‘स्मार्ट’ आणि ‘डॅशिंग’ व्यक्तिमत्त्व असलेला मराठी चित्रपटसृष्टीचा नायक म्हणून ललित प्रभाकरकडे बघितले जाते. रंगभूमी, मालिका आणि चित्रपटांमधून त्याने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून ललित घराघरात पोहोचला. ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटात गोपाळरावांची गंभीर भूमिकाही ललितने लीलया साकारली. अशा या हरहुन्नरी आणि एका सामान्य घरातून आलेल्या ललितने योग्य निर्णय आणि कठोर परिश्रमांनी यशोशिखर गाठले आहे. ललितच्या या लालित्यपूर्ण प्रवासाचा घेतलेला हा आढावा....
ललित प्रभाकर भदाणे याचा जन्म १२ सप्टेंबर, १९८७ रोजी मुंबईत झाला. एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या या मुलाने आज मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपटक्षेत्रात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले. ललितचे आईवडील दोघेही शिक्षक, त्यामुळे त्याच्यावर चांगले संस्कार झाले. ललितला अभिनयाचे वेड लागले ते अगदी शाळेपासूनच. असे असले तरी ललितने शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता अभिनयाची आवडही जोपासली. पण, वडिलांच्या सरकारी नोकरीमुळे ‘बदली’ ही ठरलेलीच. त्यामुळे ललितनेही बऱ्याच शाळा बदलल्या. शिवाय, या प्रवासात त्याला विविध क्षेत्रातील अनेक मंडळी भेटत गेले. यामुळे त्याची निरीक्षणशक्ती वाढत गेली. याचा फायदा त्याला पुढे अभिनयात झाला. “विविध पार्श्वभूमीच्या अधिकाधिक माणसांना भेटल्यामुळे एकंदरीत तुमच्यावर त्यांचा काहीना काही प्रभाव पडतोच,” असे ललित त्याच्या लहानपणीच्या आठवणी सांगताना आवर्जून नमूद करतो. ललितची अभिनयाची आवड त्याच्या पालकांच्याही लक्षात आली आणि त्यांनीही ललितला या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन दिले. पुढे कल्याणला स्थायिक झाल्यानंतर त्याने अभिनयाकडे अधिक गांभीर्याने बघण्यास सुरुवात केली.
कल्याणमध्ये असताना त्याने रवींद्र लाखे यांच्या ‘मिती-चार, कल्याण’ या संस्थेअंतर्गत अभिनयाची सुरुवात केली. त्याने अनेक एकांकिका आणि दीर्घांकांमध्ये सहभाग घेतला, ज्यामध्ये त्याने अभिनयासोबतच दिग्दर्शनाचीदेखील समर्थपणे धुरा सांभाळली. रवींद्र लाखे हे ‘मिती चार, कल्याण’चे संस्थापक तर होतेच, तसेच ते दिग्दर्शकही होते. त्यांच्याकडून ललित नाट्यक्षेत्रातील धडे गिरवत गेला. त्याविषयी ललित सांगतो की, “आम्हाला ‘मिती-चार, कल्याण’ मध्ये सगळीच कामे करायला लागायची. जसे की बॅकस्टेज, प्रकाशयोजना, वेशभूषा, नेपथ्य, संगीत, अशा सगळ्या गोष्टी आम्हाला तिथे शिकायला मिळाल्या. तिकडे माझी जिज्ञासा जागृत झाली. मला खूप गोष्टी तिथे कळायला लागल्या आणि माझा अभिनयाचा, रंगभूमीचा एकूणच आवाका तिथे वाढला. म्हणजे मी काय करू शकतो किंवा काय केले पाहिजे, हे मला तिथे कळले. मी योग्य वेळी तिकडे पोहोचलो. तिथूनच खरी सुरुवात झाली.” ललितला अभिनयासोबतच वाचनाची आणि कविता करण्याचीदेखील आवड आहे. हे सर्व करतानाच त्याला मालिका आणि व्यावसायिक नाटकांसाठी काम करण्याची संधी मिळाली. पहिली संधी मिळाली ती अविनाश नारकरांच्या ‘तक्षकयाग’ या नाटकात. तसेच त्याने इटालो कॅल्विनोच्या ‘इन्व्हिसिबल सिटीझ’ या इटालियन नाटकाचे मराठीत भाषांतर करून या संहितेच्या मराठी भाषांतरित नाटकाचे दिग्दर्शनदेखील केले. त्यानंतर त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘अस्वस्थ समुद्रावर बैल मेलाय’ या नाटकाची बरीच चर्चा नाट्यवर्तुळात रंगली होती. दिग्दर्शनानंतर त्याला अभिनयाची पहिली संधी मिळाली ती ‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या ‘जिवलगा’ या मालिकेतून. यामध्ये त्याची छोटी, पण महत्त्वाची भूमिका होती. त्यानंतर त्याने ‘आभास हा,’ ‘कुंकू,’ ‘गंध फुलांचा गेला सांगून’ या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. याबद्दल सांगताना ललित म्हणतो की, “मी सुरुवात अगदी छोट्यामोठ्या भूमिकांपासून केली. ऑडिशन देऊन बऱ्याच मालिकांमध्ये मी अशा छोट्या-छोट्या भूमिका निभावल्या आहेत. त्यामुळे मला मालिकांचे काम कसे चालते, हे कळायला लागले. ‘गंध फुलांचा गेला सांगून’ या मालिकेमुळे लोक मला ओळखू लागले.” ते ललितला ओळख मिळवून देणारं पहिलं काम ठरलं.
तुम्हाला नक्की काय हवंय? तुमच्या कामातून तुम्हाला नुसते पैसे कमवायचे आहेत की तुम्हाला चांगलं काम करत राहायचंय? तुम्हाला काम आवडतंय म्हणून करायचं? हे आधी तुमचं ठरलं पाहिजे. जर हे ठरत नसेल तर मग आणखी अभ्यास करा, निरीक्षण करा आणि नवनवीन गोष्टी शोधात राहा. सतत जिज्ञासू राहा. एकदा जर तुमची जिज्ञासू वृत्ती संपली की मग स्वतःची वाढही संपते!
यानंतर ललितच्या कारकिर्दीमध्ये मैलाचा दगड ठरली ती ‘जुळून येती रेशीमगाठी’ ही मालिका. त्यामधील आदित्य देसाईच्या भूमिकेमुळे ललित घराघरामध्ये पोहोचला. त्या अनुभवाबद्दल ललित सांगतो की, “मालिका आणि एकांकिका करताना मला ‘जुळून येती रेशीमगाठी’च्या ऑडिशनसाठी बोलावले गेले. तिथेही माझी निवड झाली. म्हणजे ही कामे करताना मला कधीच वाटले नव्हते की, त्याचं एवढं व्यापक रूप होईल किंवा माझं काम एवढं नावाजलं जाईल. तो खरं तर एक मोठा महत्त्वाचा टप्पा ठरला माझ्या आयुष्यातला.” या मालिकेसाठी ललितला ‘झी मराठी’चा २०१४ सालचा ‘सर्वोत्कृष्ट नायक’ म्हणून पुरस्कारदेखील मिळाला. त्यानंतर त्याने अनेक मालिकांमध्ये काम केले. ‘दिल, दोस्ती, दुनियादारी’ या मालिकेत त्याची कबीरची छोटी भूमिका होती, तरीही त्याच्या सालस अभिनयामुळे ती तरुणाईच्या विशेष पसंतीस उतरली. त्यानंतर ललितने ‘झी टॉकीज’च्या ‘टॉकीज लाईट हाऊस’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात नेहा महाजनसोबत सहनिवेदक म्हणून काम केले. यावरून त्याची भटकंतीची आवड प्रेक्षकांसमोर आली. यादरम्यान, त्याला केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाची ‘तरुण कलावंत’ म्हणून शिष्यवृत्तीही मिळाली. ही शिष्यवृत्ती भारतातून केवळ ३० कलाकारांना दिली जाते.
“तुम्ही काय बघता, काय काय वाचता यावर तुमच्यामध्ये बदल घडत जातो. तुम्ही कसं काम करता, या सगळ्या एकत्रीकरणाचा परिणाम तुमच्या कामावर दिसून येतो. यामुळे तुमचा आयाम वाढत जातो. तुमच्या मर्यादा वाढत जातात किंवा तुम्ही अजून प्रगल्भ होऊ लागता. लाखे सरांकडून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. जसं गायकाला रियाजाची गरज असते, तसं नटांनासुद्धा वेगवेगळ्या गोष्टी शिकून घेण्याची गरज असते,” अशा भावना त्याने व्यक्त केल्या. नवीन उभारी घेणाऱ्या कलाकारांना तसेच चित्रपटसृष्टीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक अभिनेत्याला ललितचा हा प्रवास निश्चितच प्रोत्साहन देणारा आणि नवचैतन्य निर्माण करणारा ठरेल, यात शंकाच नाही.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat