मुंबई, राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन शहरांमधील अंतर केवळ आठ तासांवर आले आहे . या दोन शहरांना जोडणाऱ्या बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या आणि महत्त्वाच्या टप्प्याचे लोकार्पण आज, गुरुवार दि.५ जून रोजी होणार असून इगतपुरी येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी ते ठाणे जिल्ह्यातील आमणे या ७६ किलोमीटर अंतराच्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. याचवेळी सायन-पनवेल मार्गावरील वाशी खाडी पुलावरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या नव्या खाडीपूल मार्गिकेचेही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्य समृद्धी महामार्गाचे काम तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात २०१९मध्ये सुरू करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा याअत्यंत महत्वाकांक्षी असा सुमारे ५५ हजार कोटी रुपयांचा रस्ते प्रकल्प आहे. सुरुवातीला नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटर अंतराच्या पहिल्या टप्प्याचे ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर येथे उद्घाटन केले होते.
त्यानंतर शिर्डी ते भरवीर या ७० किलोमीटर अंतराच्या टप्प्याचे २६ मे २०२३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. पुढे भरवीर ते इगतपुरी हा २५ किलोमीटर अंतराचा मार्ग मार्च २०२४मध्ये सुरू करण्यात आला. त्यानंतर आमणेपर्यंत पुढील टप्पा कधी सुरू होणार, याची प्रतीक्षा होती. हा मार्ग आज गुरुवार,दि. ५ जून रोजी लोकार्पण होत आहे. तसेच, लोकार्पणांनंतर लगेचच हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात येईल.
वाशीकडून मानखुर्द दिशेला येणाऱ्या खाडीपुलाचेही लोकार्पण
सायन-पनवेल मार्गावर मानखुर्द आणि नवी मुंबईला जोडण्यासाठी वाशी खाडीवर सहा पदरी पूल आहे. हा पूल १९९४ मध्ये वाहतुकीला सुरू करण्यात आला होता. मात्र,या रस्त्यावरील वाहतूक गेल्या काही वर्षात वाढली. त्यामुळे हा पूल अपुरा पडत आहे. परिणामी,वाशी टोल नाका भागात वाहनांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. हेच पाहता एमएसआरडीसीच्या माध्यमातून पुलाच्या दोन्ही बाजूला नव्या मार्गिकांची उभारणी करण्यात आली. मानखुर्दहून वाशीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी उभारण्यात येणारा पूल ऑक्टोबरमध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. वाशीकडून मानखुर्द दिशेला येणाऱ्या वाहनांसाठी उभारण्यात येणाऱ्या पुलाचेही काम पूर्ण झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते आज या पुलाचे उद्घाटन होणार आहे. या पुलामुळे वाशी खाडी पुलावर होणारी वाहतूक कोंडी टळणार असून, वाशी ते मानखुर्द हा प्रवासही जलदगतीने होण्यास मदत मिळणार आहे.
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.