वैदिक परंपरा आणि साधना - भाग १७

    09-Dec-2021
Total Views | 113

vaidik].jpg_1  
वायुतत्त्वामध्ये प्रवेश करतेवेळी साधकाला छायापुरुषाची जी एक दिव्य अनुभूती येते तिचे हुबेहूब वर्णन रामायणात आलेले आहे. वायुसूत महाबली हनुमान जेव्हा समुद्र पार करून लंकेवर उड्डाण करण्याच्या तयारीत होते तेव्हा मार्गामध्ये त्यांच्या पडछायेला सिंहिका नावाची एक राक्षसीण आकृष्ट करीत होती. पडछायेला आकर्षित करण्यामुळे वायुसूत हनुमानसुद्धा त्या राक्षसीकडे आकृष्ट होऊ लागले. परंतु, कार्याला निघालेले वायुसूत त्या राक्षसीच्या पकडीत अधिक काळ फसले नाहीत.





ते सिंहिकेच्या मुखातून प्रवेश करून तिच्या कर्णातून बाहेर पडले आणि लंकेकडे प्रयाण करते झाले. वायुतत्त्वाकडे जाताना साधकाला अशा प्रकारच्या छायापुरुषाचा अनुभव येतो. आपले जे चार देह आहेत त्यात हा दुसरा सूक्ष्म अथवा लिंगदेह आहे. तो छायेसारखा दिसतो. काही साधक आपल्याच छायापुरुषाला वश करतात व त्यांच्याकडून दूरच्या वस्तू, उदा. मिठाई, बदाम, खारीक आदी वस्तू काढून दाखवितात व आपल्याच सूक्ष्मावस्था देहाला एका राक्षसी इच्छेने जखडून टाकतात, असे आसुरी वृत्तीचे साधक कधीही मायासागर पार करू शकत नाहीत. ज्याला मायासागर पार करावयाचा असेल, त्याने आपल्या इच्छारूप सिंहिका राक्षसीचे भक्ष्य बनता नये. त्यांनी वायुसूत हनुमानाप्रमाणे तिच्या कर्णातून बाहेर पडून मायारूप संसारसागर पार करून आपल्या ध्येयाकडे प्रगती केली पाहिजे. हनुमानजींनी हेच केले. रामायणाची ही कथा म्हणजे या दिव्य साधनानुभूतीचा इतिहास आहे.



महाभारताच्या कथेत गुंफलेले दिव्य वायुतत्त्वाचे वर्णन



 
वायुतत्त्वाच्या दिव्य अनुभवाबद्दल महाभारतातसुद्धा वर्णन आलेले आहे. साधकांनी लक्षपूर्वक समजून त्यातील साधना अनुभव घ्यावेत. भगवान वेदव्यासांनी आपल्याच जन्म कथेमध्ये वायुतत्त्वाच्या अनुभवांचे रहस्य सांगितलेले आहे. पराशर ऋषी व्यासांचे पिता. पराशर ऋषी एकदा गंगा पार करण्यासाठी गंगेच्या काठावर आले. तटावर एक धीवर होता. पराशर ऋषींनी धीवराला गंगापार करून देण्यास सांगितले. धीवराने आपली कन्या मत्स्यगंधा हिला पराशरांना गंगापार नेण्यास सांगितले. त्यावेळी मत्स्यगंधा केवळ सात वर्षांची होती. मुलीने गंगापार करण्यासाठी ऋषींना नावेत बसवून नाव चालू केली. नाव मध्यधारेत आल्यावर तपस्वी ऋषींचे मन त्या सात वर्षांच्या मुलीवर मोहित झाले व त्यांनी त्या सात वर्षांच्या मुलीपाशी समागमाची इच्छा व्यक्त केली. मुलगीसुद्धा फार धूर्त होती. तिने ऋषींना सांगितले की, ती केवळ सातच वर्षांची असल्यामुळे ऋषी तिच्याशी समागम कसा काय करू शकतील? तर त्यांनी तिचे शरीर पूर्ण षोडशवर्षीय करावे. ऋषींनी तिचे म्हणणे मान्य करून त्या सात वर्षांच्या मुलीला १६ वर्षांची बनविले. परंतु, तो दिवसाचा समय होता आणि मुलगी धीवर असली म्हणून काय झाले? तिच्या ठायी शालिनता व स्त्रीसुलभ लज्जा होतीच. तिची दिवसाढवळ्या समागमाची तयारी नव्हती. पण ऋषी? (होय ऋषीच!) तर कामातुर झालेले असल्यामुळे अधिक धीर धरायला तयार नव्हते. ‘कामातुराणां न भयं न लज्जा।’ तेव्हा त्या युवतीने सुचविल्याप्रमाणे ऋषींनी त्या दोघांभोवती घनदाट धुके म्हणजे धूम्र वायुमंडल उत्पन्न केले. एवढे गडद की, जवळपासचे काहीच दिसत नव्हते. नंतर पराशर ऋषींनी मत्स्यगंधेशी समागम केला.





वरवर पाहिल्यास ही कथा अश्लिल आणि अनैतिक दिसते. आपले आदर्श आणि आदरणीय ऋषी इतके अनैतिक होते काय? मुळीच नाही. मग या कथेत कोणते रहस्य भरले आहे? ते रहस्य वायुतत्त्वाच्या अनुभूतींचे आहे. जे साधक साधना करून वायुतत्त्वाच्या पलीकडील आकाशतत्त्वाकडे व त्यापलीकडेसुद्धा परातत्त्वाकडे जाऊ इच्छितात त्यांना भगवान व्यास ‘पराशर’ ऋषी असे म्हणतात. ‘परा’ अवस्थेला ‘शर’ मारणारा तो पराशर ऋषी. परातत्त्वाचा वेध करण्याविषयी उपनिषदात श्लोक आहे - ‘प्रणवो धनुःशरो ह्यात्मा ब्रह्मतल्लक्षम् उच्चते।’ पराशर ऋषी वायुतत्त्वाची गंगा पार करण्यास गंगेवर गेले आणि तेथे त्यांना सात वर्षाची धीवर बालिका मिळाली. धीवरांना सागर कसा पार करावा, हे ज्ञान आहे म्हणून सात वर्षांची बाला धीवर दाखविलेली आहे. संसारसागर पार करण्याच्या वेळी साधकही धीवर बनतो. बरे, बालिका सात वर्षीयच का? तर आपली काया सात यौगिक चक्रांचीच बनलेली आहे आणि जो साधक आपल्या कायारूप उपकरणाचा (पत्नीचा) योग्य उपयोग करेल, म्हणजेच उपभोग घेईल तो गंगासागर म्हणजे संसारसागर पार करू शकेल. नंतर तीच युवती १६ वर्षांची झालेली दाखविली आहे. याचा आशय हा की, साधक जोपर्यंत पूर्ण पुरुष बनत नाही तोपर्यंत तो परातत्त्वाप्रत पोहोचू शकत नाही. पूर्ण पुरुष होण्याकरिता त्याला षोडशकलायुक्त बनले पाहिजे, उपनिषद अशा पूर्ण साधकाला ‘षोडशकलापुरुष’ म्हणतात. म्हणून कथेमध्ये सात वर्षांच्या बालिकेला भोग घेण्यायोग्य १६ वर्षांची बनविलेली आहे. आता धुके किंवा धूम्र अवस्थेचे प्रयोजन काय? तर आपण पाहिले आहे की, वायुतत्त्वामध्ये प्रवेश करतेवेळी साधकाला आजूबाजूला गडद धुके दिसते. वायुतत्त्वाच्या या दिव्य अनुभूतीला उद्देशूनच भगवान व्यासांनी ‘पराशर-मत्स्यगंधा समागमा’च्यासमयी कथेत गडद धुके दाखविले. अशा आत्मभोगातून म्हणजेच आत्म्याच्या व परमात्म्याच्या मिलनातून वेद म्हणजे ज्ञान याचा व्यास म्हणजे विवरण करणारे भगवान वेदव्यास उत्पन्न होणार नाहीत का? व्यास म्हणजे ज्ञानवर्तुळाचा मधोमध छेद करणारी व्यासरेषा ((Diameter)) आहे. ही उच्च अवस्था म्हणजेच भगवान वेदव्यास होत.
अधिक दिव्य आणि जटिल अनुभव





आपल्या सुयोग्य साधनेद्वारे तत्त्वदर्शनाच्या मार्गावर आगेकूच करणार्‍या श्रेष्ठ साधकाला याहून जटिल अनुभव प्राप्त होतात. साधारण साधकाला या अनुभवाची प्राप्ती करण्यातच शरीर त्याग करावा लागतो म्हणजेच त्याचा मृत्यूही होऊ शकतो. वायुतत्त्वाचा साधक प्रकाशाच्या तीव्र वेगाने म्हणजे एका सेकंदाला १,८६,७०० मैल या गतीने निघून जातो. शरीराला प्रकाशाचा वेगच सहन करणे अशक्य आहे. वायुवेग जो एका क्षणात सर्व ब्रह्मांडाचा प्रवास करतो, तो त्याला कसा सहन होईल? प्रचंड, भयानक वेग जो एका क्षणाला सर्व विश्वाचे परिभ्रमण करतो! देहधारी जीवाला हा वेग असह्य आहे म्हणून वायुतत्त्वाचा अनुभव मिळविणारा साधक कोट्यवधींतून एखादाच असतो. त्यांना महाबली हनुमान, गरुड आणि नारद असे म्हणतात. हे सर्वजण एका क्षणातच तिन्ही लोकांची यात्रा करतात, असे दाखविले आहे. पुराणात वायुतत्त्वाचे कठीण अनुभव कथेच्या माध्यमातून वर्णन केलेले आहेत. एकाच काळी सार्वकालिक व एकाच स्थळी त्रिखंडाची यात्रा करणे हा वायुतत्त्वाचा अतिशय भयानक अनुभव आहे. (क्रमशः)



 योगिराज हरकरे
(शब्दांकन - राजेश कोल्हापुरे)




 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121