नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची बहुप्रतिक्षित 'ट्रेन-१८' किंवा ' वंदे भारत एक्सप्रेस'ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी हिरवा झेंडा दाखवला. यापूर्वी भारताच्या सर्वात वेगवान रेल्वेचे पंतप्रधान मोदींनी निरिक्षण केले. सामान्य नागरिक या रेल्वेतून प्रवास करण्याचा अनुभव १७ फेब्रुवारीपासून घेऊ शकतील. सकाळी १० वाजता ही एक्सप्रेस नवी दिल्लीवरून वाराणसीला रवाना झाली. पंतप्रधान या ट्रेनमधून प्रवास करणार होते. मात्र, जम्मू काश्मीरमधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा समितीची बैठक होणार होती. त्यामुळे मोदींनी फक्त झेंडा दाखवून या रेल्वेचा शुभारंभ केला.
पंतप्रधान मोदींनी पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. तसेच या हल्याचे प्रत्युत्तर देण्यास भारतीय सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच भारतीय सैन्य या हल्याला चोख उत्तर देईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी श्रद्धांजली वाहिली आणि जे जवान जखमी आहेत त्यांची प्रकृती लवकरात लवकर ठीक व्हावी, अशी प्रार्थना केली. दहशतवाद्यांसमोर आमचे जवान आणि जनता झुकणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
India gets the first Semi High Speed Train, 'Vande Bharat Express.' https://t.co/dSZLJaoWRY
— Narendra Modi (@narendramodi) February 15, 2019
वंदे भारत एक्सप्रेस ही आपल्या गतीने वेळेत सुरू झाली आणि देशाच्या सेवेत समर्पित झाल्याचेही गोयल यांनी यावेळी सांगितले. ही गाडी भारताच्या प्रगतीच्या विकासाचे प्रतीक आहे. अशा आणखी ३० गाड्या तयार करण्याचे आदेश दिले असून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच भारतात विविध मार्गांवर, अशा हायस्पीड गाड्या धावाव्यात यासाठी १०० गाड्या तयार करण्यासाठी मंजुरी दिल्याचेही गोयल यांनी यावेळी सांगितले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/