मुंबई( प्रतिनिधी): जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील वन क्षेत्रात सुरू असलेले अतिक्रमण रोखण्यासाठी रावेर वन विभागाने कारवाई केली आहे. कुसुंबा, लोहारा आणि गारबर्डी या भागात आरोपींनी अवैध वृक्ष तोड केल्याचे समोर आले होते. निर्गुळी, रायमोनिया अशी झुडपे शेतीच्या उद्देशाने साफ करण्यात आली होती. या मुळे वन क्षेत्रातील झाडांच्या संख्येवर परिणाम झाला आहे. या क्षेत्रावर कोणतेही अतिक्रमण अद्याप उभे राहिलेले नाही. परंतु, या पुढे वृक्षतोड होऊ नये या साठी खबरदारी म्हणून वन विभागाकडून वृक्षतोडीच्या ठिकाणी जेसीबी मशिनच्या सहाय्याने सलग समतल चर (सीसीटी) खोदण्यात आले आहेत. हे अदमासे ८ हेक्टर क्षेत्रावर खोदण्यात आले आहेत.
वन विभागाची कारवाई सुरू असताना कुसंबा व लोहारा गावातील सुमारे ८० ते १०० लोकांच्या जमावने खोदकाम बंद पडण्याचा प्रयत्न केला. या नंतर जमावाचा आकडा आणि परिस्थिती लक्षात घेऊन सहाय्यक वनसंरक्षकांनी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेतला. ही कारवाई शनिवार दि. ०१ ऑक्टोबर रोजी यावल येथील उपवनसंरक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्बाई करण्यात आली. या कारवाईत प्रथमेश हडपे, सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) यावल वन विभाग, जळगाव, अजय बावणे, वनपरिक्षेत्र अधिकारी, रावेर, विक्रम पदमोर, वनपरिक्षेत्र अधिकारी, यावल पूर्व, सुनिल भिलावे, वनपरिक्षेत्र अधिकारी, यावल पश्चिम, भाईदास थोरात, वनपरिक्षेत्र अधिकारी, चोपडा, समाधान सोनवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वैजापूर, बडगुजर, वनपरिक्षेत्र अधिकारी, देवझिरी,आनंदा पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी, फिरते पथक व सर्व वनक्षेत्रातील कर्मचारी उपस्थित होते. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महसूल विभागाकडून जी. एन. शेलकर, न्याय दंडाधिकारी, ऐनपूर व्ही. के. शिरसाठ, तलाठी, ऐनपूर व पोलीस विभागाकडून सावदा पोलीस स्टेशन कर्मचारी, राज्य राखीव दल देखील उपस्थित होते.