गोळीबारादरम्यान एकाचा मृत्यू; २ जण जखमी
दिल्ली : भारत आणि नेपाळ सीमेवरून दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीतच बिहारमधील भारत नेपाळ सीमेवर नेपाळ सशस्त्र दलाकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. भारत नेपाळ सीमेवर असलेल्या बिहारमधील सीतामढी या गावात नेपाळकडून गोळीबार करण्यात आला. यामध्ये शेतात काम करणाऱ्या एका भारतीयाचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही घटना सीतामढी भागातील नारायणपूर आणि लालबन्दी सीमाभागात घडली. पिपरा परसाईन पंचायतीच्या जानकी नगर सीमेवर काही जण शेतात काम करत होते. त्याचवेळी नेपाळच्या दिशेहून अंधाधुंद गोळीबार सुरू करण्यात आला. यादरम्यान एका भारतीयाचा मृत्यू झाला आणि दोन जण त्यात जखमी झाले आहेत. दरम्यान, दोघांना उपचारासाठी सीतामढीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच घटनास्थळी स्थानिक जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि काही वरिष्ठ अधिकारीही रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या मागील काही दिवसांपासून भारत-नेपाळ सीमेवरून वाद सुरू आहे. त्यामुळे हा प्रकार घडल्याचा अंदाज आहे. दरम्यान नेपाळच्या नवीन नकाशामध्ये लिंपियाधुरा, लिपुलेख आणि कलापाणी यासोबतच गुंजी, नाभी आणि काटी या गावांचा समावेश करण्ययत आला आहे. नेपाळच्या मंत्रिमंडळात नव्या नकाशाला मंजुरीही देण्यात आली आहे. त्यामुळे भारत आणि नेपाळच्या सीमारेषेवरून आता तणावाचे चित्र निर्माण झाले आहे.