जवान पूर्णम कुमार भारतात परतले; २० दिवसांपासून होते पाकिस्तानच्या ताब्यात

    14-May-2025
Total Views | 27

Jawan Purnam Kumar is Back

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :
(Jawan Purnam Kumar) पाकिस्तान रेंजर्सनी ताब्यात घेतलेले बीएसएफ कॉन्स्टेबल पूर्णम कुमार शॉ यांची अखेर सुटका करण्यात आलीये. बुधवार, दि. १४ मे रोजी भारताच्या अटारी बॉर्डरवरून ते भारतात परतले. साधारण २० दिवसांपूर्वी म्हणजेच काश्मीरच्या पहलगाम हल्ल्याच्या बरोबर दुसऱ्या दिवशी गस्तीवर असताना चुकून त्यांनी सीमारेशा ओलांडल्याने पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यांची गर्भवती पत्नी आपल्या पतीच्या सुटकेसाठी सतत प्रयत्न करत होती. अशातच भारताने पाकिस्तानातील दहशतवाद विरोधात ऑपरेशन सिंदूर राबवण्यास सुरुवात केल्याने, जवान पूर्णम कुमार यांच्या कुटुंबियांची चिंता आणखी वाढली. मात्र भारताने पाकिस्तानला योग्य धडा शिकवल्यानंतर अखेर बीएसएफ कॉन्स्टेबल पूर्णम कुमार शॉ यांची सुटका करण्यात आलीय.

हे वाचलंत का? : मुंबईकरांचा ५०० रुपयांचा प्रवास केवळ ६० रुपयांत!

बंगालमधील रहिवासी असलेले बीएसएफ कॉन्स्टेबल पूरण कुमार शॉ यांनी २३ एप्रिलपासून पाकिस्तानात ठेवण्यात आले होते. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव उच्च पातळीवर असताना पूर्णम कुमार शॉ यांना अटक करण्यात आली होती. पूर्णम हे १७ वर्षांपासून बीएसएफमध्ये कार्यरत आहेत. त्यांचे वडील निवृत्त बँक कर्मचारी आहेत. गेल्या १० एप्रिलपासून भारत-पंजाब सीमेवर तैनात असलेल्या एका गस्तीपथकाचा ते भाग होते. पूर्णमच्या घरच्यांना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा सर्वजण काळजीत पडले. 

पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील रिश्रा भागात राहणाऱ्या पूर्णम यांच्या गर्भवती पत्नी रजनी यांना जेव्हा याबाबत समजले तेव्हा त्या थेट वाघा-अटारी सीमेवर पोहोचल्या. तेव्हा अधिकाऱ्यांनी त्यांना खात्री दिली की पूर्णम सुरक्षित असून त्यांना भारतात परत आणण्याचे पूर्ण प्रयत्न सुरु आहेत. एकीकडे हे होत असताना, दुसरीकडे 'ऑपरेशन सिंदूर' सुरु झाले. भारताने दहशतवादास चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पीओजेकेतील जवळपास १०० दहशतवादी ठार मारले, त्यासोबतच जवळपास ३५ ते ४० पाक सैनिकांचाही खात्मा झाल्याची माहिती आहे. भारतीय शस्त्रास्त्रांनी थेट इस्लामाबादपर्यंत धडक मारली होती.

ऑपरेशन सिंदूरचे भारताने ठरविलेले दहशतवादी आणि त्यांचे तळ नष्ट करण्याचे उद्दिष्ट पूर्णपणे साध्य झाल्याचे एअर मार्शल एके. भारती यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले. यात चकलाला एअरबेस, मुरीद एअरबेस, रफीकी एअरबेस, रहिमयार खान एअरबेस, सुक्कुर एअरबेस, चुनलियन एअरबेस यांचा समावेश आहे. यातून भारताने पाकिस्तानला हे संकेत दिलेत की कुठलीच गोष्ट भारताच्या आवाक्याबाहेर नाही. 
 
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे दाखविलेल्या सैन्यसामर्थ्यामुळे माघार घेऊन पाकिस्तानने अखेर भारताकडे सैन्य कारवाई थांबविण्याची विनंती केली. भारताने ही विनंती मान्य करून सैन्य कारवाई थांबविण्याचा निर्णयही घेतला. मात्र, भारताविरोधात यापुढे कोणत्याही प्रकारची आगळीक केल्यास ती कृती ही ‘ॲक्ट ऑफ वॉर’ अर्थात भारताविरुद्ध युद्धाची कृती मानली जाईल आणि त्यानुसार त्याला प्रत्युत्तर दिले जाईल, असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली.

भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे सुद्धा प्रत्येकाला ठाऊक असतील. तेच अभिनंदन ज्यांनी बालाकोट एअरस्ट्राइकनंतर मिग-२१ बायसन लढाऊ विमानाने पाकिस्तानचे एफ-१६ जेट पाडले होते. तथापि, या काळात त्याचे जेटही खराब झाले आणि ते चुकून पाकिस्तानच्या प्रदेशात पडले. तेव्हा पाकिस्तानी सैन्याने त्यांना ताब्यात घेतले खरे मात्र ६० तासांनंतर का होईना पाकिस्तानला त्यांना सुरक्षितपणे भारतात परत करावेच लागले.

त्यानंतर आज बीएसएफ जवान पूर्णम कुमार यांच्या भारतात येण्याने अनेकांच्या छाती अभिमानाने फुलून आल्या आहेत. सोशल मीडियावर देखील अनेकांनी भारतीय सैन्याचे आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करण्यास सुरुवात केलीय. ही आजच्या भारताची ताकद आहे.  

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121