मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षांचे निकाल मंगळवार, १३ मे रोजी जाहीर झाले असून राज्यात एकूण ९४.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
दहावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांची शैक्षणिक दिशा ठरवणारा महत्त्वाचा टप्पा असून या टप्प्यावर यश मिळविलेले विद्यार्थी कौतुकास पात्र आहेत, अशा शब्दात मंत्री दादाजी भुसे यांनी परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची शिखरे पादाक्रांत करावीत, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
दहावीच्या परीक्षेत राज्यात एकूण ९४.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सर्व उत्तीर्ण विद्यार्थी, त्यांचे पालक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक या सर्वांचे मंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन केले. तर उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांनी नाउमेद न होता पुरवणी परीक्षेस प्रविष्ट होऊन यश संपादन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
किती विद्यार्थी उत्तीर्ण?
नऊ विभागीय मंडळांतून एकूण १५ लाख ५८ हजार २० नियमित विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ४६ हजार ५७९ विद्यार्थी प्रविष्ट झाले तर १४ लाख ५५ हजार ४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ९४.१०% अशी ही निकालाची टक्केवारी आहे. दहावीच्या एकूण २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर २३ हजार ४८९ शाळांपैकी ७ हजार ९२४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. नियमित विद्यार्थ्यांपैकी ४ लाख ८८ हजार ७४५ विद्यार्थी प्रविण्यासह प्रथम श्रेणीत तर ४ लाख ९७ हजार २७७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण मंत्र्यांनी कौतुक केले.
मुलींनी मारली बाजी
सर्व विभागीय मंडळातून नियमित उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ९६.१४ इतकी आहे. तर मुलांची टक्केवारी ९२.३१ इतकी आहे. मुलांपेक्षा मुलींच्या निकालाची टक्केवारी ३.८३ टक्क्यांनी जास्त आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी
दहावीच्या परीक्षेकरिता नऊ विभागीय मंडळांमधून एकूण ९ हजार ६७३ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९ हजार ५८५ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले, तर ८ हजार ८४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ९२.२७ अशी त्यांच्या निकालाची टक्केवारी आहे.