मुंबई : दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर कमबॅक केलेला पाऊस मुंबईत धो धो बरसला आणि दुपारनंतर शांत झाला. मात्र या पावसामुळे सखल भागात पाणी साचले. रस्ते वाहतूक कोलमडली आणि रेल्वेवाहतूकही धीमेगती झाली. दुपारनंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २४ तासांत मुंबई व उपनगर परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
बुधवारी मध्यरात्रीपासून पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावत मुंबईकरांना चांगलेच झोडपून काढले. मध्यरात्रीपासून संततधार बरसलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला. तिन्ही रेल्वेमार्गावरील वाहतूकही १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. असल्फा व्हिलेज व दिंडोशी-गोरेगाव येथील डोंगर उतारावरील झोपड्यांवर दरड कोसळली. सुदैवाने यावेळी तेथील झोपड्या रिकाम्या असल्याने मोठा अनर्थ टळला.
सांताक्रूझमध्ये ५८ मिमी तर कुलाबामध्ये १७१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. जुलैच्या प्रारंभी पावसाने मुंबईत जोरदार सुरुवात केली. पहिल्या आठवड्यात मुसळधार कोसळून महिनाभराच्या पावसाची कसर भरून काढली. त्यानंतर मात्र तब्बल दोन आठवडे दडी मारलेल्या पावसाने जुलै सरता सरता जोरदार कमबॅक केले. मध्यरात्रीपासून संततधार कोसळल्याने मुंबई व उपनगरांतल्या सखल भागात पाणी साचले.
घाटकोपर असल्फामध्ये डोंगर उतारावरील झोपड्यांवर दरड कोसळली. मात्र या झोपड्या यावेळी रिकाम्या असल्याने मोठी दुर्घटना टळली. कु्र्ला, दादर, हिंदमाता, सायन, किंग्जसर्कल, लोअर परळ, भायखळा, वांद्रे, दहिसर, कांदिवली आदी परिसरात पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला. येथील रस्त्यावर साचलेल्या पाण्यामध्ये दोन ट्रक, एक एसटी आणि काही रिक्षा अडकल्या होत्या. काही ठिकाणी बेस्ट वाहतूकही इतर मार्गावरून वळवण्यात आली. तर सायन येथे रूळावर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतूकीवर परिणाम झाला.
पावसामुळे काही ठिकाणी घरांच्या भिंती, झाडांची पडझड झाली. सध्या पावसाचे पोषक वातावरण असून पुढील चार दिवस मुंबईसह राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार आहे. २४ आणि २५ जुलैला मुंबई, नवीमुंबई, ठाणे आदी ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सायंकाळी पाच वाजल्यानंतर पावसाचा जोर कमी झाल्याने सखल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा होऊन वाहतूक पूर्ववत झाली. त्यामुळे घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळाला.
पाणी साचलेली ठिकाणे
शीव राणी लक्ष्मीबाई चौक, हिंदमाता जंक्शन, गांधी मार्केट, जोहरा मंजील डोंगरी, बीपीटी कॉलनी, एसआयएस कॉलेज, माला गार्डन, नायर रुग्णालय, पोस्टल कॉलनी, विद्याविहार रेल्वेस्थानक, कुर्ला रेल्वे स्थानक, बैंगनवाडी देवनार, स्वस्तिक चेंबर, चेंबूर रेल्वे स्थानक, नेहरु नगर, शास्त्री नगर सांताक्रुझ, अंधेरी सबवे, बेहेराम बाग एसव्ही रोड, मालवणी-मालाड
सकाळी ७ वाजेपर्यंत झालेला पाऊस
शहर
कुलाबा : १७१ मिमी.,
मबारहिल : १६४,
डी विभाग : १६२,
आय हॉस्पिटल : १५८,
सी विभाग : १५२,
पूर्व उपनगरे
चेंबूर : १०२, एल विभाग : ९२, कुर्ला : ८२, एम (प.) : ८१.
पश्चिम उपनगरे
बांद्रा : १३४,
एच-वेस्ट विभाग : १२१,
विलेपार्ले : १०२.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat