भारतीय जंगलातील काही नर वाघांनी आपल्या शौर्याने आणि त्यांच्या नैसर्गिक वागण्याला परिस्थितीनुरूप मुरड घालत भारतीय जंगले प्रसिद्ध केली. त्यांना, त्यांच्या हालचालींना, त्यांच्या असंगत वागण्याला असंख्य व्याघ्रप्रेमींनी कॅमेर्यात आणि आपल्या मनात कायमचे बंदिस्त केले. अशाच काही नरोत्तमांची ही कहाणी.
मुंबई (अक्षता बापट) - नर वाघाची सत्ता स्थापनेसाठी चालणारी अस्तित्वाची लढाई कधीच सोपी नसते. पूर्ण वाढ झालेला नर वाघ भावंडात सगळ्यात पहिल्यांदा आपल्या आईपासून वेगळा होता. त्यानंतर इतर बहिणींपासून दूर जातो. त्याला स्वतःचे राज्य स्थापन करावेच लागते. हा निसर्गनियम आहे. तो राज्य स्थापन करण्याच्या प्रयत्नात आपल्या आईच्या आणि बहिणींच्या प्रदेशापासून खूप दूर फिरतो. एकतर त्याला कोणाचेच राज्य नसलेला भूभाग मिळतो आणि तिथेच तो स्थिरावतो किंवा कोणा दुसर्या प्रबळ वाघाच्या अमलाखालील भूभागावर राज्य करतो. मात्र, त्याला तो भूभाग जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी वाघासोबत युद्ध करावेच लागते. यामध्ये त्याच्या राणीलाही जिंकावे लागते. रक्तरंजित लढाया या कायम राज्य स्थापनेसाठी, विस्तारासाठी आणि स्त्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, वर्चस्व गाजवण्यासाठी लढल्या जातात. त्याला निसर्गातील या लढाया तरी अपवाद कशा असणार? पण, या सगळ्यामध्ये सर्वात कठीण असते मिळवलेले राज्य अबाधित राखणे. कारण, कधी कोणता आपल्यापेक्षा शक्तिशाली नर वाघ येऊन आपले कमावलेले साम्राज्य लुटेल याचा काहीच नेम नसतो. त्यासाठी राज्याच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी त्याला अखंड गस्त घालावी लागते. जे यात अयशस्वी होतात. ते कालांतराने दूर फेकले जातात आणि त्यातही टिकतात त्यांची नावे इतिहासाच्या पानांवर अजरामर होतात. अशीच काही वाघाची नावे आहेत, ज्यांनी आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी भारतातील जंगले समृद्ध केली आणि आपली नावे कायमची लिहून ठेवली. त्यांनी अस्तित्वाच्या अपरिहार्य लढाया लढल्या. मात्र, काही आयुष्याच्याही लढल्या आणि जिंकल्या. बंधवगडचा ’चार्जर’, ताडोबाचा ’येडाण्णा’, ’वाघडोह’, ’गब्बर’ आणि ’मटकासूर’, रणथंभोरचा ’डॉलर’ आणि पेंचचा ’रायकस्सा’ हे त्यांच्यातलेच काही.
बांधवगडचा 'चार्जर'
’चार्जर’चे मूळ नक्की माहित नाही. तो नक्की कुठून आला असावा, याबद्दल अनेक अंदाज आहेत. उद्यानातील अधिकारी त्याला पार्कच्या वेगळ्या भागातील मानतात. 1991 मध्ये त्याने ’बाणक’ नावाच्या वाघाचा पराभव केला आणि ‘ताला झोन’मध्ये आपल्या भूभागाचा दावा केला. जवळपास एक दशक (1991-1999) तो तिथला अनभिषिक्त राजा होता. शेवटच्या दिवसांतही त्याची दहशत कायम होती. बांधवगढच्या इतिहासात जसे ’चार्जर’चे महत्त्व कोणी नाकारू शकत नाही तसे ’सीता’ या वाघिणीचेदेखील आहे. तिने त्याची आजीवन साथ दिली. येथील व्याघ्रसंवर्धनाची यशोगाथा मातृश्रेष्ठ सीतेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. तिने आपल्या 17 वर्षांच्या आयुष्यात सहा वेळा पिल्लांना जन्म दिला. 1995-1998 दरम्यान ’चार्जर’ने हद्दीसाठी आणि ’सीता’साठी खूप लढाया लढल्या. परंतु, तो इतका समर्थ्यशाली होता की, कोणाचीही त्याला हरवून त्याचे राज्य आणि सीतेला जिंकायची हिंमत झाली नाही. 1992 मध्ये तिने त्यांच्या पहिल्या पिल्लांना जन्म दिला. त्यामधील एकाचे नाव ’बडा बच्चा.’ तो मजबूत आणि ताकदवान होता. दुसर्या मात्र पायाने थोडा अपंग होता. त्याच नाव ’लंगरू.’ साधारण एक नर वाघ दुस़र्या नर वाघाला तो स्वतःचा मुलगा असला, तरी आपल्या राज्यात राहू देत नाही. मात्र, ’लंगरू’च्या बाबतीत ’चार्जर’मधला बाप जागा झाला. आपल्या मुलाला असलेल्या व्यंगामुळे तो स्वतंत्रपणे राहू शकत नाही आणि बाकी नर वाघांपासून त्याला असलेला धोका ओळखून तो चार वर्षांचा होईपर्यंत त्याचा सांभाळ केला. त्याचे हे वागणे त्याला बाकी नर वाघांपासून तो वेगळा होता हेच सांगते. 29 सप्टेंबर, 2000 रोजी ’चार्जर’ने अखेरचा श्वास घेतला.
ताडोबाचे शूर
बांधवगड आणि पेंचमध्ये साधारण एक दशक तिथल्या प्रबळ सम्राटाने राज्य केले. मात्र, ताडोबाची युद्धभूमी वेगळी आहे. इथे गेल्या दशकात ’येडाण्णा’, अजस्त्र ’वाघडोह’, आक्रमक ’गब्बर’ आणि शक्तिशाली ’मटकासूर’पर्यंत सगळ्या सामर्थ्यवान नर वाघांनी राज्य केले. ताडोबाच्या साम्राज्याचा मुकूट नेहमीच काटेरी राहिला आहे. इथे आपले राज्य टिकवण्यासाठी टोकाची स्पर्धा आहे. ’येडाण्णा’ जो एकेकाळी मोहर्ली परिक्षेत्रावर राज्य करत होता, त्याला ’वाघडोह’ने बाहेर हुसकावून लावले. त्याच्या आणि ’माधुरी’ नामक वाघिणीच्या पिल्लांना मारले. ’वाघडोह’ने ’माधुरी’बरोबर राज्य केले आणि आज जी ’तेलीया गँग’म्हणून ओळखली जाते. त्या ’सोनम’, ’गीता’, ’मोना’ आणि ’लारा’ या चार वाघिणींना जन्म दिला. ’वाघडोह’ या अस्तित्वाच्या लढाईत जखमी झाला होता. ’माधुरी’ने मोहर्ली परिक्षेत्र सोडल्यानंतर ’वाघडोह’ आपल्या प्रेयसीसाठी सिंहासनाचा त्याग करून तिच्या मागे निघून गेला. हे त्याचे वागणे त्याला इतरांपासून वेगळे अधोरेखित करते. त्याचा रिक्त झालेला प्रदेश ’बजरंग’ने ताब्यात घेतला. त्याच्या मोहर्ली प्रदेशात सध्या ’सोनम’सह आठ वाघिणी नांदत आहेत. ताडोबा प्रदेशात ’माया’ वाघिणीला जिंकण्यासाठी आणखी एक युद्ध लढले गेले. ’गब्बर’ आणि ’मटकासूर’मध्ये हे युद्ध झाले. ’मटकासूर’ने त्याचे शासन संपवताना जुन्या ’गब्बर’ला हुसकावून लावले. त्याच बरोबर ’सॅटर्न’ आणि ’टायसन’ नावाच्या अजून दोन नर वाघांशी संघर्ष केला. गेली चार वर्ष ’माया’ आणि ’मटकासूर’ ताडोबातले ‘स्टार कपल’ म्हणून जगले. ’माया’चे ‘मॉक मेटिंग’ आणि ’मटकासुरा’चे गनिमीकाव्याचे युद्ध कौशल्य त्याला कायम अतुल्य ठरवतात. आजही ताडोबा तख्तपालटाच्या उंबरठ्यावर आहे. नवीन राजा कोण, हे मात्र येणारा काळच ठरवेल.
पेंचचा ’रायकस्सा’
’रायकस्सा’ नराच्या शरीरावर ‘वाईन ग्लास’च्या चिन्हासारखी खूण आहे, या कारणास्तव त्याला ’सुला वाईन’वरून ’सुला’ नर नाव पडले. त्याचे क्षेत्र रायकसा भागात आहे. तो अजूनही पेंचमधील पर्यटन क्षेत्राच्या मोठ्या भागावर राज्य करतो आहे. हे राज्य टिकवण्यासाठी सतत संघर्ष करतो आहे. अजूनही तो मागील सहा वर्षे त्याच्या राज्याचा सम्राट आहे. त्याने आणि त्याची राणी ’कॉलरवाली’ने (उर्फ मातरम) पाच वेळा पिल्लांना जन्म दिला. ’कॉलरवाली’ने आतापर्यंत 26 पिल्लांना जन्म दिला आहे. हा वाघांच्या इतिहासामधील हा जागतिक विक्रम आहे. जंगलातल्या प्रत्येक यशस्वी वाघिणीच्या मागे तिचा नर वाघ असतो आणि वाघांच्या जगात हेच सत्य आहे. तिचा शक्तिशाली पुरुष आपल्या स्त्रीला पिल्लांना वाढवताना इतर वाघांपासून संरक्षण देत असतो हेच अपेक्षित संरक्षण ’रायकस्सा’ त्याच्या ’मातरम’ला देतो आहे. ’चार्जर’ आणि ’सीता’प्रमाणेच, ’रायकस्सा’ आणि ’कॉलरवाली’ पेंचला भरभरून देत आहेत आणि त्यांचा कार्यकाळ अद्याप संपलेला नाही.
रणथंभोरचा ‘डॉलर’
‘डॉलर’ (टी 25) रणथंभोरचा आक्रमक नर वाघ. इतर वाघांप्रमाणे त्याचे स्वतःचे असे क्षेत्र होते. त्याचा वेगळा दबदबा होता. त्याच्या अंगावर ‘डॉलर’सारखी खूण असल्याने त्याचे बारसे ’डॉलर’ या नावाने झाले. त्याची सहचारिणी ’काचीधा’ दोन मादी पिल्लांना जन्म देऊन 2011 मध्ये आजारपणात गेली. त्यानंतर मात्र बाकी नर वाघाच्या वागण्याला छेद देत ’डॉलर’ त्या पिल्लांच्या बापाबरोबर त्यांची आईसुद्धा बनला. एक आई पिल्लांना वाढवताना जे काही करते ते सगळे त्याने आपल्या मुलींसाठी केले. त्यांचे संगोपन केले. त्यांना शिकारीचे प्रशिक्षण दिले. त्या दोघी म्हणजे ’बिना 1’ आणि ’बिना 2.’ ’डॉलर’चे त्या दोघींबद्दल असणारे बापाचे प्रेम खूप लोकांनी पाहिले आहे. जानेवारी 2020 मध्ये ’टी-66’ या नर वाघाशी हद्दीसाठी झालेल्या लढाईत ’डॉलर’चा मृत्यू झाला. आजही रणथंभोर त्याच्या अतुलनीय प्रेमाची, त्याच्या पितृत्वाची आणि स्वीकारलेल्या मातृत्वाची साक्ष देत आहे.
याखेरीच कान्हाचा 'मुन्ना', कॉर्बेटचा 'खली' असे कितीतरी उल्लेख करायचा राहून गेलेले याच पंक्तीतले नर वाघ आहेत. या सगळ्यांमध्ये सारखेपण ते एकच त्यांनी भारतातील अनेक जंगलांमध्ये जीव आणला. त्यांना जगाच्या नकाशावर आणले. त्यांना प्रसिद्धी दिली. मात्र, प्रत्येकाची जगण्याच्या संघर्षाची अशी एक वेगळी कथा आहे, जी त्यांना इतरांपासून आणि एकमेकांपासून वेगळे करते.