सातपुड्याचा रक्षणकर्ता

    16-Jan-2020   
Total Views | 373

tiger_1  H x W:



महाराष्ट्राच्या वन्यजीव संवर्धन क्षेत्रातील महत्त्वाच्या नावांमध्ये एक असलेल्या किशोर ज्ञानेश्वर रिठेंची नुकतीच पर्यावरण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यानिमित्ताने...

 
 

मुंबई (अक्षय मांडवकर) - महाराष्ट्रातल्या वन्यजीवांसंबंधी प्रश्नांची अचूक जाण असणारा, या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी नेहमी तत्पर असलेला, विदर्भातील जंगलांचा कोपरा अन् कोपरा ठाऊक असणारा हामाणूस...हुशार, मृदुभाषी आणि संयमी ही त्यांची स्वभाववैशिष्ट्ये. गलेलठ्ठ पगाराची अभियांत्रिकीची नोकरी सोडून त्यांनी वन्यजीव संवर्धन, शिक्षण आणि संरक्षणाची कास धरली. सातपुड्याच्या कुवार जंगलाच्या रक्षणासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. वन्यजीव संवर्धनाबाबत विपुल लेखन केले. पर्यावरण संवर्धनासंबंधी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध समित्यांवर काम करून ठोस उपाययोजना सुचवल्या. त्यांच्या या बहुमूल्य कार्याची दखल घेऊन नुकतीच पर्यावरण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेले सातपुड्याचे रक्षणकर्ते किशोर रिठे.

 
 

tiger_1  H x W: 
 
 

वर्धा जिल्ह्यात दि. २१ मार्च, १९७२ साली म्हणजेच जागतिक वनदिनी रिठेंचा जन्म झाला. त्यांचे वडील प्राथमिक आरोग्य केंद्रात क्लार्कपदावर नोकरी करत होते.त्यामुळे वडिलांच्या बदलीनुसार रिठे कुटुंबीयांचे वास्तव्य एका गावातून दुसर्‍या गावात व्हायचे. रिठेंचे प्राथमिक शिक्षण अमरावती जिल्ह्यातील येवदा गावात झाले. पुढे वडिलांच्या बदलीमुळे रिठे कुटुंबीय तिवसा गावात स्थायिक झाले. या ठिकाणी रिठेंनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. या दरम्यान शाळेतील शिक्षकांमुळे त्यांची वैचारिक पातळीवरउंचावण्यास खूप मदत झाली. दहावीततालुक्यामधून पहिल्या तीन गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये रिठेंनी बाजी मारली. त्यामुळे आता मुलानेही अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यावे, या उद्देशाने पालकांनी त्यांची रवानगी अमरावती येथे केली. शिवाजी विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी नेचर क्लबमध्ये सहभाग नोंदवला आणि येथून पुढे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

 

tiger_1  H x W: 
 
 
 

नेचर क्लबच्या माध्यमातून त्यांनी अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांमधील जंगलांची भ्रमंती केली. मेळघाटमधील आठ दिवसांच्या प्रशिक्षणादरम्यान त्यांची भेट प्रसिद्ध वन्यजीव लेखक मारूती चितमपल्लींशी झाली. त्यावेळी मेळघाटचे उपसंचालक असलेल्या चितमपल्लींनी रिठेंना जंगलाचे अद्भुत दर्शन घडवले. त्यानंतर पर्यावरणवादी दिलीप गोडे यांच्यामुळे नवेगाव-नागझिराची सफर घडली. अशा दिग्गज माणसांचा सहवास लाभल्यानंतर रिठेंना जणू काही जंगलाची चटकच लागली. बारावी उत्तीर्ण झाल्यावर १९९१ मध्ये त्यांनी समविचारी मित्रांसमेवत अमरावतीत नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीया महाराष्ट्रातील पहिल्या विद्यार्थी निसर्ग संघटनेची स्थापना केली. त्यादरम्यान अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळवला. त्यावेळी अमरावतीचे सीईओपदी प्रसिद्ध प्रशासकीय अधिकारी प्रवीणसिंह परदेशी कार्यरत होते. निसर्गाची आवड असणाऱ्या परदेशींची या सोसायटीला साथ मिळाली. त्यांच्या घरी असलेली या विषयातील पुस्तके वाचणे, वृक्षारोपण मोहिमा राबविणे, ट्रेकिंग, पक्षी निरीक्षण करणे,जंगलाच्या समस्या सोडविणे अशी  कामे सुरु झाली .पुढे परदेशींच्या बदलीनंतर सोसायटी बंद पडणार असा समज निर्माण झाला होता. मात्र, या सगळ्या विद्यार्थी मंडळींनी सोसायटीचे काम नेटाने रेटून सुरू ठेवले. सोसायटीने १९९३ साली विदर्भ पक्षीमित्र संमेलनाचे आयोजन केले. या संमेलनाला महाराष्ट्रातील पक्षीमित्रांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

tiger_1  H x W: 
 
 
 

1993 साली रिठेंचा अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम पूर्ण झाला. त्यादरम्यान सोसायटीच्या कामाचा व्यापही वाढला होता. परंतु, नोकरीच्या निमित्ताने रिठे पुण्यात गेले. मात्र, मन निसर्ग संवर्धनाच्या कामात गुंतल्यामुळे नोकरी सोडून 1995 साली ते पुन्हा अमरावतीत परतले. बडनेरा अभियांत्रिकी महाविद्यालय व पुढे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून काम करण्याबरोबरच सोसायटीचे काम सुरू ठेवले. १९९६ साली सातपुड्यात असलेल्या अतिक्रमणांविरोधात त्यांनी मेळघाट ते पंचमढी अशी पदयात्रा काढली. हळूहळू सोसायटीच्या कामाचा व्याप वाढू लागला. वन्यजीव संवर्धनासंबंधी ठोस कामाला सुरुवात झाल्याने अखेरीस त्यांनी प्राध्यापकपदाची नोकरीही सोडली आणि पूर्णवेळ वन्यजीव संवर्धनाचे काम करण्याचे निश्चित केले. यासाठी २००० साली युगांडा येथे कॉन्झर्वेशन बायोलॉजी व वाईल्ड लाईफ मॅनेजमेन्टचे शिक्षण घेतले. तिथून परतल्यावर त्यांनी २००१ मध्ये सातपुडा फाऊंडेशनची स्थापना करुन सातपुड्याच्या विविध प्रश्नांवर काम करण्यास सुरुवात केली.

 

tiger_1  H x W: 
 
 
 

रिठेंनी आजवर केंद्र आणि राज्य शासनाच्या पर्यावरणविषयक ३० समित्यांवर काम करताना सुमारे १७ अहवाल सादर केले आहेत. याद्वारे त्यांनी शासनास महत्त्वपूर्ण सूचना, सुधारणा व प्रश्नांची उकल करणार्‍या प्रभावी उपाययोजना सादर केल्या. सातपुडा फाऊंडेशनची स्थापना करून मागील 19 वर्षांमध्ये मध्य भारतातीलसात व्याघ्र प्रकल्पांमध्ये ११७ गावांमध्ये कामाची उभारणी केली. त्यासाठी ३० विद्याविभूषित अशा सहकार्‍यांच्या चमूद्वारे या सर्व गावांमध्ये आरोग्य सेवा, निसर्ग शिक्षण, रोजगारनिर्मिती व कृषी आणि वनीकरण आधारित गाव विकासाची कामे एकत्रितपणे चालविली. यामधून सुमारे दोन लाख आदिवासी रुग्णांना सेवा पुरविली तसेच सुमारे पाच हजार तरुणांना कायम स्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिला. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट , नागपूर जिल्ह्यातील पेंच व मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातील कान्हा येथे वन्यजीव संशोधन व समुदाय केंद्रांची स्थापना केली. वन्यजीव संवर्धनासाठी आपले आयुष्य झोकून दिलेल्या रिठेंना दै. मुंबई तरुण भारतचा सलाम!

 
 
 
 

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121