
स्वतः अंध असूनही शेकडो अंध विद्यार्थ्यांच्या डोळ्यांमध्ये ज्ञानाचा प्रकाश पेरणार्या नाशिकच्या राजाराम गेंदाजी गायकवाड यांच्याविषयी...
राजाराम गेंदाजी गायकवाड यांचा जन्म दिंडोरी तालुक्यातील कोचरगावचा. वडील स्वयंपाकी, तर आई त्यांना मदत करत असे. महापालिकेच्या शाळेतून त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. दृष्टी कमी असल्याने त्यांना वाचन, लेखनात प्रचंड अडचण यायची. केवळ दहा ते बारा टक्के द़ृष्टी असल्याने अगदी डोळ्यांजवळ पुस्तके घेऊन ते वाचत. फळ्यावरील काहीही दिसत नसल्याने शेजार्याच्या वहीत बघून मुद्दे लिहीत. पर्यवेक्षणासाठी आलेल्या एका अधिकार्याने राजाराम यांना शासकीय अंधशाळेत दाखल करण्याची शिफारस केली. त्यामुळे त्यांना अंधशाळेत इयत्ता पहिलीत दाखल करण्यात आले. तिथे ब्रेल लिपीतील मुळाक्षरे, परिच्छेद आणि इतर विषय शिकविण्यात आले. त्यानंतर के. जे. मेहता हायस्कूल येथून त्यांनी इयत्ता पाचवीचे शिक्षण केले. यानंतर बी. डी. भालेकर हायस्कूलमधून त्यांनी इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यादरम्यान वर्गात फक्त ऐकण्याचे काम राजाराम करत. उर्वरित अभ्यासासाठी ते ब्रेल लिपीचा आणि परीक्षेसाठी साहाय्यकाचा आधार घेत.
राजाराम यांची द़ृष्टी जवळपास गेल्यात जमा होती. एचपीटी महाविद्यालयातून त्यांनी ‘बीए’ पूर्ण केले. यावेळी डोळस व्यक्तींची अभ्यासासाठी मदत घेतली. रेकॉर्डिंग करूनही महाविद्यालयातील व्याख्याने ऐकली. ‘बीए’च्या पहिल्या वर्षी त्यांचा विवाह डोळस मुलीशी झाला. संसाराचा गाडा हाकण्यासाठी त्यांनी ‘मायको’ कंपनीमध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून काम केले. याचदरम्यान अनिल मोरे मित्राने नोकरीविषयी सांगितले आणि 1991 साली त्यांना के. जे. मेहता हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरीदेखील लागली. याच कालावधीत राजाराम यांना पूर्ण अंधत्व आले. पुढे भोपाळ येथे त्यांनी एक वर्ष प्रशिक्षण घेतले. तिथून परतल्यानंतर ते पुन्हा के. जे. मेहता हायस्कूलमध्ये रुजू झाले. तेव्हापासून ते आतापर्यंत ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे ‘नवनीत’चे इंग्रजी व्याकरण त्यांनी ब्रेल लिपीत अंध विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले. त्याद्वारेच इंग्रजीचे धडे दिले जातात. अंध विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास, स्पर्धा-परीक्षांची तयारी करून घेणे, त्यांना शासकीय योजनांची माहिती देणे, रोजगाराविषयी मार्गदर्शन करणे, याविषयी राजाराम नेहमी प्रयत्नशील असतात.
1995 साली वडिलांचे आणि 1996 साली त्यांच्या आईचे निधन झाले, तेव्हा भाऊ प्रल्हाद गायकवाड यांनी बरीच मदत केली. 2012 साली न्यूमोनियामुळे पत्नीचे निधन झाले. या दुःखातून सावरत समाजाचे आपल्यावर उपकार आहेत. समाजाचे आपण देणे लागतो, या उद्देशाने 2014 साली ‘ज्ञानसाधना बहुउद्देशीय विकास संस्थे’ची स्थापना करण्यात आली. तत्पूर्वी इयत्ता ‘नववीत’ असताना माजी सैनिकांसाठी निधी संकलित केला जात होता, तेव्हाच त्यांना समाजसेवेची गोडी लागली. ‘ज्ञानसाधना’ संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये इयत्ता दहावी, बारावी आणि पदवीच्या गुणवंत दिव्यांग विद्यार्थ्यांचा गौरव, राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार सोहळा, शिक्षकेतर कर्मचार्यांचा गौरव, ब्रेल वाचनालय अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. 1992 साली ‘डीएड’ आणि 2012 मध्ये त्यांनी ‘बीएड’चे शिक्षण पूर्ण केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आणि महापुरुषांचे विचार अंध विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी 2018 साली ‘बुद्धिस्ट असोसिएशन फॉर द ब्लाईंड’ ही संस्था राजाराम यांनी सुरू केली. या संस्थेद्वारे संविधान ब्रेल लिपीत अंध विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले. जातीव्यवस्थेचे निर्मूलन, बुद्धवंदना, बुद्ध आणि त्यांचा धम्म अशी विविध पुस्तके अंध विद्यार्थ्यांना वाचता यावी, यासाठी राजाराम यांनी पुढाकार घेतला. अनेक संस्थांनी त्यांना पुरस्काराने गौरविले आहे. त्यांचा मुलगा सध्या कलाशिक्षक म्हणून ‘होरायझन स्कूल’मध्ये नोकरीला आहे. मुलगीसुद्धा नामांकित कंपनीत नोकरी करत आहे.
अंध विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पालकांमध्ये जनजागृती केली जाते. तसेच अनेकांची दृष्टी अचानक गेल्याने त्यांचा आत्मविश्वास खालावतो. त्यासाठी त्यांचे समुपदेशन केले जाते. लहानपणी अंध असल्याने अनेकदा हेटाळणी झाली, मात्र आता लोकांमध्ये बर्यापैकी जनजागृती झाल्याचे राजाराम सांगतात.
“दिव्यांगांनी आपल्या व्यंगाचा बाऊ न करता त्यावर मात करावी. तसेच आपणही समाजाचे घटक आहोत. समाजातील सुख-दुःख जाणून समाजाला मदत केली पाहिजे. अंध आहोत म्हणून केवळ घेण्याची वृत्ती न ठेवता, आपल्यापरीने देण्याचाही प्रयत्न झाला पाहिजे. आपण अंध असलो, तरी आम्ही डोळस शिक्षकांना मार्गदर्शन करू शकतो. डोळस शिक्षकांचेही मोलाचे सहकार्य मिळते. आतापर्यंत शेकडो अंध विद्यार्थी शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभे आहेत. सार्वजनिक हितासाठी जे करणे शक्य होईल, ते करण्याचा प्रयत्न करतो,” असे सांगत उर्वरित आयुष्य समाजसेवेसाठी अर्पण केले असल्याचेही राजाराम सांगतात. अंध विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत स्वतः अंध असूनही ज्ञानाचा प्रकाश पेरणार्या राजाराम गेंदाजी गायकवाड यांना आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून मनःपूर्वक शुभेच्छा.
पवन बोरस्ते
7058589767