अध्यात्माच्या माध्यमातून संत साहित्यातील विचार जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम शरद पाटील करतात. त्यांनी संत साहित्यावर आतापर्यंत अनेक प्रवचने केली आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी...
सध्याचे जीवन हे धकाधकीचे झाले आहे. तणावमुक्त जीवनासाठी ‘अध्यात्म’ हा शब्द आधार देणारा आहे. प्रवचनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत अध्यात्म पोहोचविण्याचे काम शरद पाटील करीत आहेत. त्यांच्या या प्रवासाविषयी जाणून घेऊया... डोंबिवलीनजीक असलेल्या निळजे या गावात शरद पाटील राहतात. त्यांचे प्राथमिक शिक्षण निळजे येथील प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी सखाराम शेठ विद्यालयातून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. टिळकनगर विद्यालयातून त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले.
कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्या जीवनात खूप संघर्ष होता. त्यामुळेच त्यांनी बारावी झाल्यानंतर लगेचच नोकरी करण्याचे ठरविले. त्यांच्या प्रयत्नाला यश आले. त्यांना काटई-घारिवली ग्रामपंचायतीत नोकरी लागली. त्यानंतर 1983 ला कल्याण-डोंबिवली महापालिकेची स्थापना झाली आणि ग्रामपंचायत महापालिकेत विलीन झाली. त्यामुळे शरद पाटील ग्रामपंचायतीतून महापालिकेत 1 ऑक्टोबर, 1983 ला रुजू झाले. शरद हे सुरुवातीला लिपिक पदावर रूजू झाले होते. मात्र, ते करनिरीक्षक प्रभारी साहाय्यक आयुक्त पदावरून सेवानिवृत्त झाले. बारावी झाल्यानंतर आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना नोकरी करावी लागली होती.
पण अर्धवट राहिलेले शिक्षण ही सल त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. नोकरी करीत असताना त्यांना शिक्षणाचे महत्त्वदेखील समजले होते. 1988ला त्यांनी पदवी परीक्षेसाठी अर्ज भरला. मुंबई विद्यापीठातून त्यांनी कला शाखेतील पदवी संपादन केली. ‘लोकल गव्हर्नमेंट सर्व्हिसेस’ची परीक्षा दिली. त्यानंतर अकाऊंट्सचा एक डिप्लोमा त्यांनी केला. नोकरीत असताना त्यांनी तीन परीक्षा दिल्या होत्या. या शिक्षणामुळे त्यांना नोकरीत बढती मिळण्यासाठीदेखील फायदा झाला. आई-वडील आणि शरद यांच्यासह सहा भावंड त्यांच्या कुटुंबात होती. त्यांची आई गणूबाई ही घरकाम करीत असे, तर वडील रामचंद्र हे स्वातंत्र्यपूर्व काळात लोकल बोर्डाच्या शाळेत शिक्षक होते. त्यांची थोडीफार शेती असल्याने ते शेतीव्यवसायही करीत असत. शरद यांचे शिक्षण शेतीव्यवसाय करतच त्यांनी पूर्ण केले. शाळा सांभाळून ते नांगरणी वगैरे अशी शेतीतील कामे करीत असत.
शरद पाटील यांना लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती. वयाच्या 24व्या वर्षी त्यांनी संगीत िोशकण्यास सुरुवात केली. त्यासाठी ते वरळीला जात असत. शिवरामभाऊ वरळीकर यांच्याकडे त्यांनी संगीताचे धडे गिरविले. शरद यांचे वडील माळकरी होते. तसेच ते न चुकता दरवर्षी पंढरीची वारी पायी करीत असे. अध्यात्माशी शरद यांच्या घराचा एवढाच काय तो संबंध होता. पण शरद यांना आध्यात्मिक ओढ असल्याने त्यांनी भजन आणि प्रवचन यांचे कार्यक्रम करण्यास सुरूवात केली होती. नोकरी करीत असताना प्रवचनासाठी फारसा वेळ मिळत नव्हता. पण जसे शक्य होईल, तसे त्यांनी प्रवचनाचे कार्यक्रम केले. सेवानिवृत्तीनंतर त्यांना कार्यक्रम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळू लागला. त्यामुळे सध्या ते मोठ्या उत्साहात कार्यक्रम करीत आहेत. सेवानिवृत्तीनंतर ते आध्यात्मिक क्षेत्राकडे जास्त ओढले गेले.
आचार्य प्रल्हादशास्त्री महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ते प्रवचन सेवा देत आहेत. सहा महिन्यांपासून प्रवचन देण्यास सुरूवात केली असून आतापर्यंत25 ते 30 प्रवचनांचे कार्यक्रम केले आहेत. शरद यांची मित्रमंडळीही आध्यात्मिक क्षेत्रातील होती. त्यामुळे शरद हेदेखील आध्यात्मिक क्षेत्रात जास्त ओढले गेले. अनंतबुवा भोईर यांच्या प्रवचनात शरद यांनी निरूपण करावे, असा त्यांचा आग्रह असायचा. निरूपण करण्यासाठीचे मार्गदर्शन त्यांना अनंतबुवा करीत असत. भजन आणि प्रवचनाच्या निमित्ताने त्यांना अनेक ठिकाणी जाण्याचा योग आला.
आळंदी, पंढरपूर, इंदौर, मध्य प्रदेश, दिल्ली अशा महाराष्ट्रातील विविध ठिकाणी त्यांनी गायनाचे कार्यक्रम के लेआहेत. शरद हे भजनदेखील गातात. या भजन आणि प्रवचनाच्या माध्यमातून संतसाहित्यातील विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहे. अनंतबुवा भोईर आणि शरद पाटील या दोघांनी एकत्र येऊन ज्ञानेश्वर प्रासादिक भजनी मंडळाची स्थापना केली होती. साधारण 20 वर्षांपूर्वी त्यांनी या भजनी मंडळाची स्थापना केली होती. अनंतबुवा यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. सध्या शरद पाटील या मंडळांची धुरा सांभाळत आहे.
तणावमुक्ती यासाठी जीवनात अध्यात्म हा एकमेव आधार देणारा शब्द आहे. प्रवचनाच्या माध्यमातून संत साहित्याचे विचार लोकांपर्यंत नेण्याचे काम ते सध्या करीत आहेत. तरूणपिढी अध्यात्माकडे वळते, पण त्यांचा देवावर फारसा विश्वास नाही. ही तरूण पिढी केवळ संकटांच्या काळात देवावर विश्वास ठेवते. सुखात त्यांना देव आठवत नाही. तरुण पिढी ही कर्तृत्वावर विश्वास ठेवणारी आहे. आपण केले असेच त्यांना वाटते. अहंभाव त्यांच्यात आहे. कोणत्याही अनामिक शक्तीवर त्यांचा विश्वास नाही, असेही शरद यांनी सांगितले. महाराष्ट्र वारकरी संप्रदायाचे मंडळ कल्याण तालुका संचालक म्हणून त्यांची निवड झाली आहे. त्यावेळी महाराष्ट्र वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष हभप प्रकाश महाराज जवणजाळ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला होता. आध्यात्मिक क्षेत्राचा वारसा जपणार्या या निरूपणकाराला दै. ‘मुंबई तरूण भारत’कडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...!