केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लिखित ‘संघातील मानवी व्यवस्थापन’ पुस्तकाचे प्रकाशन
31-May-2025
Total Views | 24
नागपूर : केवळ संघकार्याचा किंवा शाखांचा विस्तार म्हणजे संघाचा विस्तार नव्हे. तर संघातील स्वयंसेवकत्वाचा विस्तारही तितकाच महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ.भा. प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले.
राजहंस प्रकाशन-मंथन व्यासपीठाच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लिखित ‘संघातील मानवी व्यवस्थापन’ या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवार, दि. ३० मे रोजी वनामती सभागृह, नागपूर येथे झाले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ संपादक व विचारवंत विवेक घळसासी आणि राजहंस प्रकाशनचे नरेश सबजीवाले हे देखील उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधत सुनील आंबेकर पुढे म्हणाले की, संघात शिकणे सुरूच असते पण आपण जे शिकून जातो, ते आपण शिकलो हे सुरुवातीला कळत नाही. या माध्यमातून आपल्यावर कोणता संस्कार झाला, ते लक्षात येत नाही. परंतु नंतरच्या वाटचालीमध्ये जेव्हा एक- एक अनुभव घेत जातो, तेव्हा त्या गोष्टी लक्षात येतात. ही संस्काराची विशेषता आपल्या कार्यामध्ये आहे व ती नेमकी कशी आहे, याचे वर्णन या पुस्तकात आहे. संघाची कार्यपद्धती, संघाची विशेषता चांगल्या शब्दांमध्ये व्यक्त करणारे हे पुस्तक आहे.
संघाचे एक स्वयंसेवक व अभाविपचा कार्यकर्ता म्हणून नितीन गडकरी त्यांना आलेली चांगली अनुभूती ते मांडतात, तेव्हा त्याचा समाजावर चांगला परिणाम होतो. लोकमान्यता मिळायला लागली, की सहजता सांभाळणे हे मोठे आव्हान असते. संघ स्वयंसेवक असलेल्या नितीन गडकरींनी ही सहजता कायम जपली असल्याचे सुनील आंबेकर यांनी सांगितले.
ज्येष्ठ संपादक व विचारवंत विवेक घळसासी म्हणाले की, नितीन गडकरी यांच्यावर संघ व विद्यार्थी परिषदेचे संस्कार झाले, ही एक बाजू आहे. पण, त्यांच्या मातोश्री भानुताईंच्या संस्कारांचाही भाग मोठा आहे. आपण काही तरी अलौकिक काम करतोय, असे वाटू न देता काम करीत राहणे, हे फार आव्हानात्मक आहे व नितीन गडकरी यांनी हे आव्हान सहज पेलले आहे.
संघ-अभाविप व आईकडून मिळाले संस्कार
माझी आई, रा.स्व.संघ, अभाविप यांनी माझे जीवन बदलले. त्यांच्याकडून मला मूल्य शिक्षण मिळाले. बाळासाहेब देवरस, भाऊराव देवरस, दत्तोपंत ठेंगडी, दत्ताजी डिडोळकर, मा.गो. वैद्य, यशवंतराव केळकर या मंडळींचा प्रभाव माझ्या आयुष्यावर त्यांच्या सहवासात मिळालेले अनुभव हीच माझ्यासाठी प्रेरणा ठरली. या पुस्तकात मला स्वयंसेवक म्हणून आलेली अनूभुती व्यक्त करण्याचा प्रयत्न मी केला आहे. निर्णय करण्याचे धाडस, समाजाप्रति संवेदनशीलता यासाठी कन्व्हिक्शन लागत असते व ते मला संस्कारातून मिळाले. देश व समाजासाठी काही केले पाहिजे हा भाव आणि इच्छाशक्ती माझ्यात संस्कारांतूनच निर्माण झाली.