पंडितजी म्हणजे ईश्वरी साक्षात्कार!

    14-May-2022
Total Views | 68
 
pandit
 
 
सुप्रसिद्ध संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे मंगळवार, दि. 10 मे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे जवळचे शिष्य तसेच पंडितजींशी अगदी कौटुंबिक स्नेह असणार्‍या पंडित सतीश व्यास यांनी पंडित शिवकुमार शर्मा यांच्याशी निगडित आठवणींना दिलेला हा उजाळा...
 
 
जसे अर्जुनाला कृष्णाने विश्वरूप दर्शन दिले, तसे माझ्यासाठी माझे गुरुजी म्हणजे तशाच विश्वरूपदर्शनाची अनुभूती आहेत, ईश्वरी साक्षात्कार ज्याला ते म्हणतात ते कदाचित हेच असावे असे वाटते. कारण, त्यांच्याबरोबर वावरताना हे सर्व काहीतरी वेगळे आहे, गुरुजी सर्वांपेक्षा वेगळे आहेत याची जाणीव सतत होत राहायची.
 
 
आपण एक ठरवलेले असते. परंतु, नियतीच्या मनात वेगळेच काही तरी असते. मी तरी त्याला अपवाद कसा असेन? माझे वडील शास्त्रीय संगीतातील मोठे गायक, पंडित सी. आर. व्यास; पण मला लहानपणी संगीताची तितकीशी दृष्टी नव्हती, इतर मुलांप्रमाणे मीदेखील खेळण्यात वगैरे रमायचो. पण, 1966 साली मी आठवीत असताना माझ्या आयुष्याला वळण देणारी एक घटना घडली-किंग्ज सर्कलजवळ राहत असताना श्रीवल्लभ संगीत विद्यालयामध्ये संगीत कार्यक्रम होता- माझ्याबरोबर कोणी मित्र त्या दिवशी खेळायला नव्हते, म्हणून मी माझ्या वडिलांबरोबर तो कार्यक्रम ऐकायला गेलो होतो. पूर्वी बैठक पद्धतीत कार्यक्रम असायचे. विद्यालयाचे सभागृहदेखील साधेच होते. माझ्यासमोर संगीतातील सर्व मातब्बर मंडळी बसली होती. स्वतः स्वामी श्रीवल्लभदास हजर होते. पडदा अद्याप उघडला नव्हता आणि पडद्यापलीकडे कोण आहे, आता काय होणार, हे पाहण्यासाठी मी उत्सुक होतो. तेवढ्यात पडदा उघडला आणि पंडित शिवकुमार शर्मा यांचा माझ्या आयुष्यात प्रवेश झाला. एक उंचपुरे, देखणे, तेजस्वी व्यक्तिमत्त्व आपल्या मांडीवर कसलेसे वाद्य घेऊन बसले होते. मी बुचकळ्यात पडलो...
 
 
हा काय प्रकार आहे? मला वाटणारे आश्चर्य माझ्या चेहर्‍यावर दिसत होते. कारण, सतार, बासरी आत्तापर्यंत पाहिली होती, पण हे वाद्य माझ्यासाठी अगदी नवीन होते आणि तेव्हा माझी संतूरशी नव्याने पहिल्यांदाच ओळख झाली आणि पुढचे दोन तास जे पंडितजींनी वादन केले, त्याने माझे आयुष्यच बदलून गेले आणि मी घरी येताच बाबांना सांगितले की, “मला हे वाद्य शिकायचे आहे.” ते मला म्हणाले, “तुला शास्त्रीय संगीतात काही करावेसे वाटतेय, याचा मला आनंदच आहे. पण, आधी तू तुझे शिक्षण पूर्ण कर; हवे तर तोपर्यंत घरात गाणे आहे, तर गाणे शिक, त्याचा फायदा तुला कोणतेही वाद्य शिकताना होईलच.” आणि त्यानंतर मी पुढची नऊ वर्षे गायकीचा पाया मजबूत केला. तोपर्यंत माझे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले.
 
 
मी जसा शेवटचा पेपर देऊन आलो, ‘मला आत्ता शिवजींकडे घेऊन चला’ म्हणून वडिलांना सांगितले. मग दिल्लीमध्ये 1975 साली बाबा आणि गुरुजींचा एकत्र कार्यक्रम असताना, परतताना बाबा शिवजींना म्हणाले, “मेरा बेटा आपसे संतूर सिखना चाहता हैं’ त्यावर शिवजी आनंदाने म्हणाले, “अरे आप जैसे कलाकार का बेटा ये सिखना चाहता हैं, it's a great thing for me!” आणि खर्‍या अर्थाने माझा शिवजींबरोबर संतूरचा प्रवास सुरू झाला. त्यांनी स्वतःहूनमाझ्यासाठी जम्मूवरून ‘संतूर’ वाद्य मागवून घेतले. त्या काळात या वाद्याची निर्मिती देखील फार कमी प्रमाणात होत होती. त्यामुळे ते जम्मूहून यायला देखील सात ते आठ महिने लागले होते. परंतु, ते आल्यानंतर माझा श्रीगणेशा झाला तो पहिले ट्युनिंग शिकण्यापासून, त्यात कशाचा आधार नाही, फक्त सूरपेटीतला ‘सा’ लावून त्याचे ट्युनिंग करावे लागते. गुरुजींनी मला संतूरमधले ‘अ ते ज्ञ’ शिकवले. माझे सद्भाग्य हे की, मी पंडितजींचा पहिला शिष्य, त्यामुळे मला प्रत्येक चीज त्यांच्याकडून खोलात जाऊन शिकता आली. गुरुजींची ‘प्रत्येक बंदिशीला वेळ लागला तरी चालेल. पण, अचूकच यायला हवे’ ही समर्पण भावनादेखील शिकण्यासारखी आहे.
 
 
सुरुवातीस पहिली काही वर्षे तर फक्त ‘पलटे’ शिकत होतो. कारण, त्यांचा अट्टाहास होता की, हात तयार हवा! परंतु, घरातच माझ्यावर संगीताचे संस्कार झाले असल्यामुळे कमी वेळात हे शिकता आले. त्यानंतर गुरुजींनी ‘हंसध्वनी’ रागापासून मला राग शिकवण्यास सुरुवात केली. 1976 ते 1988 मी सर्व राग शिकण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान मी गुरुजींबरोबर प्रवास करायचो, शक्य तेवढा जास्त वेळ त्यांच्याबरोबर राहण्याचा प्रयत्न करायचो. गुरुजींचा शिष्य म्हणून मलादेखील जेव्हा कार्यक्रमासाठी विचारणा होऊ लागली तेव्हा, “गुरुजी जेव्हा स्वत:हून मला परवानगी देतील तेव्हाच मी हे धाडस करेन,” असे आयोजकांना सांगत. त्यावेळी झाले असे की, त्या वेळीस माझी नोकरी सुरू होती. गुणीदास संगीत संमेलन आयोजित करत होतो आणि अशातच एकदा परदेश प्रवास करत असताना मला गुरुजी म्हणाले, ‘’सतीश, अब तुम्हे पब्लिक में संतूर बजाना शुरू करना चाहिये.” असे स्वतःहूनच त्यांनी सांगितले. गुरुजी माझी मेहनत बघत होते. एका वेळी नोकरी, संमेलन, रियाज आणि गुरुजींच्या कार्यक्रमात त्यांना साथ देणं, हे सर्व ते बारकाईने न्याहाळत होते. त्यामुळे माझ्या संपूर्ण जडणघडणीत गुरुजींचे स्थान अविभाज्य आहे.
 
 
रियाज किंवा शिकण्याव्यतिरिक्तसुद्धा मी अधिक वेळ गुरुजींकडे असायचो. आपल्या मुलाशी बोलावे, त्याला जेवढ्या प्रेमाने सांगावे, तेवढ्याच प्रेमाने ते माझ्याशी बोलत असत. त्यांनी आणि भाभीजींनी माझ्यावर पुत्रवत प्रेम केले. सर्वात मोठी गोष्ट मी त्यांच्याकडून कुठली शिकलो तर ती म्हणजे ‘संयम.’ गुरुजी शिष्यांना शिकवताना कधीच रागावले नाहीत. प्रचंड संयम त्यांच्यात होता. अतिशय शांतपणे ते कोणतीही गोष्ट सांगायचे. अनेकदा उत्तम गुरू हे उत्तम सादरकर्ते असतीलच असे नाही किंवा उत्तम सादरकर्ते उत्तम गुरू असतीलच, असेही नाही.पण, पंडित शिवकुमार शर्मा हे मात्र याला गोष्टीला अपवाद होते! त्यांच्या एवढा संयत, शांत गुरू मी आजवर पाहिला नव्हता. शिवाय तालीम करताना त्यांनी कधी घड्याळ पाहिले नाही. काळवेळ हरपून ते आपल्या शिष्यांना तासन्तास संतूर शिकवत.
 
 
त्याकाळात त्यांचे चित्रपट क्षेत्रातदेखील चांगलेच नाव होत होते, हे सर्वांनाच ठाऊक आहे. चित्रपट गीतांमध्ये संतूर हे वाद्य आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. अशात ते स्वतः दिसायला अतिशय देखणे असल्यामुळे त्यांना नायकाची भूमिका करण्यासाठी अनेक दिग्दर्शक विचारणाही करीत होते. परंतु, ‘माझे मुख्य क्षेत्र वादन आहे, तिथून मन भरकटता कामा नये,’ म्हणून त्यांनी कधीही ती कामे स्वीकारली नाहीत. एवढेच नाही, तर सुरुवातीस क्षेत्र निवडण्याच्या समयी गुरुजींचे वडील उमा दत्त शर्मा यांची इच्छा होती की, त्यांनी सैन्यात जावे. परंतु, त्याही वेळी त्यांनी आपल्या वडिलांना अतिशय शांतपणे, परंतु निश्चयाने सांगितले की, “मुझे संगीत को ही अपना क्षेत्र बनाना हैं।’
 
 
यशोशिखरावर जाताना संघर्ष असतोच! तो पंडितजींच्या आयुष्यातदेखील आला. सुरुवातीस जेव्हा ते संतूर वाद्य घेऊन मुंबईत आले, तेव्हा येथील प्रचलित, प्रख्यात कलाकारांनी ते सहज स्वीकारले नाही. अनेकांनी त्यांच्यावर, त्याच्या वाद्यावर आणि वादनावर टीका केली. अतिशय हळव्या मनाचे गुरुजी अस्वस्थ झाले आणि जम्मूला ते परत आले. परंतु, त्यांनी या काळात संतूरमध्ये अनेक फेरफार केले. मूळ वाद्य हे 25 ब्रिजचेअसते, ते त्यांनी 29 ब्रिजचे केले (ही तांत्रिक बाजू आहे) शास्त्रीय संगीतात ते कसे चांगले वाटेल, याचा त्यांनी अभ्यास केला आणि अनेक असे संशोधन करून पुन्हा एकदा ते मुंबईत आले आणि नंतर जे काही घडले तो सारा तर इतिहासच आहे! संतूरला वैश्विक पातळीवर नेऊन ठेवण्यासाठी त्यांनी केलेले कार्य हे सूर्यप्रकाशाइतके लख्ख आहे. जसे ‘बिस्मिल्लाखाँ म्हणजे शेहनाई’ तसे ‘संतूर म्हणजे पंडितजी’ हे समीकरणच!
 
 
मी स्वतःला इतका नशीबवान समजतो की, फक्त गुरु-शिष्य एवढ्यापुरतेच हे नाते मर्यादित नव्हते, तर त्यांचे कुटुंबदेखील मला त्यांच्यातलेच एक मानायचे. त्यांची पत्नी आम्हाला कधी जेवल्याशिवाय जाऊ देत नसे. रियाजाव्यतिरिक्त देखील ते मला त्यांच्याकडे बोलावत, कधी हरिप्रसादजींसोबत, कधी पंडित जसराजजी अशा दिग्गजांसोबत गप्पांच्यादेखील मैफिली तासन्तास रंगत. गुरूसहवास लाभायला भाग्य लागते आणि ते मला लाभले आणि सहवासातले संस्कार माझ्यावर झाले, हे मला जास्त महत्त्वाचे वाटते. माझ्या गुरूजींचा आशीर्वाद मला भरपूर मिळाला आहे आणि आज मी जे काही करु शकतोय, ते केवळ त्यांच्यामुळे शक्य झाले!
 
 
एकदा असा प्रसंग घडला की, ‘ओशो आश्रम’मध्ये गुरूजींचा कार्यक्रम होता. तिथे मी जाऊन पोहोचलो. पंडितजींबरोबर तबल्याच्या साथीला होते उस्ताद झाकीर हुसेन. मला ग्रीन रूममध्ये येताना पाहताच त्यांनी एक-दोन नोट्स मला वाजवून दाखवल्या आणि मी थक्क झालो आणि फक्त डोळ्यांनीच भावना व्यक्त केल्या “व्वा गुरुजी! ये तो कमाल कर दिया!” आणि मी ओळखले की, ते ‘जोगकंस’ आज वाजवणार आहेत. माझ्या वडिलांचे गुरू पंडित जगन्नाथबुवा पुरोहित म्हणजे गुणीदास त्यांनी हा राग निर्मिला होता आणि तो राग संतूरवर वाजवणे खरंच मोठी गोष्ट होती! आणि त्यानंतर एकदा का ते स्टेजवर गेल्यानंतर ‘जोगकंस’ त्यांनी 1 तास 50 मिनिटे वाजवला आणि ते झाल्यानंतर त्याचा जो असर माझ्यावर झाला, त्यांच्यावर झाला, ती मैफिल ईश्वरी होऊन गेली... ते स्वतः त्यात एवढे तल्लीन होऊन गेले, त्यांचे एवढे ध्यान त्यात लागले की, ते श्रोतृवृंदाच्या टाळ्यांकडेदेखील त्यांचे लक्ष नव्हते, ते त्या समाधी अवस्थेतच आत निघून गेले आणि हे अनुभवणं, ही अनुभूती होती. किमया होती ती... हाच प्रसंग नाही, तर असे अनेक प्रसंग आहेत, जिथे गुरुजींच्या वादनाने अनेकांचे आयुष्य बदलून गेले. त्यांच्या क्षेत्रात ते किती मोठे होते, हे आपल्याला ठाऊक असते.पण, एक व्यक्ती म्हणून ते सहनशीलता, सात्त्विकता, शांतपणा यांचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांच्याजवळ कोणतीही व्यक्ती आली की, ती कधीच दूर गेली नाही.
 
 
मग ते त्यांचे शिष्य असो वा त्यांचे रसिक. ते त्यांना कधीच अंतर देत नसत. अशी महान व्यक्ती असेल आणि त्यात तिचा स्वभाव गुरुजींसारखा असेल, तर ती तिला आणखी सुंदर बनवते आणि हे त्यांच्यात उपजतच होते आणि एवढेच नाही, तर अतिशय तत्त्वनिष्ठ असे ते होते; जे काही करेन, मिळवेन ते स्वतःच्या कष्टानेच, असे त्यांचे मत होते. ते स्वतः कधी स्पर्धेत अडकले नाहीत, ही स्पर्धा सृजनशीलतेला घातक ठरू शकते आणि सृजनापेक्षा महत्त्वाचे काही नाही, यावर पंडितजींचा ठाम विश्वास होता. कोण काय म्हणते, त्यापेक्षा कर्तृत्वातून त्यांनी स्वतःला सिद्ध केले. हे सर्व तर अलौकिकच होते. याशिवाय गुरूजींना फावल्या वेळात क्रिकेट, राजकारण, खाण्याचे पदार्थ यावर त्यांना गप्पा मारायला आवडत. संगीताबद्दल तर गप्पा ओघात व्हायच्याच, शिवाय ते खवय्ये होते, उत्तमोत्तम पदार्थ त्यांना खायला आवडत. एकदा पंडितजींसाठी माझ्या पत्नीने खास आपल्या पद्धतीचे श्रीखंड केले होते. त्याचा पहिला घास खातच ते एवढे खुश झाले आणि म्हणाले, “आजतक मैने बहोत जगह श्रीखंड खाया हैं, लेकीन ऐसा श्रीखंड पेहली बार चख रहा हूँ।’ खरेतर पंडितजींसोबत खूप आठवणींचा साठा आहे, लिहावा तेवढा कमीच...
 
 
आता तर पुढे फक्त त्यांच्या आठवणींवर आणि संस्कारांवरच जगायचे आहे. पण, जाता जाता एवढेच लिहिन की, जसे अर्जुनाला कृष्णाने विश्वरूप दर्शन दिले, तसे माझ्यासाठी माझे गुरुजी म्हणजे तशाच विश्वरूपदर्शनाची अनुभूती आहेत, ईश्वरी साक्षात्कार ज्याला ते म्हणतात ते कदाचित हेच असावे असे वाटते. कारण, त्यांच्या बरोबर वावरताना हे सर्व काहीतरी वेगळे आहे, गुरुजी सर्वांपेक्षा वेगळे आहेत, याची जाणीव सतत होत राहते.
 
 
जोपर्यंत आकाशात चंद्र-सूर्य-तारे आहे, जोपर्यंत विश्व आहे, तोपर्यंत पंडित शिवकुमार शर्मा हे नाव ध्रुवतार्‍याप्रमाणे अढळ आहे, अजरामर आहे...
 
- पंडित सतीश व्यास 
(शब्दांकन : वेदश्री दवणे)
 
अग्रलेख
जरुर वाचा
भांडूप परिमंडलात विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती कार्यक्रम

भांडूप परिमंडलात विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती कार्यक्रम

महावितरणच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ‘शुन्य अपघात महावितरण, शुन्य अपघात महाराष्ट्र’ ही संकल्पना घेऊन दि. १ ते ६ जून २०२५ या कालावधीत संपूर्ण राज्यात विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २ जून २०२५ रोजी रहिवासी परिसरात विद्युत सुरक्षा विषयी जनजागृती कार्यक्रम राबविण्याचे योजिले होते. त्याप्रमाणे, भांडूप परिमंडलातील ठाणे, वाशी व पेण मंडळातील प्रत्येक विभागीय कार्यालयांतर्गत विविध ठिकाणी विद्युत सुरक्षा बाबत जनजागृती कार्यक्रम करण्यात आले व सदर कार्यक्रमाला ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121