अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे चरित्र, काम, आणि कतृत्व वरचे माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या जीवनावर बहुभाषिक चित्रपट तयार करणार, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शनिवार, ३१ मे रोजी चौंडी येथे आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवात ते बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दत्ता भरणे, अतुल सावे, गोपीचंद पडळकर यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याकरिता छावा चित्रपटाची निर्मिती झाली. त्या चित्रपटानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा दैदीप्यमान इतिहास आजच्या पिढीपर्यंत पोहोचला. त्याचप्रमाणे आता अहिल्यामातांच्या जीवनावर बहुभाषिक व्यावसायिक चित्रपट तयार करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. जेणेकरून संपूर्ण भारतात अहिल्यामातांचे चरित्र, काम, कतृत्व आणि देशावरचे त्यांचे उपकार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतील."
ते पुढे म्हणाले की, "मल्हारराव होळकरांनी अहिल्यादेवींचे लग्न लावून दिले. लग्नानंतर राज्य कारभारातील सगळ्या गोष्टी त्यांनी शिकून घेतल्या. त्यांच्यावर अनेक संकटे आली. सासरे, सासू, पती, मुलगा, मुलगी, जावई असे एकापाठोपाठ एक त्यांना सोडून गेले. पण अहिल्यामाता डळमळल्या नाहीत. त्यानंतर संपूर्ण राज्य माझा परिवार आहे आणि माझ्यावर त्याची जबाबदारी आहे, हे त्यांना माहिती होते. त्यामुळे त्यांनी २८ वर्षे राज्य कारभार चालवला. या देशाच्या इतिहासात जे कल्याणकारी राजे झालेत त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसोबत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचेही नाव घ्यावे लागेल," असे ते म्हणाले.
"त्याकाळी जगातील आक्रांतांनी भारताला लुटण्याकरिता भारतावर आक्रमणे केली. भारताची ताकद ही इथला आधात्म्य, मंदिरे, घाट आणि प्रेरणास्तोत्रांमध्ये आहे, हे या आक्रांतांना माहिती होते. त्यामुळे आपण भारतीय नागरिकांच्या भावनेला ठेस पोहोचवल्यास आपण भारताला गुलाम करू शकू, हे त्यांना माहिती होते. त्यामुळेच त्यांनी काशीचे मंदीर, अयोध्येचे मंदीर, कृष्णाची जन्मभूमी तोडण्याचे काम केले. त्यांनी एकप्रकारे आपले ज्योतिर्लिंग आणि आमचे तेज, तप भंग करण्याचे काम केले. अशा परिस्थितीत केवळ आपल्या राज्यापुरता विचार न करता संपूर्ण हिंदूस्थानाची जबाबदारी माझी आहे, असे अहिल्यादेवींनी ठरवले. त्यांनी केदारनाथपासून वाराणसीपर्यंत आणि सोमेश्वरपासून रामेश्वरपर्यंत आपली सगळी मंदीरे आणि घाट बांधून काढले. तुम्ही कितीही आक्रमण केले तरी आमचा देव, देश आणि धर्म मिटवू शकणार नाही, अशे परकीय आक्रमकांना सांगितले. औरंगजेबाने सोमनाथाचे मंदीर तोडल्यानंतर तिथे जाऊन त्याचे पुननिर्माण करण्याची कुठल्याही राजाची हिंमत झाली नाही. परंतू, ही दहशत न जुमानता अहिल्यादेवींनी हे मंदीर बांधले. आज अहिल्यामातांना अपेक्षित त्या मंदिराचा विकास झालेला आहे," असेही मुख्यमंत्री म्हणाले.
...म्हणून अहिल्यादेवी पुण्यश्लोक आणि लोकमाता झाल्या!
"एवढी श्रीमंती असतानाही छत्रपती शिवाजी महाराज योग्यासारखे राहिले. म्हणून त्यांना आपण श्रीमंत योगी म्हणतो. त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यामातांकडे एवढी मोठी श्रीमंती होती, समृद्ध राज्य होते पण त्या एका छोट्याशा खोलीमध्ये राहत होत्या. त्यांनी स्वत:करिता कधीही धनाचा उपयोग केला नाही. म्हणूनच त्या पुण्यश्लोक आणि लोकमाता झाल्या. त्यांनी आपल्या प्रजेला मुलासारखे वागवले. या जिल्ह्याचे नाव आपण अहिल्यानगर केले आहेच. आता या चौंडीच्या विकासाचा मोठा आराखडा तयार केला असून त्या माध्यमातून मोठा विकास करणार आहोत. अहिल्यामातांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी आदिशक्ती अभियान सुरु केले आहे," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.