व्यक्तिगत आणि व्यावसायिक स्तरावर सध्याच्या स्पर्धात्मक काळात यशस्वी होण्यासाठी स्वयंप्रेरणेसह प्रोत्साहित राहणे फार महत्त्वाचे असते. यातील अधिकांश भर हा व्यक्तिगत संदर्भात कर्मचारी तर संस्थागत संदर्भात कंपनी स्तरावर अवलंबून असते. व्यक्तीपासून व्यवस्थापन स्तरापर्यंत प्रत्येकाने प्रेरणा घेऊन व प्रेरित होऊन काम करण्यातच व्यावसायिक यश अवलंबून असते.
प्रत्येकाच्या आयुष्यात आपापल्या आवडीनुसार शिक्षण-प्रशिक्षण प्राप्त करणे हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असतो. यातूनच आपल्या आयुष्यातील रोजगार-व्यवसायाची दशा आणि दिशा ठरते. यालाच प्रचलित परिभाषेत ‘करिअर नियोजन’ असे म्हटले जाते व त्यावर प्रत्येक विद्यार्थी-उमेदवारच नव्हे, तर त्यांचे पालक, मार्गदर्शक या सार्यांचा आग्रही भर असतो. या सार्यांच्या पाठबळावर आपण आपला उद्योग-व्यवसाय वा नोकरीची सुरुवात तर करू शकतो. मात्र, या क्षेत्रात विविध प्रकारची आव्हाने, स्पर्धा, अस्थिरता यावर मात करून सातत्याने यश संपादन करायचे असल्यास, अशा जिद्दीला वैयक्तिक स्तरावर चालना देणेही तितकेच अपरिहार्य असते.
शैक्षणिक पात्रतेनंतर रोजगार वा व्यावसायिक योग्यता साध्य करणे व ते सिद्ध करणे अत्यंत आव्हानपर व महत्त्वपूर्ण ठरते. उदाहरणासह सांगायचे झाल्यास शैक्षणिक संदर्भात पदवी-पदव्युत्तर वा व्यावसायिक शैक्षणिक पात्रता ही पुढील आयुष्यातील रोजगार-व्यवसायासाठी आवश्यक असा ‘पासपोर्ट’ असतो, तर प्रत्यक्ष रोजगार-व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी प्रत्येकाला त्याच्या योग्यता-पात्रतेच्या ‘व्हिसा’ची गरज ही असतेच असते.
या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने आपल्या शैक्षणिक पात्रता व कौशल्यांसह करिअर-व्यवसायाची सुरुवात करताना आपल्याला नेमके काय व कशासाठी करायचे आहे, हे ठरवून त्याचा मागोवा घेत राहणे नितांत गरजेचे ठरते. असे केल्याने शिक्षण ते रोजगार-व्यवसाय या प्रारंभिक व महत्त्वपूर्ण स्थित्यंतरादरम्यान नेमके काय करावे व ते का आणि कशाप्रकारे करायला हवे, याबद्दल आपलेच आपल्याला मार्गदर्शन मिळण्याचा महत्त्वाचा फायदा होतो. या टप्प्यावर नोकरी-व्यवसायाच्या संदर्भात प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव नसल्याने अशा स्वतःच्या मागोवाचा मोठा फायदा होतो, हे लक्षात ठेवायला हवे.
त्यानंतर विशेषतः नवागतांनी आपल्या करिअरच्या पहिल्या व सुरुवातीच्या टप्प्यात करावे लागणारे कामकाज, त्याचे स्वरूप, कामाची जबाबदारी याची पुरती जाण आणि जाणीव वेळेत करून घेणे महत्त्वाचे ठरते. अशा नवागतांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव नसल्याने काम आणि जबाबदारी याचे विवरण-विश्लेषण करणे मार्गदर्शक ठरू शकते. याच्याच जोडीला कामकाजाचे छोट्या व विविध टप्प्यांमध्ये अभ्यासपूर्ण विवेचन केल्यास प्रत्यक्ष कामकाजासह करिअरची यशस्वी सुरुवात नक्कीच होऊ शकेल.
करिअर-व्यवसायाची सुरुवात करण्यापासूनच प्रत्येकाने आपल्या प्रयत्नांना आत्मविश्वासाची जोड द्यायला हवी. व्यक्तिगत स्तरावरील आत्मविश्वासामुळे पुढील आयुष्यातील प्रयत्नांना यशस्वी होण्यासाठी मोठे पाठबळ मिळते. त्याशिवाय शैक्षणिक पात्रता आणि प्रयत्न याद्वारे रोजगार-व्यवसायाची कास धरताना व या प्रयत्नांमध्ये विशेषतः स्पर्धेवर मात करून यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास असणे आवश्यक असते.
हा आत्मविश्वास त्याच्या नावाप्रमाणेच आपल्या स्वतःजवळ असतो. त्याची चाचपणी करून गरजेनुरूप उपयोग करणे हे देखील आपल्यावरच अवलंबून असते. मुख्य म्हणजे, एरवी औपचारिकरीत्या शैक्षणिक अभ्यासक्रमात व्यक्तिगत स्तरावरील आत्मविश्वासाचा समावेश नसला, तरी त्याची गरज आणि साथ पुढील कारकिर्दीसाठी अत्यावश्यक असते, याची खुणगाठ बाळगणे म्हणूनच महत्त्वाचे ठरते.
शिक्षण-प्रशिक्षण ही एक आयुष्यभर चालणारी व निरंतर प्रक्रिया आहे, हा मुद्दा व्यवस्थापक आणि व्यवस्थापन यांच्यासंदर्भात नेहमी वापरला जातो. हे तत्त्व वाचायला-ऐकायला बरे वाटत असले, तरी प्रत्यक्ष आचरण-अनुसरण मात्र सातत्याने व प्रयत्नपूर्वक करायला हवे. यासाठी करिअरच्या सुरुवातीच्या वा पहिल्या टप्प्यापासून आपल्या कामाला प्रत्यक्ष व बदलते काम आणि जबाबदारीनुरूप शिक्षण-प्रशिक्षणाची जोड देणे आपल्या वैयक्तिक व व्यावसायिक प्रगतीसाठी अवश्य पूरक ठरू शकते, यातूनच प्रत्येकाचा कौशल्यविकास पण होत असतो.
कामाच्या ठिकाणी काम न करण्याची चूक ही मोठी चूक समजली जाते, तर प्रत्यक्ष काम करताना होणार्या चुका समर्थनीय ठरू शकतात. यातूनच काम करणार्याला त्याचे काय आणि कुठे चुकले, ते उमजते व त्यावर वेळेत आवश्यक ती उपाययोजना केली जाऊ शकते. आपल्या कामाचे स्वरूप आणि दर्जा सुधारण्याचा हाच हमखास यशस्वी उपाय ठरतो. नोकरी-रोजगाराच्या सुरुवातीपासून सर्वसाधारणपणे या बाबीचा प्रत्यय येतो. नंतर जसजशी कामाची जबाबदारी आणि स्वरूप वाढते, तसतसा कामाच्या संदर्भातील कथित चुका आणि त्यावरील समुचित उपाययोजना-सुधारणा यांच्याशी संबंधित आयाम बदलत असला तरी कायमच असतो, हे यासंदर्भात उल्लेखनीय ठरते.
सध्याच्या व बदलत्या औद्योगिक-व्यवसाय स्थितीत काम आणि व्यावसायिक संदर्भात वैयक्तिक आणि संस्थागत संदर्भात स्पर्धेला तोंड देणे अपरिहार्य ठरते. व्यक्ती असो वा संस्था, जो सेवा-दर्जा-आर्थिक संदर्भात अव्वल व विश्वासू असेल, त्यालाच ग्राहकासह सर्वांची स्वाभाविकपणे प्रथम पसंती मिळते. विशेष म्हणजे, सध्या प्रत्येक क्षेत्रात एकाहून अधिक उत्पादक, वितरक, सेवा पुरवठादार उपलब्ध असतात. प्रत्येक जण आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम-सुधारित सेवा देतात व हे साध्य करणे आव्हानात्मक ठरते. यामध्ये कंपनी वा संस्थागत पातळीवरील या व्यावसायिक स्पर्धेमध्ये प्रत्येकाने आपल्या कामकाजासह स्पर्धात्मक स्वरूपात काम करणे, ही व्यावसायिक यशाच्या संदर्भात काळाची गरज ठरते.
परंपरागत स्वरूपातील कामकाजावरून स्पर्धात्मक, दर्जेदार व ग्राहक केंद्रित स्वरूपाचे काम करण्यासाठी काम करणारे कर्मचारी म्हणजेच माणूस आणि मानसिकता फार महत्त्वाचे ठरतात. माणूस आणि मानसिकता यांचा कार्यक्षम व निर्णायक स्वरूपात सकारात्मक समन्वय साधला, तर व्यक्तीपासून संस्थास्तरापर्यंत व्यावसायिक यश प्राप्त होऊ शकते. हे काम कठीण असले तरी अशक्य नसते. ही जाण आणि जाणीव कंपनी व्यवस्थापनापासून कर्मचारी स्तरापर्यंत निर्माण करून त्याला बदल आणि बदलाच्या व्यवस्थापनाची जोड देणे तेवढेच जरूरीचे असते.
व्यावसायिक स्पर्धेत केवळ टिकून न राहता, त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी निर्धारित वेळेत काम करून कामाला वेगाची जोड देणे निर्णायक ठरते. स्पर्धेत केवळ यशस्वी होणे पुरेसे नसून हे यश सक्षमपणे व वेळेत साध्य करणे, यावरच व्यावसायिक यश खर्या अर्थाने अवलंबून असते. त्यामुळे व्यावसायिक धोरणाची आखणी करण्यापासून त्याची नियोजित स्वरूपात व निर्धारित वेळेत पूर्तता करणे, ही बाब अत्यंत महत्त्वाची ठरते. व्यावसायिक यशस्वितेची तीच महत्त्वाची वाटचाल ठरते.
व्यक्तिगत आणि व्यावसायिक स्तरावर सध्याच्या स्पर्धात्मक काळात यशस्वी होण्यासाठी स्वयंप्रेरणेसह प्रोत्साहित राहणे फार महत्त्वाचे असते. यातील अधिकांश भर हा व्यक्तिगत संदर्भात कर्मचारी तर संस्थागत संदर्भात कंपनी स्तरावर अवलंबून असते. व्यक्तीपासून व्यवस्थापन स्तरापर्यंत प्रत्येकाने प्रेरणा घेऊन व प्रेरित होऊन काम करण्यातच व्यावसायिक यश अवलंबून असते, हे लक्षात घेऊन सामूहिक प्रयत्न झाले तर आव्हानपर स्थितीवर पण यशस्वीपणे मात करता येते.
- दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर व व्यवस्थापन सल्लागार आहेत.)