मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या राज्य सरकारने केला मज्जाव
विशाखापट्ट्णम: प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची विटंबना आणि मंदिरांवरील हल्ले आदींसारख्या गंभीर घटनांच्या निषेधार्थ रामतीर्थम् येथे जाण्यासाठी निघालेले भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि आंध्र प्रदेश भाजपचे प्रभारी सुनील देवधर यांची आंध्र प्रदेशमधील सरकारकडून अडवणूक करण्यात आली. देवधर हे विशाखापट्टणम येथे असताना त्यांना नोटीस बजावून रामतीर्थम् येथे जाण्यापासून मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या राज्य सरकारने मज्जाव केला.
या प्रकारानंतर सर्व स्तरांतून संताप व्यक्त करण्यात आला. याबाबत देवधर म्हणाले की, “मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी गुरुवार दि. ७ जानेवारी रोजी कहर केला. भारतीय जनता पक्षाच्या जनसेनेच्या कार्यकर्त्यांना रामतीर्थम् येथे जाताना त्यांनी पुन्हा एकदा अडवले. केवळ ५० जणांना तेथे जाण्यासाठी परवानगी आहे, असे कारण यावेळी देण्यात आले. "मी, विशाखापट्टणम येथे आलो आहे. मात्र, माझीही येथे अडवणूक करण्यात आली. मला नोटीस देण्यात आली की, तुम्ही रामतीर्थम् येथे जाऊ शकत नाहीत. वायसीपीचे खासदार विजय साई रेड्डी आणि चंद्राबाबू नायडू यांना तेथे जाण्यासाठी परवानगी मिळते. मात्र, आम्हालाच का अडवले जाते? हा भेदभाव कशासाठी?” असा सवाल त्यांनी विचारला आहे.
त्याचप्रमाणे ते म्हणाले की, “आम्हाला अडवणार्यांनी कदाचित महाभारताचा इतिहास हा व्यवस्थितरीत्या वाचला नसावा. कारण विजय साई रेड्डी आणि चंद्राबाबू नायडूंसारख्या नेत्यांना शेकडो जणांना हे सरकार परवानगी देते. मात्र, भाजपच्या पाच नेत्यांना देण्यात येत नाही. महाभारताच्या इतिहासाप्रमाणे विजय हा १०० कौरवांचा होत नसून, केवळ पाच पांडवांचा होतो, हे या सरकारने लक्षात ठेवावे,” असे ते म्हणाले.