संवेदनशील काळात जबाबदारीने वागा – सर्वोच्च न्यायालय
- पहलगाम हल्ल्याची न्यायिक चौकशीची याचिका फेटाळली
01-May-2025
Total Views |
नवी दिल्ली, पहलगाम दहशतवादी हल्ल्याची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन आयोग स्थापन करण्याचे निर्देश मागणाऱ्या जनहित याचिकेवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला आणि याचिकाकर्त्याला फटकारले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत न्यायालयीन आयोग स्थापन करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात १ मे रोजी सुनावणी होणार झाली. काश्मीरमधील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरला निर्देश देण्याची विनंती या याचिकेत करण्यात आली आहे. ही याचिका काश्मीरमधील रहिवासी मोहम्मद जुनैद यांनी फतेश कुमार साहू आणि विक्की कुमार यांच्यासह दाखल केली होती. हे प्रकरण न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठासमोर आले असता न्यायालयाने सुनावणीस नकार देऊन संवेदनशील काळात बेजबाबदार याचिका दाखल केल्याबद्दल न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारले.
न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले, "अशी जनहित याचिका दाखल करण्यापूर्वी जबाबदारीने वागा. देशाप्रती तुमचे काही कर्तव्य आहे. या संवेदनशील काळात अशा प्रकारे सैन्याचे मनोबल खचवण्याचा प्रयत्न करत आहात, सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांना चौकशी करण्यास सांगत आहात. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश या विषयाचे तज्ज्ञ कधीपासून झाले; असा सवाल न्या. सूर्यकांत यांनी विचारला.
व्यक्तिगतपणे हजर असलेल्या एका याचिकाकर्त्याच्या विनंतीवरून खंडपीठाने याचिका मागे घेण्याची परवानगी दिली.