मुंबई, वाढलेले तापमान, पर्यायाने वाढलेले बाष्पीभवन यांमुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा कमी झाला असला, तरी मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. महाराष्ट्र शासनानेदेखील मुंबईसाठी ‘निभावणी साठ्या’तून पाणी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे दि. ३१ जुलै २०२५ पर्यंत पुरेसा पाणीपुरवठा होईल, अशारितीने नियोजन केले आहे, अशी माहिती मुंबई पालिकेकडून देण्यात आली.
पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी पालिका मुख्यालयात सोमवार, दि. ५ मे रोजी उच्चस्तरीय बैठकीत पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, जल अभियंता पुरूषोत्तम माळवदे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. दि. ५ मे रोजी सकाळपर्यंतची आकडेवारी लक्षात घेता, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये मिळून एकूण २२.६६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. शिवाय, महाराष्ट्र शासनानेदेखील मुंबई पालिकेला भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातून निभावणी साठ्यातून अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याचे यापूर्वीच मान्य केले आहे. त्यामुळे मुंबईसाठी दि. ३१ जुलै २०२५ पर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. परिणामी, सद्यस्थितीत पाणीकपातीची कोणतीही आवश्यकता नाही.
धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यावर महानगरपालिका प्रशासन बारकाईने लक्ष ठेऊन आहे. त्याचबरोबर, पावसाच्या आगमनाबाबत हवामान खात्यासमवेत समन्वय साधून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. असे असले तरीही मुंबईकर नागरिकांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.