जसे ६० वर्षांपूर्वी पानशेतच्या पुरानंतर तत्कालीन लोकप्रिय पंतप्रधान पंडितजी नेहरू पुणे शहरात पहाणीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पुणे महानगरपालिका भवनाला भेट दिली होती, तो क्षण जसा स्मृतीत जपून ठेवला गेला, तेच वर्तुळ आता कालांतराने पूर्ण झाले! आजचेही सर्वात लोकप्रिय पंतप्रधान महापालिका भवनात आले, पुणे मनपाचा गौरव वाढवून गेले आणि जनमानसाच्या स्मृतिपटलावर आपली छबी मागे ठेवून गेले.
जवळजवळ १५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर-
अखेर मेट्रोराणी आली
पुणेकरांच्या अंगणी,
त्यात बसून सहकुटुंब...
सहपरिवारे गाऊ गाणी
अशी पुणेकरांची सध्या अवस्था झाली आहे. याचा प्रत्यय म्हणजे उद्घाटनानंतर आजपर्यंत मेट्रोने विक्रमी गल्ला जमवला आहे. गर्दी करून लोक मेट्रो प्रवासाचा भरभरून आनंद घेत आहेत, तो सुखद अनुभव इतरांनाही सांगत आहेत. यात छोट्या मुलांसारखाच निरागस आनंद ज्येष्ठ नागरिकांच्या मुखावर दिसतोय, तरुण-तरुणी असो की गृहिणी सर्वांचा उत्साह ओसंडून वाहतोय की, मेट्रोत बसून ही मंडळी ‘व्हिडिओ कॉल’ करून आपल्या प्रियजनांना मेट्रोबाईंसाहेबांच्या मनोहारी दर्शनाचा आनंद त्यांनाही घरबसल्या अनुभवायला देत आहेत. काही वृद्धांनी तर खूपच हृद्य प्रतिक्रिया दिली की, आमच्या हयातीत डोळ्यांना मेट्रो दिसेल की नाही असे वाटत होते, पण आज या आरामदायी गाडीत बसायला मिळाले, याचा आनंद काय सांगावा... गेल्या रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून फुलांची आकर्षक सजावट केलेल्या गरवारे स्थानकावरून मेट्रोचे उद्घाटन झाले, तेव्हापासून आजपर्यंत ज्याच्या-त्याच्या तोंडी ‘मेट्रो’ आणि ‘मोदी’ हे दोनच शब्द ऐकायला येत आहेत. मोदींनी मेट्रोची तपशीलवार घेतलेली माहिती, स्टेशन परिसर बघता बघता अचानक तिकीट खिडकीवर जाऊन स्वतःच्या पैशांनी ‘युपीआय’द्वारे ‘डिजिटल’ पद्धतीने तिकीट काढून खर्या अर्थाने केलेले उद्घाटन, पाच किलोमीटरच्या प्रवासातील वेळेचा सदुपयोग म्हणून आयोजित शालेय विद्यार्थ्यांशी हास्यविनोद करीत केलेल्या मनमोकळ्या गप्पा, तत्पूर्वी महापालिकेच्या आवारात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, कार्यक्रमानंतर उपस्थित अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी यांच्यामध्ये जवळ जाऊन अचानक साधलेला अनौपचारिक संवाद, मुख्य जनसभेतील भाषणास मराठीतून केलेली सुरुवात, या सर्वच गोष्टींची चर्चा शहरभर रंगली होती.
राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक यांच्या परस्परविरोधी क्रिया-प्रतिक्रियांचा यानिमित्ताने कितीही धुराळा उडाला असला, तरी सामान्य माणसाला देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान असलेली पंतप्रधानहदावरील व्यक्ती आपल्या शहराला भेट देणार, विकासकामांचे उद्घाटन करणार, या गोष्टीचे अप्रुप वाटायचे ते वाटणारच! जसे ६० वर्षांपूर्वी पानशेतच्या पुरानंतर तत्कालीन लोकप्रिय पंतप्रधान पंडितजी नेहरू पुणे शहरात पहाणीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पुणे महानगरपालिका भवनाला भेट दिली होती, तो क्षण जसा स्मृतीत जपून ठेवला गेला, तेच वर्तुळ आता कालांतराने पूर्ण झाले! आजचेही सर्वात लोकप्रिय पंतप्रधान महापालिका भवनात आले,पुणे मनपाचा गौरव वाढवून गेले आणि जनमानसाच्या स्मृतिपटलावर आपली छबी मागे ठेवून गेले. पुणे मेट्रो पायाभरणी समारंभाचे उद्घाटन विशेष म्हणजे, मोदीजींच्याच हस्ते झाले होते आणि आता हा प्रकल्प पूर्णत्वाच्या एका टप्प्यावर आला असताना त्याचेही उद्घाटन मोदीजींच्या हस्ते होणे याला विशेष महत्त्व आहे. त्यानिमित्ताने विकासकामांचेही एक वर्तुळ पूर्ण झाले. अशाप्रकारचे प्रचंड आकाराचे महात्त्वाकांक्षी आणि मोठी आर्थिक गुंतवणूक असलेले बडे प्रकल्प जितके ठरल्यावेळी पूर्ण होतील, तितके फायदेशीर होतील आणि संबंधित यंत्रणेने झटून काम केले, तर हे शक्यही आहे, याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणून या प्रकल्पाकडे पाहावे, याकडे मोदीजींनी आपल्या भाषणातून उपस्थितांचे लक्ष वेधले.
पंतप्रधानांचा पुणे दौरा ठरल्यापासूनच त्यांच्यावर आरोप सुरू होते की, महापालिकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मोदीजी पुण्यातल्या अर्धवट कामांचे उद्घाटन करायला येत आहेत वगैरे... पण, मोदींच्या प्रत्येक कृतीबद्दल त्यांचे कट्टर विरोधक असेच ‘अर्धवट’ विश्लेषण करतात आणि फसतात. कारण, मोदीजी मात्र ‘फूल स्ट्रोक’ मारून मैदान ‘पूर्ण’ जिंकूनच जातात. कोणी मान्य करो किंवा न करो ’मोदी’ या नावाचं आणि ते नाव धारण केलेल्या व्यक्तीचं जनसामान्यांना अतीव आकर्षण आहे. अगदी तसंच चोखंदळ अशा पुणेकरांनाही ते आकर्षण वाटलंच! म्हणूनच ‘एमआयटी’ महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित सभेत नेहमीप्रमाणे गर्दीतून उत्स्फूर्त उमटणारा ‘मोदी...मोदी...मोदी’चा जयघोष वारंवार दुमदुमत होता. मोदींची एक झलक बघण्यासाठी, त्यांचे भाषण ऐकण्यासाठी, त्यांच्याशी बोलण्यासाठी, त्यांच्यासोबत ‘सेल्फी’ काढण्यासाठी लोकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. पहिल्या काही रांगांमध्ये बसलेल्या लोकांना, तर मोदीजींची छबी मोबाईलमध्ये सहज टिपता येत होती, पण कमाल म्हणजे दूर बसलेल्या लोकांनी जागोजागी लावलेल्या स्क्रीनवर दिसणार्या ‘इमेज’चे फोटो काढले. यात किशोरवयीन शालेय मुला-मुलींची संख्या जास्त होती. कुतूहलजन्य अशा या वयात मोदींच्या प्रतिमेचे आकर्षण साहजिकच म्हणावे लागेल. पंतप्रधानांचा दौरा ठरल्यापासून पुणे महापालिका झडझडून कामाला लागली. दोन-दोन किमींच्या अंतरावर स्वतंत्र अधिकारी नेमून त्यांच्या देखरेखीखाली रस्ते खड्डेरहीत गुळगुळीत झाले. आगमनाची सर्व तयारी जय्यत म्हणून सुशोभीकरण झाले. त्यांच्या प्रवास मार्गावर स्वच्छतेचे विक्रमी अभियान राबवले गेले. ‘पंतप्रधान येती शहरा...बदले शहराचा चेहरामोहरा’ हा अनुभव पुणेकरांना सुखावून जाणारा होता. नेहमीच असे उच्चपदस्थांचे पाय शहराला लागले तर बरे, असेही अनेकांना मनोमन वाटून गेले असेल.

पंतप्रधानांच्या शुभहस्ते होणार्या सर्व उद्घाटनांचे नियोजन काटेकोरपणे आखण्यात आले होते. महापालिका आवार, गरवारे कॉलेज ते वनाझ या मेट्रो स्थानकांच्या प्रत्यक्ष उद्घाटनानंतर, एमआयटी कॉलेज प्रांगणातील जनसभा, सिम्बॉयसिस कॉलेज- लवळेचा कार्यक्रम इ. सर्व ठिकाणी पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार्या समारंभाचे शिस्तबद्ध पूर्वनियोजन जाणवत होते. पिंपरी-चिंचवड महापालिका ते फुगेवाडी या मार्गिकेचे उद्घाटन, त्याचबरोबर मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाचे उद्घाटन, नदी सुशोभीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन, इलेक्ट्रिक बस आणि त्या बसडेपोचे उद्घाटन, आर.के. लक्ष्मण आर्ट गॅलरीचे उद्घाटन ही सर्व औपचारिकता दूरदृश्यप्रणालीद्वारे संपन्न झाली. या सर्व विकासकामांतील प्रत्येक प्रकल्प अनोखा असून पुणेकरांच्या भवितव्याचे सुंदर चित्र रेखाटणारा आहे. ज्या पुणे जिल्ह्यात बाल शिवाजीवर जिजाऊ माँसाहेबांनी संस्कार केले, ज्या पुणे मावळात राजांनी नवतरूण वयात हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, त्या पुणे शहराच्या महापालिकेत महाराष्ट्राचे आदर्श दैवत असलेल्या या रयतेच्या राजाचा, थोर छत्रपती शिवरायांचा सिंहासनाधिष्ठित ब्राँझ पुतळा डौलात विराजमान असावा, ही गोष्ट पुणेकरांसाठी अभिमानास्पदच आहे. त्या देखण्या पुतळ्याचे अनावरण देशाच्या पंतप्रधानांच्या शुभहस्ते होणे, ही शहरवासीयांसाठी आनंदाची गोष्ट ठरली. पुणे मेट्रोबद्दल बोलायचे, तर गेली १२ वर्षे सुरू होऊन रखडलेला आणि तत्पूर्वी तीन वर्षे आधी सुरू होणार म्हणून चर्चेत असलेला हा प्रकल्प मार्गी लागताना सुरुवातीला जरी मेट्रो कमी अंतरावर धावणार असली, तरी लवकरच उर्वरित मार्ग पूर्ण करण्यास मेट्रो कंपनी कटिबद्ध आहे. जपान आणि फ्रान्सच्या सहकार्याने ज्या वेगात अलीकडे हे काम पूर्ण झाले त्याच वेगात उर्वरित काम पूर्ण होईल, अशी खात्री पंतप्रधानांच्या हस्ते झालेल्या उद्घाटन कार्यक्रमामुळे लोकांना पटणार आहे. यानिमित्त पुणेकरांना अत्याधुनिक सार्वजनिक वाहतुकीची ही सुखद सुविधा कायमची उपलब्ध झाली आहे. पुणे मेट्रोसाठी विशेषत्वाने सौरऊर्जेचा वापर होणार आहे. त्यामुळे दरवर्षी २५ हजार टन कार्बन ऑक्साईडचे उत्सर्जन कमी होईल. त्यातून पर्यावरणाची खूप मोठी हानी टळेल. हवेचे प्रदूषण होणार नाही आणि इंधन बचत तर साध्य होईलच, शिवाय, त्यामुळे आर्थिक भारही कमी होईल आणि लोकांचा लोकल प्रवास धूळ, धूर आणि प्रदूषण यापासून मुक्त होऊन ‘ट्राफिक’मध्ये अडकण्याच्या समस्येतून सुटका मिळेल. एका सुखद, सुरक्षित प्रवासाचा सुंदर अनुभव पुणेकरांच्या वाट्याला येणार आहे.
प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी लक्ष्मण यांची स्मृती म्हणून एक मोठी आर्ट गॅलरी उभारावी, अशी इच्छा मोदीजींकडे व्यक्त केली होती. ‘कॉमन मॅन’च्या भावना यथार्थपणे आपल्या रेषांमधून व्यक्त करणार्या लक्ष्मण यांचे पुण्याशी असलेले जिव्हाळ्याचे नाते लक्षात घेऊन हा प्रकल्प पुणे येथील बालेवाडीत अतिशय नेटकेपणाने पुणे महापालिकेने साकारला आहे. लक्ष्मण यांच्या कुटुंबीयांच्या कल्पनेनुसार व त्यांच्या देखरेखीखाली हे काम व्हावे, याची दक्षता घेण्यात आली. हे काम पूर्ण होईपर्यंत मोदीजींशी सतत संपर्कात राहून लक्ष्मण यांच्या सूनबाईंनी या प्रकल्पाच्या उभारणीत मोलाचा वाटा उचलला आणि आता पूर्णत्वास गेलेल्या या आर्ट गॅलरीचे उद्घाटन मोदींच्याच शुभहस्ते झाले, याचा आनंद उभयपक्षी सारखाच आहे. पुण्याजवळील लवाळे येथे ‘सिम्बॉयसिस अभिमत आंतरराष्ट्रीय विद्यापीठा’च्या शैक्षणिक कार्यक्रमात मोदीजी सहभागी झाले होते. तिथे संस्थापक शा. बं. मुजुमदार यांच्या वयाचा मान राखून त्यांना भाषण करणे सुलभ व्हावे, यासाठी मंचावरची औपचारिकता बाजूला ठेवून त्यांना दिलेली आदराची, जिव्हाळ्याची वागणूक पंतप्रधानांच्या नेहमीच्या माणुसकीपूर्ण शैलीने उपस्थितांना भारावून टाकणारी होती. अशा तर्हेने पुणे महापालिका आयोजित अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या वैविध्यपूर्ण, नावीन्यपूर्ण अशा सर्व प्रकल्पांचा शुभारंभ, पायाभरणी इ. कार्यक्रम पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते झाल्याने पुणेकरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. ज्यांनी हा मोदीभेटीचा सुगम सोहळा प्रत्यक्ष अनुभवला, त्यांच्या स्मरणात तर तो चिरंतन होऊन राहीलच. येता प्रत्यक्ष शहरी पंतप्रधान, ते सर्व सिद्धीचे कारण... पंतप्रधान जसे ज्या राज्यात जातील, ती प्रादेशिक भाषा बोलतात, तसे त्यांच्या गुजरातीत त्यांच्या दौर्याचे वर्णन करायचं तर ते ‘आव्यो हमारे शेहरमां... आने लोकाना दिल जिती लिधे’.
- अमृता खाकुर्डीकर
amruta.khakurdikar@gmail.com