दिल्लीची निसटती किल्ली...
‘सामाजिक कार्यकर्ते ते राज्यकर्ते,’ असा आम आदमी पार्टीचा, त्यांच्या सर्वेसर्वा अरविंद केजरीवालांचा आणि बहुसंख्य कार्यकर्त्यांचा प्रवास. केजरीवालांच्या हाती दिल्लीच्या किल्ल्या जनतेने दिल्यानंतरही त्यांच्या अंगातील ते कार्यकर्तेपण काही केल्या विलग झालेले दिसत नाही. मुख्यमंत्री केजरीवाल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून केलेली केंद्र सरकारविरोधातील धरणे आंदोलनं असो वा अब्रुनुकसानीच्या खटल्यात केजरीवालांनाच अडकवणारे खटले, सगळे काही देशाच्या जनतेने नीट पाहिले. सर्वच सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे, अनैतिकतेचे बेछूट आरोप करणाऱ्या केजरीवालांच्या पक्षातही नंतर अशाच नेते, आमदारांची जणू एक लाट आली अन् त्या लाटेत केजरीवालांचा सज्जनतेचा, सफाईचा, सोज्वळतेचा बुरखा एकाएकी वाहून गेला. पंजाब राज्यातून निवडून आलेल्या चार खासदारांची कामगिरीही निराशजनक राहिली, तर खुद्द केजरीवालांच्या कार्यकर्त्या कार्यशैलीला कंटाळून कित्येक ‘आप’च्या नेत्यांनी ‘झाडू’ सफाईविनाच फेकून दिला. एकूणच काय, तर सगळा सावळा गोंधळ. या गोंधळी पक्षाच्या समस्यांमध्ये २१ डिसेंबर रोजी अधिकच भर पडली. कारण, त्या दिवशी दिल्ली विधानसभेत शीख हत्याकांडाच्या मुद्द्यावरून थेट माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा ‘भारतरत्न’ पुरस्कार काढून घेण्याची मागणी करण्यात आली. यात गोंधळाची आणि बेजबाबदारीची बाब ही की, हा प्रस्ताव विधानसभेच्या पटलावर चर्चेसाठी येणार, याविषयी मुख्यमंत्री केजरीवाल किंवा उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना सुतराम कल्पनाही नव्हती. दुसरीच तेवढीच धक्कादायक गोष्ट ही की, हा प्रस्ताव जेव्हा पटलावर आला, त्यावेळी केजरीवाल आणि सिसोदियांपैकी कोणीही दिल्ली विधानसभेत उपस्थित नव्हते. एवढेच काय तर विधानसभेच्या अध्यक्षांनाही अशा कुठल्या प्रस्तावाची माहितीही नव्हती. यामुळे ‘आप’मधील कारभार चव्हाट्यावर तर आलाच, शिवाय केजरीवालांच्या पक्षातील स्थानावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. या सगळ्या प्रकरणानंतर ‘बॉस खूप चिडले आहेत,’ अशी प्रतिक्रियाही म्हणे ‘आप’च्या एका आमदाराने दिली. परंतु, या सगळ्या घडल्या प्रकारानंतर केजरीवाल हे खरोखरीच पक्षाचे ‘बॉस’ आहेत का आणि मग ‘बॉस’ असून त्यांच्या इतक्या महत्त्वाच्या प्रस्तावाविषयी किंवा त्यामधील बदलाविषयी त्यांच्याच आमदारांना माहिती का द्यावीशी वाटली नाही, हा प्रश्नच उरतो. म्हणूनच, पक्षाबाहेर आणि पक्षातही दिल्लीच्या किल्ल्या केजरीवालांच्या हातून निसटत चालल्या आहेत, याचेच हे द्योतक म्हणावे लागेल.