उबाठा गट, नीचपणाचा अजून किती तळ गाठणार? केशव उपाध्येंचा संतप्त सवाल; काय घडलं?
20-May-2025
Total Views | 147
मुंबई : उबाठा गट, नीचपणाचा अजून किती तळ गाठणार? असा संतप्त सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ऑपरेशन सिंदूरचे पुरावे मागत भारतीय सैन्याचा अवमान केला. या कार्यक्रमात केशव उपाध्येसुद्धा उपस्थित होते.
केशव उपाध्ये म्हणाले की, " भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरचे खोटे पुरावे दिले. दुसरीकडचा फोटो आणून इकडचा फोटो दाखवला, असे संतापजनक विधान उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केले आहे. या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना विरोध करता करता आपला अभिमान असलेल्या सैन्याचा अपमान करण्याचे काम उद्धव ठाकरे गटाचे नेते करत आहेत. सुषमा अंधारेंची ही भूमिका उबाठा गटाची अधिकृत भूमिका आहे का?" असा सवाल त्यांनी केला.
"भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरमध्ये जे घवघवीत यश मिळवले त्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. त्याबद्दल शंका उपस्थित करून हे खोटे आहे, अशी विधाने सुषमा अंधारेंनी केली. त्यामुळे त्यांनी भारतीय सैन्याची जाहीर माफी मागायला हवी. लोकशाहीमध्ये टीका करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे टीका जरूर करा पण भारतीय सैन्याच्या पराक्रमाचा अपमान करू नका," असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "उद्धव ठाकरेंनी आधी हिंदुत्व सोडलं, इथंपर्यंत ठिक होतं, पण उबाठा गट आता भारतीय सैन्याच्या शौर्यावरही संशय घेतोय. उबाठा गट, नीचपणाचा अजून किती तळ गाठणार आहे? ही देशद्रोहाची मनोवृत्ती हाच उबाठाचा मूळ विचार झालेला आहे. सुषमाताई, उबाठा गटाविषयीची लॅायल्टी सिद्ध करण्यासाठी थेट सैन्यांचं शौर्य नाकारणे, हे तुम्हालाच जमो," असा खोचक टोलाही केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.