बामसेफ (BAMCEF) प्रणित भारत मुक्ती मोर्चा संघटनेने नागपूर मध्ये संघ कार्यालयाला मोर्चा काढण्यासाठी आंदोलन पुकारले होते. धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि विजयादशमी दसरा असल्याने पोलिसांनी भारत मुक्ती मोर्चाला परवानगी नाकारली नंतर न्यायालयाने (नागपूर खंडपीठाने) देखील भारत मुक्ती मोर्चाच्या परवानगी नाकारली होती. मात्र वामन मेश्राम आणि त्यांच्या संघटनेने नागपुरात ठिकठिकाणी बेकायदेशीररित्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे पोलिसांनी बामसेफचे अध्यक्ष वामन मेश्राम सकट अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
भारतीय संविधानासमोर व राष्ट्रवादासमोर आव्हान म्हणून उभ्या असलेल्या फुटीरतावादी शक्ती दिवसेंदिवस अधिक आक्रस्ताळ्या व अराजकवादी भूमिका घेताना व आंदोलने करताना दिसत आहेत. यातील एक आघाडीची देशव्यापी फुटीरतावादी संघटना म्हणजे बामसेफ (‘बॅकवर्ड क्लास अँड मायनॉरिटी कम्युनिटी एम्प्लॉइज फेडरेशन’ - BAMCEF). CCA, शेतीविषयक कायदा, सर्जिकल स्ट्राइक, नवीन शैक्षणिक धोरण, कोविड महामारी, राममंदिर, EVM अशा अनेक विषयांत बामसेफची भूमिका विरोधी, दिशाभूल करणारी आणि अराजकवादी राहिलेली आहे.
आंबेडकरवाद व संविधानविरोधी ‘मूलनिवासी बहुजनवाद’ या भ्रामक संकल्पनेच्या पायावर बामसेफ ही फुटीरतावादी संघटना उभी व सक्रिय आहे. सोईस्कर, अर्धवट व खोटा इतिहास मांडायचा व त्याद्वारे फुटीरतावादी मांडणी करून समाजात फूट पाडायचे, सामाजिक द्वेष, तणाव व अराजक वातावरण निर्माण करण्याचे काम बामसेफ संघटना व त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले वामन मेश्राम करताना दिसतात. या कामात बामसेफप्रणीत माध्यमे, समाज माध्यमे आणि इतर राष्ट्रवाद व हिंदुत्वविरोधी माध्यमे मोठी भूमिका पार पाडताना दिसतात.
विविध राष्ट्रीय विषयांत बामसेफची विरोधी व अराजकी भूमिका
CAAकायद्याला विरोध करताना वामन मेश्राम यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या लेखामध्ये अवास्तव व काल्पनिक शक्यता मांडत CAA कायद्याला मोदी सरकारचे षड्यंत्र असल्याचे म्हटले. उअअविरोधी आंदोलनांमध्ये बामसेफने सक्रिय सहभाग घेतला. बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांची पुलवामा घटनेसंदर्भातील सरकारविरोधी भूमिकेची दखल तर थेट पाकिस्तानी मीडियाने भारतविरोधासाठी घेतली होती. एक प्रकारे देशाचे पंतप्रधान व भारतीय सेना यांच्यावर संशय निर्माण करणारी देशविरोधी भूमिका बामसेफने घेतली होती. न्यायालयात रामजन्मभूमीचा निकाल लागला, नंतर राममंदिर भूमिपूजन झाले, याच वेळी बामसेफने एक आंदोलन चालवले की, अयोध्या हे साकेत बुद्धस्थळ आहे व याविषयी एक याचिकाही काही व्यक्तींनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने यांची अयोध्या संदर्भातील याचिका फेटाळली व उलट त्यांना दंड ठोठावला होता. मात्र या साकेत आंदोलनातून बामसेफने फुटीरतावादी प्रचार केला. कोविडची दुसरी लाट सुरू असताना बामसेफ संघटनेने EVM प्रतिकृती जाळण्याचे आंदोलन केले. सध्यातरी कोणताही राजकीय पक्ष EVM विरोधी भूमिका घेताना दिसत नाही.
तसेच प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी निवडणूक आयोगाने र्शीांबरोबर EVM यंत्राचा उपयोग सुरू केलेला आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांनी वेळोवेळी र्शीां हे सुरक्षित असल्याचे सप्रमाण स्पष्टीकरण दिलेले आहे. तसेच अनेक राज्यांत विविध पक्षांचे सरकार आहे. असे असताना लोकशाही प्रक्रियेवरच संशय निर्माण करायचा आणि सामान्य लोकांची दिशाभूल करून त्यांना रस्त्यावर उतरवायचे, असे अराजकी षड्यंत्र बामसेफ करत आलेले आहे. शेतकरी आंदोलनाला बामसेफचा जाहीर आणि सक्रिय पाठिंबा आहे. कोविड लससंदर्भातसुद्धा समाजात संभ्रम, संशय निर्माण होईल अशी भूमिका बामसेफच्या ‘मूलनिवासी नायक’ (MN News) या न्यूज पोर्टलद्वारे मांडण्यात आलेली आहे. 03 मे 2021 रोजी एका लाइव्ह चर्चेत वामन मेश्राम म्हणाले की, “जनउद्रेक होऊ नये, म्हणून मोदींची कोरोना महामारी थांबण्याची इच्छा नाहीये..” तसेच चछ न्यूज पोर्टलने तर अशी बातमी चालवली की, ‘कोरोना लसीच्या नावाने मूलनिवासी लोकांच्या डीएनएमध्ये छेडछाड? शासक ब्राह्मणवर्गाचे षड्यंत्र तर नाही ना!’ अशा प्रकारे तथ्यहीन अराजकी विषय पेरले जातात. एकूणच राष्ट्रवादी विचार व केंद्र सरकार यांच्याविरोधी जे जे काही करता येईल ते ते करण्याचे काम बामसेफ व त्याच्या सहयोगी फुटीरतावादी संघटना व त्यांचे नेते करताना दिसतात.
संविधान व आंबेडकरवादविरोधी भ्रामक ‘मूलनिवासी’ संकल्पना
बामसेफ संघटनेचा पायाच फुटीरतावादी, संविधानविरोधी व द्वेषपूर्ण अशा भ्रामक संकल्पनेवर आधारलेला आहे. लोकसत्ताचे वरिष्ठ पत्रकार मधू कांबळे यांनी मार्च 2013मध्ये लोकसत्ता वृत्तपत्रात एक लेख लिहिला होता. त्या लेखाचा मथळा होता ‘आंबेडकर विरुद्ध मूलनिवासी.’ या लेखात ते मूलनिवासी या संकल्पनेबद्दल लिहतात, ‘मूलनिवासी ही मांडणीच मुळात द्वेषावर आधारित आहे, म्हणून ती महाभयंकर आहे. उदाहरणार्थ, बामसेफचे उद्दिष्ट काय? तर मूलनिवासी या तथाकथित सिद्धान्ताच्या आधारावर या देशातील ब्राह्मणवर्ग सोडून साडेसहा हजार जातींना जोडणे. या साडेसहा हजार जातींचे कडबोळे बांधून काय करायचे? तर म्हणे राष्ट्रीय आंदोलन! म्हणजे काय, तर काहीच नाही.’ पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखाणाचा संदर्भ देत कांबळे लिहितात, ‘आपले आणि परके असले भेदाचे राजकारण करणार्यांनी बाबासाहेब काय म्हणतात ते नीट एकदा समजून घ्यावे. ते म्हणतात, विभिन्न वंशांचा निर्णय करण्याचे वांशिक शरीररचनाशास्त्र हेच खरे शास्त्र असेल, तर हिंदू समाजातील विभिन्न जातींना या शास्त्राची कसोटी लावून पाहिल्यास अस्पृश्य हे आर्य आणि द्रविड वंशापेक्षा भिन्न वंशाचे लोक आहेत, हा सिद्धान्त कोलमडून पडतो. या मोजमापावरून हे सिद्ध होत आहे की, ब्राह्मण व अस्पृश्य हे एकाच वंशाचे लोक आहेत. जर ब्राह्मण आर्य असतील तर अस्पृश्यही आर्यच आहेत. ब्राह्मण जर द्रविड असतील तर अस्पृश्यही द्रविडच आहेत.
ब्राह्मण नागवंशाचे असतील तर अस्पृश्यही नागवंशाचे आहेत.’ त्या आधारावर अस्पृश्यतेला वंशभेदाचा आधार नाही, असा निष्कर्ष बाबासाहेबांनी काढला आहे. चतुर्वर्णव्यवस्थेत अस्पृश्य या अवर्णाची उपपत्ती कशी झाली, त्यालाही कोणता संघर्ष कारणीभूत आहे, हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. परंतु बाबासाहेबांनी येथील सर्व समाजव्यवस्थेचे मूळ शोधून काढले आहे, शूद्र पूर्वी कोण होते हे सांगितले, अस्पृश्य मूळचे कोण होते, याचीही सैद्धान्तिक उकल करून दाखवली. मग बामसेफ आता कोणत्या मूलनिवासींचा शोध घेत आहेत? बाबासाहेबांच्या संशोधनावर-सिद्धान्तावर त्यांचा विश्वास आहे की नाही? दुसरे असे की, बाबासाहेबांनी आम्ही कोण याचे मूळ शोधून या समाजाच्या हातात जगाने स्वीकारलेला बुद्ध दिला. बुद्ध द्वेषाला मूठमाती द्यायला सांगतो.
बुद्ध समता, न्याय, बंधुभाव, मैत्री, करुणा यांचा आग्रह धरतो. बुद्ध जगाच्या - मानवाच्या कल्याणाची भाषा करतो. मग एखाद्या देशात वंशभेदाच्या आधारावर मूळचे कोण व उपरे कोण अशी विभागणी करणे कितपत योग्य आहे? बाबासाहेबांना जातिव्यवस्था मोडायची होती. बामसेफला जाती मोडायच्या आहेत की जोडायच्या आहेत? फक्त जाती जोडायच्याच असतील तर ते आंबेडकरी विचाराच्या विरोधात आहेत, असे म्हणावे लागेल. अशा प्रकारे मूलनिवासी नावाची भ्रामक संकल्पना आंबेडकरवादविरोधी आहे. तसेच ही संकल्पना समाजात फूट पाडणारी आणि द्वेष पसरवणारी असल्याने संविधानविरोधीसुद्धा आहे. संविधानाच्या प्रास्ताविकेची सुरुवातच आम्ही भारताचे लोक... अशी आहे. यात ‘आम्ही’ म्हणजे सर्व जाती, पंथ, धर्माचे भारतीय नागरिक येतात. त्यामुळे मूलनिवासी आणि बाहेरचे ही मांडणी समाजविघातक आहे आणि संविधानविरोधी आहे.
इतिहासाची तथ्यहीन, खोटी आणि फुटीर मांडणी
इतिहासातील मढे उकरून काढणे असे इतिहास अभ्यासकांविषयी म्हटले जाते. परंतु बामसेफचे पक्षकार (इतिहासकार नव्हे) लोक मात्र त्यांच्या फुटीरतावादी धोरणाला अनुकूल असे इतिहासातील नसलेले मढे उकरून काढतात. बामसेफचे एक लेखक विलास खरात यांनी अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. त्यातील एक पुस्तक ‘1818चे स्वातंत्र्याचे बंड’ या पुस्तकात ते लिहितात, ‘पंडित जवाहरलाल नेहरू, गोळवलकर, श्रीपाद अमृत डांगे, कॅ.पै. सविता कबीर, डॉ. मालवणकर या ब्राह्मणांनी कट रचून योजनाबद्ध पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची हत्या केली.’ (पृ.181.) विशेष म्हणजे या विषयावर खरात यांनी तीन खंडांत लिखाण केले आहे. म्हणजे बघा - काँग्रेस, संघ-भाजपा, कम्युनिस्ट आणि आंबेडकरांच्या दुसर्या पत्नी अशा परस्परविरोधी व भिन्न विचारांच्या नेत्यांनी एकत्र येत कट रचून भारतरत्न डॉ. आंबेडकरांची हत्या केली म्हणणे हे किती हास्यास्पद आहे.
परंतु असे कंत्राटी लिखाण बामसेफ सातत्याने करते. त्यासाठी तथ्य मांडले जात नाही, तर काल्पनिक स्टोर्या रचल्या जातात. आणि यातून समाजात फूट पडण्याचे, द्वेष पसरवण्याचे काम केले जाते. 28 डिसेंबर 2017ला छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी असलेल्या वढू गावात एक वादग्रस्त, खोट्या ऐतिहासिक माहितीचा फलक बामसेफ कार्यकर्त्यांच्या मदतीने तेथील काही लोकांनी लावला. त्यावरून गावात दोन समाजांत मोठा वाद झाला, गुन्हे दाखल झाले, समाजमाध्यमांतून जातवादी मेसेज पसरले गेले आणि पुढे 1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा येथे दंगल झाली. या हिंसाचाराच्या घटनेत एल्गार परिषद आयोजक व प्रतिबंधित कम्युनिस्ट माओवादी संघटनेशी संबंधित काही लोकांना अटक झालेली आहे. कोरेगाव भीमा घटनेच्या संदर्भात बामसेफच्या फुटीरतावादी भूमिकेचीसुद्धा सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
बामसेफ ही देशव्यापी संघटना आहे. बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, तसेच विद्यार्थी, वकील, डॉक्टर, आदिवासी, अल्पसंख्याक घटकांसाठी विविध शाखा आहेत. बामसेफ खलिस्तानी नेत्यांचे समर्थन व उदात्तीकरण करतात. वामन मेश्रामला एकदा अटक झाली, तर मुस्लीम कट्टरतावादी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा (PFI चा) नेता त्या अटकेचा निषेध करतो. खलिस्तानी, PFI, ब्रिगेड अशा अनेक फुटीरतावादी संघटनांशी बामसेफचे लागेबांध आहेत. सांविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी बामसेफसारख्या समाजविघातक संघटनेच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे. बामसेफ संघटना समाजात अराजक माजवण्याची कोणतीही संधी सोडत नाही. समाजातील सजग संस्थांनी व नागरिकांनी माध्यमांतून, समाजमाध्यमांतून, कायदेशीर सक्रियतेने, समाजप्रबोधन, कार्यक्रम-उपक्रमाद्वारे या फुटीरतावादी शक्तींना सातत्याने विरोध करणे व यांचे कुटिल षड्यंत्र हाणून पाडणे आवश्यक आहे.
-सागर शिंदे