मुंबई : आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या अटल आरोग्य वाहिनी व कायापालट अभियानचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हा सोहळा आयोजित केला होता. यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांना आता आणखी उत्तम आरोग्य सुविधा मिळणार असून आदिवासी विद्यार्थी यापुढे उपचाराच्या सुविधेपासून वंचित राहणार नासल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
दुर्गम भागात असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार मिळावेत याची व्यवस्था या योजनेमध्ये करण्यात आली आहे. प्रत्येकी चार ते सहा आश्रमशाळा व एकलव्य निवासी शाळांचा एक समूह, असे एकूण ४८ क्लस्टर तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक क्लस्टरसाठी एक याप्रमाणे ४८ सुसज्ज रुग्णवाहिका २४ तास तैनात असणार आहेत. बेसिक लाईफ सपोर्ट (बीएलएस) सह सज्ज असणाऱ्या या रुग्णवाहिकांमध्ये दोन डॉक्टर्स व एक आरोग्य सहाय्यक उपलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्याचबरोबर, आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी प्रत्येक आश्रमशाळेत एक आरोग्य समिती नेमण्यात येणार असून या समितीत विद्यार्थी, शिक्षक व पालकांचा समावेश असणार आहे.
या योजनेत उपलब्ध झालेल्या सुविधा?
* ARAI प्रमाणित बेसिफ लाईक सपोर्ट ॲम्ब्युलन्स/रुग्णवाहिकेच्या माध्यमातून 24X7 तातडीची वैद्यकीय सेवा मिळणार.
* रुग्णवाहिकांच्या समन्वयासाठी 24X7 इमर्जन्सी रिस्पॉन्स सेंटर.
* प्रतिदिन क्लस्टर शाळांमधील विद्यार्थ्यांची डॉक्टरांमार्फत वैद्यकीय तपासणी.
* हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टमच्या माध्यमातून प्रकल्प स्थितीचा आढावा. मोबाईल ॲप माध्यमातून डिजिटल हेल्थ कार्ड दिले जाणार.
* वैद्यकीय विशेषज्ञांच्या माध्यमातून उपचार सल्ला व आवश्यकतेनुसार रुग्णालयात पाठविण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार.
* शाळांमध्ये सर्व सोयींनीयुक्त अशा डिस्पेंसरीजची स्थापना करण्यात येणार.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/