चंदीगड : पंजाबचे कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेस नेता नवज्योतसिंग सिद्धू यांचे पाकिस्तान प्रेम पुन्हा एकदा उफाळून आले आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याबाबत त्यांनी देशवासीयांच्या दुःखावर मीठ चोळले आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात नसल्याची अप्रत्यक्ष क्लीनचिट त्यांनी पाकिस्तानला दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी एकाही शब्दाने पाकिस्तानचा निषेध केला नाही किंवा या हल्ल्यात पाकिस्तानला दोषी धरले नाही. यावरून देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, दहशतवादाला कोणताच देश, धर्म आणि जात नसते. या हल्ल्यामागे जैश-ए- मोहम्मद ही दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे समोर आले आहे. ही संघटना पाकिस्तान लष्कर व आयएसआय यांच्या इशाऱ्यावर नाचते हे सर्वश्रुत असताना सिद्धू यांचे विधान पाकिस्तानला क्लीनचिट देण्यासारखे आहे. असा सूर सोशल मीडियावर उमटत आहे.
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यासंबंधी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सिद्धू म्हणाले, "पुलवामा येथील भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो. मात्र, दहशदवाद्यांची कोणताच देश, धर्म आणि जात नसते." दरम्यान, या दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी निषेध केला असला तरी पाकिस्तानला त्यांनी जबाबदार धरले नाही. यामुळे सिद्धू यांच्या विरोधात देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat