मुंबई : अहमदाबादमध्ये गुरुवार, १२ जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताने संपूर्ण देशात खळबळ उडाली असून या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला आहे. यानिमित्ताने १९ ऑक्टोबर १९८८ मध्ये अहमदाबादमध्येच झालेल्या अपघाताच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.
गुरुवारी दुपारी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे AI-१७१ विमान कोसळून मोठा अपघात घडला. या विमानात एकूण २४२ प्रवासी होते. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हेसुद्धा या विमानातून प्रवास करत असून या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही मिनीटांत ते कोसळले आणि भीषण अपघात घडला.
दरम्यान, या अपघाताने १९ ऑक्टोबर १९८८ रोजी अहमदाबाद येथे झालेल्या अपघाताच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. १९८८ मध्ये इंडियन एअरलाइन्स फ्लाइट ११३ (बोईंग ७३७-२००) या विमानाचा अपघात झाला होता. अहमदाबादमधील सर्वात मोठ्या अपघातांपैकी एक असा हा अपघात होता. या अपघातात विमानात असलेल्या १३५ पैकी तब्बल १३३ जणांचा मृत्यू झाला होता. यात फक्त दोनच जण गंभीर जखमी होऊनही बचावले होते. हे विमान मुंबईहून अहमदाबादला जात असताना खराब हवामानामुळे धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच दुर्घटनाग्रस्त झाले.
या विमानाच्या उड्डाणाची वेळ सकाळी ५:४५ वाजता नियोजित होती. परंतू, विमानाने २० मिनिटे उशाराने म्हणजेच सकाळी ६:०५ वाजता उड्डाण घेतले. त्यानंतर अहमदाबादमध्ये पोहोचताच धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच या विमानाचा अपघात झाला. तपासानंतर पायलटची चूक, अपुरी हवामान माहिती आणि हवाई वाहतूक नियंत्रणाच्या चुकांमुळे हा अपघात घडल्याचे निदर्शनास आले होते.