आपले ईश्वरप्रदत्त दायित्व निभावण्यासाठी भारतवर्ष आपल्या चिरपुरातन नित्यनुतन चिरंजिवी शक्तीबरोबर उभे राहत आहे. (संघाच्या एका ज्येष्ठ प्रचारकांनी एका वाक्यात संघाचे पूर्ण वर्णन केले होते - RSS is the evolution of the life mission of this Hindu nation.) आतापर्यंत थांबलेले वा थांबवलेले सर्व आवश्यक कार्य व्हायला सुरुवात झाली आहे. संपूर्ण समाजाला सभान, सजग राहून सक्रिय व्हावे लागेल. हे तेच आत्मभान आहे, ज्यामुळे आवश्यक आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता अवश्यम्भावी आहे.
एका संघ गीतात म्हटलेच आहे -
अरुणोदय हो चुका वीर अब कर्मक्षेत्र में जुट जाएँ,
अपने खून-पसीने द्वारा नवयुग धरती पर लाएँ।
दि. ५ऑगस्ट, २०२०रोजी अयोध्येमध्ये श्रीरामजन्मभूमीस्थळी भव्य मंदिर निर्मितीसाठीच्या पायाभरणीचा नेत्रदीपक सोहळा संपूर्ण भारत आणि जगभरात पसरलेल्या भारतीय वंशाच्या लोकांनी आणि भारतप्रेमींना उत्साहाने पाहिला. अगणित लोकांना या दृश्याने एका स्वप्नपूर्तीचा अनुभव आणि आनंद दिला. कारण, प्रदीर्घ संघर्षानंतर ही उपलब्धी प्राप्त झाली होती. परिणामी असंख्य भारतीयांच्या चेहर्यावर समाधानाचे तेज आणि डोळ्यांत आनंदाश्रूही पाहायला मिळाले. कित्येक लोकांसाठी हा कार्यपूर्तीचा क्षण होता. परंतु, वास्तवात हा कार्यारंभाचा क्षण आहे. अनेकांच्या मते, ही केवळ मंदिरनिर्मितीच्या प्रारंभाची वेळ होती. परंतु, भारतीय परंपरा, चिंतन आणि दर्शन एकात्म आणि सर्वांगीण आहे. ते जीवनाकडे समग्रतेने पाहते. भारतात रिलिजन आणि सामाजिक जीवन एकदुसर्यापासून भिन्न नाही. या भारतीय दर्शनाने प्रत्येक व्यक्तीमध्ये ईश्वराचा अंश आहे, असे मानून त्या ईशतत्त्वाला प्रकट करत मोक्षप्राप्तीचे ध्येय मनुष्यासमोर ठेवले. आपल्या अंतर्गत आणि बाह्य प्रकृतीचे नियमन करत या ईशतत्त्वाला प्रकट करण्याचे मार्ग (रिलिजन) संबंधित व्यक्तीच्या क्षमता आणि रुचीनुसार अनेक आणि विविध असू शकतात आणि सर्वच समान आहेत-अशी भारतीय धारणा आहे आणि तसे भारत जगतही आला. भारताच्या याच इतिहासाचा संपूर्ण जगाने वेळोवेळी अनुभवही घेतला. परंतु, या आध्यात्मिक मार्गावर चालतानाही भारताने कधीही भौतिक संपन्नता आणि समृद्धीकडे दुर्लक्ष केले नाही. यासाठीच आपल्या चार पुरुषार्थांमध्ये धर्म आणि मोक्षाबरोबरच अर्थ आणि काम याचाही समावेश केलेला आहे. ‘उबंटू’ही एक आफ्रिकन संकल्पना असून त्याचा अर्थ ‘मी आहे. कारण, आम्ही आहोत,’ असा होतो. भारतातील धर्मकल्पनेचा आधारदेखील हाच आहे. मी, माझे कुटुंब, गाव, राज्य, राष्ट्र, मानवता, मानवेतर जीवसृष्टी, निसर्ग हे सर्वच परस्परांशी जोडलेले असून क्रमशः विस्तारित होणारी विविध एकके आहेत-ती एकात्म आहेत. यात परस्पर संघर्ष नाही, समन्वय आहे; स्पर्धा नाही, संवाद आहे. या सर्वच एककांचा समुच्चय म्हणजे आपले मानव जीवन आहे. हे सर्व आहेत म्हणून आपण सर्व आहोत. या सर्वांमधले संतुलन धर्म आहे आणि हे संतुलन राखणेदेखील धर्मस्थापना आहे.
भारताच्या या धर्मदृष्टीला केवळ रिलिजनपर्यंत मर्यादित ठेवणे जसे चुकीचे आहे, तसेच केवळ आध्यात्मापर्यंत सीमित ठेवणेदेखील अपूर्ण आहे. भारताने आध्यात्मिक साधना करताना कधीही भौतिक समृद्धीचा विरोध वा निषेध केलेला नाही. भारतीय दर्शनामध्ये ‘यतो अभ्युदय निःश्रेयस सिद्धिः स धर्मः।’ अशी धर्माची एक परिभाषा आहे. अभ्युदयाचा अर्थ भौतिक समृद्धी आणि निःश्रेयसाचा अर्थ मोक्ष असा आहे. अभ्युदय आणि निःश्रेयस या दोन्हीला सांधणे, यालाच धर्म म्हटले आहे. ईशावास्योपनिषदामध्ये भौतिक समृद्धीसाठी आवश्यक ज्ञानाला अविद्या आणि मोक्षप्राप्तीच्या ज्ञानाला विद्या म्हटले आहे. उपनिषदकार म्हणतात ः जे अविद्या आणि विद्या दोन्हीची उपासना करते, तेच पूर्ण जीवन आहे. व्यक्ती अविद्येच्या आधारावर मृत्युलोकाला सुखाने पार करते आणि विद्येच्या आधाराने अमरत्व (मोक्ष) प्राप्त करते.
विद्याञ्च अविद्याञ्च यस्तद् वेदोऽभयम् सह।
अविद्यया मृत्युम् तीर्त्वा विद्ययाऽमृतमश्नुते॥
हे संतुलन (balance) अथवा धर्म समजून घेण्याची विशेष गुणवत्ता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांद्वारे लाखो कंठांतून देशभरात दररोज गायल्या जाणार्या प्रार्थनेमध्ये समुत्कर्ष (अभ्युदय) आणि निःश्रेयस दोन्हीला सांधण्याची भूमिका आहे. वस्तुतः हे ‘दोन’ नाही ‘एका’चेच दोन पैलू आहेत, हेच सांगण्यासाठी एकवचनी षष्ठी प्रत्यय ‘अस्य’ (समुत्कर्ष निःश्रेयसस्य) प्रयोग केला आहे. तात्पर्य हे की, भारतात जीवनाच्या पूर्ण विचाराची परंपरा राहिली असून त्यात भौतिक (समृद्धी) आणि आध्यात्मिक (मोक्ष) उत्कर्षाचा एकाचवेळी विचार केला आहे.
शेकडो वर्षांपर्यंत भारत जगातील सर्वाधिक समृद्ध देश होता. मात्र, सामर्थ्यसंपन्न असूनही भारताने अन्य देशांवर युद्ध लादले नाही. व्यापारासाठी जगाच्या कानाकोपर्यापर्यंत जाऊनही भारताने तिथे वसाहती स्थापन केल्या नाहीत, ना त्यांचे शोषण केले, ना त्यांची लुटमार केली, ना त्यांचे धर्मांतर केले, ना त्यांना गुलाम करुन त्यांचा व्यापार केला. आपल्या लोकांनी तिथल्या स्थानिक जनसमुहांना संपन्न, समृद्ध आणि सुसंस्कृत केले. त्या सांस्कृतिक वारशाचे जीवंत दर्शन आजही दक्षिण आशियातील देशांच्या भाषा, कला, मंदिरे आणि जीवनशैलीमध्ये पाहायला मिळते. ती समृद्धी, जी भारतीयांनी अन्य देशांत जाऊन त्यांना समृद्ध व सक्षम करत अर्जित केली, त्याला आमच्या आध्यात्मिक दर्शनामध्ये महालक्ष्मी म्हटले गेले. इथे ‘धन’ नव्हे तर ‘धनलक्ष्मी’, ‘महालक्ष्मी’ला पूजले जाते. म्हणूनच आपल्या संपन्नतेचा, आपल्या सुसंस्कृत सदाचाराचा आधार धर्मच (religion नव्हे) राहिला आणि या धर्मस्थापना व साधनेचे केंद्र मंदिरे राहिली. कारण समग्र जीवनाच्या संपूर्ण चिंतनाचा आधार आध्यात्मिक (spirituality) आहे. म्हणूनच भारतात मंदिर आध्यात्मिक साधनेबरोबरच श्रेष्ठ लोकाचार आणि आर्थिक समृद्धीचे कारण ठरले आणि केंद्रदेखील.
१९५१ साली सोमनाथ मंदिरात प्राण प्रतिष्ठा करतेवेळी भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या भाषणात याचा स्पष्ट उल्लेख मिळतो. त्याचे काही अंश मूळ स्वरुपात वाचणेच उद्बोधक आहे. ते म्हणतात -‘ज्याप्रमाणे आज आपण आपल्या ऐतिहासिक श्रद्धेच्या या प्रतीकात पुन्हा एकदा प्राणप्रतिष्ठा केली, त्याचप्रमाणे आपण आपल्या देशाच्या सर्वसामान्यांच्या त्या समृद्धी मंदिरातही प्राणप्रतिष्ठा करु, ज्या समृद्धी मंदिराचे एक चिन्ह सोमनाथचे जुने मंदिर होते. आताच्या पुण्यसमयी आपल्या सर्वांसाठी हे योग्य ठरेल आणि आज आपण या गोष्टीचे व्रत घेतले पाहिजे. त्या ऐतिहासिक काळी आपला देश औद्योगिक केंद्र होता. इथे तयार झालेल्या वस्तू व उत्पादनांनी भरलेले तांडे दूरवरच्या देशांतही जात असत आणि जगभरातील सोने-चांदी या देशात अधिकाधिक येत होते. आपली निर्यात त्या युगात जास्त होती आणि आयात किमान. म्हणूनच भारत त्या युगात सोने आणि चांदीचा भंडार झाला होता. आज ज्या प्रकारे समृद्ध देशांच्या बँकांच्या तळघरात जगभरातील सोने पुरेशा प्रमाणात असते त्याचप्रकारे शेकडो वर्षांपूर्वी आपल्या देशात जगातील सोन्याचा सर्वाधिक भाग आपल्याकडील देवस्थानांमध्ये होता. मी समजतो की, भगवान सोमनाथाच्या मंदिराची पुनर्निर्मिती त्याच दिवशी पूर्ण होईल, ज्या दिवशी केवळ या खडकाच्या पायावर हे भव्य भवन उभे राहिलेले नसेल, तर भारताच्या त्या समृद्धीचेदेखील भवन तयार झालेले असेल ज्याचे प्रतीक हे पुरातन सोमनाथ मंदिर होते. सोबतच सोमनाथ मंदिराची पुनर्निर्मिती तोपर्यंत माझ्या दृष्टीने पूर्ण होणार नाही, जोपर्यंत या देशाच्या संस्कृतीचा स्तर इतका उंचावेल की जर कोण्या वर्तमानकालीन अलबरुनीने आपल्या वर्तमान परिस्थितीला पाहिले तर आपल्या संस्कृतीबद्दल आजच्या जगाला तेच सांगावे, जे भाव त्याने त्या काळी प्रकट केले होते.’ राम मंदिर आंदोलन भारताच्या त्या जीवनदृष्टीच्या पुनर्स्थापनेचे आंदोलन होते, जिला ‘सेक्युलॅरिझम’च्या आडून भारतापासून अलग करण्याचे षड्यंत्र रचले जात होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी राम मंदिर पायाभरणीदिनी आपल्या संबोधनात तीन शब्दांचा उल्लेख केला होता. ‘आत्मनिर्भर’ (self-reliant), आत्मविश्वास (self-confident) आणि आत्मभान (self -aware). यात ‘आत्मनिर्भरता’ ज्ञान (भारतीय ज्ञान-विद्या आणि अविद्यादेखील) आणि आर्थिक संदर्भात आहे. आत्मविश्वास आपल्या प्राचीन, नित्य-नूतन, चिरपुरातन आध्यात्म आधारित एकात्म, सर्वांगिण समग्र जीवनाच्या चिंतनाच्या आधारावर आपण प्राप्त करु शकतो, अशा विश्वास आणि कृतीशिल संकल्पाच्या संदर्भात आहे. आणि आत्मभान या भारतीय दर्शनाला आपल्या व्यक्तिगत, पारिवारिक, सामाजिक, व्यावसायिक आणि राष्ट्रीय जीवनात पूर्ण उत्कटतेने अभिव्यक्त करण्यात आहे.हीच गोष्ट रवींद्रनाथ टागोर यांनी ‘स्वदेशी समाज’मध्ये प्रतिपादित केली, ‘आपण वास्तवात जे आहोत, तेच व्हावे. ज्ञानपूर्वक, सरळ आणि सचल भावाने, संपूर्ण रुपात आपण आपल्या स्वलाच प्राप्त करावे. जितक्या खोलवर आपण आपल्या आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मुळांशी जोडले जाऊ तितकेच आपण आपल्या आर्थिक संपन्नता आणि सांस्कृतिक विस्ताराने स्पर्धा, संघर्ष, हिंसा, युद्ध, शोषण, अत्याचाराने ग्रस्त या मानवतेला संवाद, समन्वय, संयम आणि आत्मियतेची ओळख करुन देऊ शकू. आपल्या आचरणाने पांथिक, वांशिक, भाषिक, सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण मानव जगताला शांती, समृद्धीने पूर्ण, विश्व-मंगलकारी मार्गावर घेऊन जाऊ शकू.’ याच विचारांचे सार डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या सोमनाथ मंदिरातील प्राण प्रतिष्ठेच्या भाषणातील या वाक्यात आहे. ‘हे सर्व प्राप्त करण्याचे केंद्र, स्थान मंदिरे असत. हे मंदिरदेखील तसे केंद्र पुन्हा एकदा व्हावे, ही अपेक्षा आहे. तेव्हाच मंदिरनिर्मितीचे कार्य पूर्ण झाले, असे मी मान्य करेल.’ हीच गोष्ट आजच्या अयोध्येतील राम मंदिराबाबतही प्रासंगिक (relevant) आहे. म्हणूनच हा एका संकल्पपूर्तीचा क्षण आहे आणि शुभारंभदेखील. आणखी एक गोष्ट समजण्यासारखी आहे. राष्ट्रीय दृष्टीने महत्त्वपूर्ण असे कितीतरी प्रलंबित निर्णय आता एकामागोमाग एक होत असताना पाहायला मिळतात. याचे कारणही महत्त्वपूर्ण आहे.
१९८७मध्ये राम-जानकी रथयात्रा सुरु होती, तेव्हाच्या संघाच्या एका कार्यक्रमात तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांना एका कार्यकर्त्याने विचारले की, ‘गोहत्या बंदी आंदोलन, काश्मीरचे ‘कलम ३७०’ रद्द करणे आदी विषयांची मागणी करुन आपण सोडून दिले, असे वाटते. काही होताना दिसतच नाही. काय आताच्या राम मंदिराच्या विषयातही असेच होईल?’ तेव्हा बाळासाहेबांचे उत्तर होते - ‘आपण या निमित्ताने राष्ट्रीय जागरण करत आहोत. हे जागरण सतत कोणत्या ना कोणत्या निमित्ताने करत राहिले पाहिजे. आज हिंदू समाजाच्या राष्ट्रीय चेतनेचा सामान्य स्तर फारच खाली आहे, म्हणूनच या सर्वच समस्या आहेत. ज्या दिवशी संपूर्ण समाजाच्या राष्ट्रीय चेतनेचा सामान्य स्तर (general level of national consciousness) पुरेसा उन्नत होईल, तेव्हा या सर्वच विषयांचे उत्तर एकाचवेळी मिळेल.’ Malcolm Gladwell यांनी आपल्या Tipping Point-How little things can make a big difference पुस्तकाध्ये Tipping Point ची व्याख्या अशी केली की, Tipping point is the point at which a series of small changes or incidents becomes significant enough to cause a larger, more important change. आज बाळासाहेबांच्या शब्दांची आठवण होताना असे वाटते की, ती भावना व्यक्त करताना त्यांचा संकेत Tipping Point कडे होता का? संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि श्रेष्ठ चिंतक दत्तोपंत ठेंगडी नेहमी एक गोष्ट सांगत की, समाजातील काही लोकांचे राष्ट्रीय दृष्टीने जागृत आणि पुष्कळ सक्रिय होणे शाश्वत परिवर्तन आणत नाही. ज्यावेळी सामान्य व्यक्तीच्या राष्ट्रीय चेतनेचा स्तर थोडासाही उंचावतो, तेव्हा मोठे परिवर्तन होते. म्हणूनच वेळोवेळी काही मुद्द्यांना धरुन राष्ट्रीय जागरणाचे प्रयत्न सतत करत राहिल्याने हळूहळू सामान्य व्यक्तीच्या राष्ट्रीय चेतनेचा स्तर उंचावेल. त्या सर्वांच्या cumulative परिणामाने राष्ट्रहिताचे अनेक छोटे-मोठे महत्त्वाचे आणि आवश्यक कार्य सहजच होत जातील. या कारणाने राष्ट्रीय चेतना समृद्ध करण्याच्या दृष्टीने काही लोकांचे सतत राष्ट्र जागरणाच्या कार्यात कार्यरत राहणे आवश्यक आणि महत्त्वपूर्ण आहे.
असे वाटते की, बाळासाहेब देवरस आणि दत्तोपंत ठेंगडी यांच्याद्वारे वर्णिलेला ‘टीपिंग पॉइंट’ निकट येत आहे, रवींद्रनाथ टागोर यांचा ‘स्वदेशी समाज’ सक्रिय होत आहे. राष्ट्र जीवनाच्या अनेक क्षेत्रांत, अनेक वर्षांपासून प्रलंबित राष्ट्रहिताचे मूलभूत परिवर्तन एकामागोमाग होत आहेत. देशाच्या संरक्षण धोरण आणि परराष्ट्र धोरणातील मूलभूत परिवर्तनाचा अनुभव जगाला येत आहे. विकेंद्रित आणि कृषीआधारित अर्थनीतीच्या आधारे आत्मनिर्भरतेकडे पुढे जाण्याचा संकल्प प्रकट होत आहे. भारताच्या मुळांशी जोडून विश्वआकाशाला गवसणी घालण्यासाठी उंच भरारी घेणारे पंख देणार्या नव्या शिक्षण धोरणाची घोषणा झाली आहे. समाजाचे स्वतःचे उद्योग आणि innovations ना प्रोत्साहन मिळण्याचे वातावरण तयार होत आहे. हे सर्वच एकाचवेळी होत असल्याचे दिसत आहे. हे परिवर्तन भारतात २०१४पासून झालेल्या केंद्रातील सत्ता परिवर्तनाशी जोडून पाहिले जाणे स्वाभाविक आहे. परंतु, १६ मे २०१४ला निवडणूक निकालांची घोषणा झाल्यानंतर १८ मे, रविवारी ‘संडे गार्डियन’च्या महत्त्वपूर्ण संपादकीयात एक मूलभूत आणि गहन गोष्ट सांगितली गेली. ती म्हणजे, ‘It should be obvious that the underlying changes in the Indian society have brought us Mr. Modi and not the other way round.’ राष्ट्रीय चेतनेचा सामान्य स्तर उन्नत होण्याच्या प्रक्रियेच्या परिणाम स्वरुप सर्व प्रकारचे इष्ट परिवर्तन व्हायला सुरुवात झाली आहे आणि सत्ता परिवर्तन हा देखील त्याचाच एक भाग आहे. आपले ईश्वरप्रदत्त दायित्व निभावण्यासाठी भारतवर्ष आपल्या चिरपुरातन नित्यनुतन चिरंजीवी शक्तीबरोबर उभे राहत आहे. (संघाच्या एका ज्येष्ठ प्रचारकांनी एका वाक्यात संघाचे पूर्ण वर्णन केले होते - RSS is the evolution of the life mission of this Hindu nation.) आतापर्यंत थांबलेले वा थांबवलेले सर्व आवश्यक कार्य व्हायला सुरुवात झाली आहे. संपूर्ण समाजाला सभान, सजग राहून सक्रिय व्हावे लागेल. हे तेच आत्मभान आहे, ज्यामुळे आवश्यक आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता अवश्यम्भावी आहे.
एका संघ गीतात म्हटलेच आहे -
अरुणोदय हो चुका वीर अब कर्मक्षेत्र में जुट जाएं,
अपने खून-पसीने द्वारा नवयुग धरती पर लाएं।
- डॉ. मनमोहन वैद्य
(अनुवाद - महेश पुराणिक)