करणार्यांनाच आरोग्यविषयक तक्रारी असतात वा वाढतात, असा एक समज प्रचलित होता. आता मात्र कार्यालयीन वा प्रशासकीय काम करणारेही गंभीर आजारपणातून सुटलेले नाहीत. त्यातच भर पडली ती कोरोनाची व कोरोनाकाळात कराव्या लागलेल्या ‘घरून कामकाज’ पद्धतीची. या नव्या व आवश्यक कार्यपद्धतीचे सुरुवातीला उत्सुकतेसह स्वागतदेखील झाले. मात्र, त्यातून आरोग्यविषयक प्रश्न वेगवेगळ्या स्वरुपात निर्माण झाले व त्यात कोरोनामुळे भरच पडली गेली.
कोरोनानंतरच्या काळात कर्मचार्यांच्या कामाशी संबंधित ताणतणावाचे एक मुख्य कारण म्हणजे कामाचे वाढीव तास. सुमारे दीड वर्ष विनाकाम, कमी काम, अनियमित काम व प्रसंगी घरून काम या सार्या कामकाज पद्धतींचा व्यावसायिक गरजांनुरुप अवलंब केल्यानंतरच्या अंतिम टप्प्यानंतर बहुतांश कंपन्यांनी वाढीव कामाच्या तासांचा अवलंब करण्याला प्राधान्य दिले आहे. या पद्धतीमुळे कर्मचार्यांच्या आरोग्यावर परिणाम विपरीत परिणाम दिसून आला आहे. विशेषतः ज्या कर्मचार्यांना कोरोना झाला होता, अशांच्या संदर्भात हा तणाव प्रकर्षाने दिसून येतो.
लक्षणीय बाब म्हणजे, कंपनी-व्यवस्थापनाकडून कर्मचार्यांच्या वाढीव कामाची पद्धती, कर्मचार्यांचे आरोग्य आणि मानसिकता यांच्यावर होणारे परिणाम याचा फारसा विचार करण्यात येत नसल्याचे दिसून येते. सध्याच्या व बदलत्या व्यवसायस्थितीनुसार असे होणे स्वाभाविक मानले तरी, आता या मुद्द्यावर तातडीने व गांभीर्याने विचार करणे मात्र क्रमप्राप्त ठरते. यालाच जोड द्यावी लागेल ती नव्या संदर्भात कर्मचार्यांची मानसिकता आणि आरोग्याची सांगड घालण्याची.
व्यापक स्तरावर या मुद्द्यांवर विचार केला जात असतानाच, कामाच्या ठिकाणी व कामाच्या संदर्भात व्यावहारिक दृष्टिकोन बाळगता येईल का, हा प्रश्न महत्त्वाचा व कळीचा मुद्दा ठरू शकतो. यामध्ये कंपनी-कर्मचार्यांच्याबरोबरच व्यवस्थापक-कर्मचार्यांमध्ये परस्पर समन्वयाची खरी गरज आहे. या संवादावर आधारित समन्वयामध्ये व्यावसायिक प्राथमिकतेची प्रत्यक्ष व कामाच्या ठिकाणी व्यावहारिक सांगड घालणे सद्यःस्थितीत अत्यावश्यक ठरते.
अभ्यासानुसार, कोरोनानंतर आता आर्थिक, व्यावसायिक व व्यावहारिक स्थिती सावरत असताना कर्मचार्यांचा कामाच्या ठिकाणचा ताणतणाव व अनारोग्य ही बाब सध्या एक नवे व्यावसायिक आव्हान म्हणावे लागेल. त्यानुसार व्यवस्थापनस्तरावर व तातडीने विचार-उपायोजना करण्याची नितांत गरज आहे. या मुद्द्याकडे यापुढे दुुर्लक्ष करणे व्यवसाय-व्यवस्थापनाला पूरक ठरणार नसून त्यावर गरजेनुरूप कृती करणे, उपाययोजना आखणे हे आता अपरिहार्य आहे. अशी भूमिका व धोरणात्मक निर्णय व्यवस्थापनाने घेऊन त्याची अंमलबजावणी करणे कठीण असले तरी अशक्य नाही, ही बाब मुळातून समजून घ्यायला हवी.
व्यवसायाशी निगडित आर्थिक बाबींसंदर्भात कर्मचार्यांचा मानसिक ताण व त्याच्या परिणामांचा पडताळा घेता येईल, नव्हे सद्यःस्थितीत व्यवस्थापन आणि व्यवस्थापक या उभयतांकडून ही मोठीच अपेक्षा आहे. सरकार व कर्मचारी संघटनांनी यावर उपायोजना करण्याची वेळ आली आहे. कर्मचार्यांची नियमित आरोग्य तपासणी, योग साधना, सहली यांसारख्या बाबी यामध्ये निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणू शकतात.
कोरोनावर नियंत्रण मिळाले असले तरी महामारी अद्याप संपलेली नाही. उद्योेग-व्यवसायाचे चक्र आता अपेक्षित गतीने पुढे जात असतानाच कोरोनादरम्यान वा त्यामुळे कर्मचार्यांना होणारा वा जाणवणार्या ताणतणावावर तोडगा मिळवणे कंपनी-कर्मचारी उभयतांच्या हिताचे ठरणारे असून, त्यावर कर्मचार्यांचेच नव्हे, तर व्यावसायिक आरोग्य अवलंबून राहणार आहे हे निश्चित.