मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पालिका क्षेत्रात जन्म-मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून पालिका प्रशासनाला प्राप्त होत होत्या. त्यादर्भात पालिकेने स्पष्टीकरण दिले आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, जन्म - मृत्यू नोंदणीकरीता केंद्र शासनाच्या अधिपत्याखालील नागरी नोंदणी प्रणालीचा अवलंब करण्यात येतो. ही प्रणाली सुधारित आणि अद्ययावत करण्याची कार्यवाही भारताचे महाप्रबंधक तथा जनगणना आयुक्त कार्यालयाकडून सुरु आहे. मात्र ही प्रणाली पूर्ण क्षमतेने उपलब्ध होईपर्यंत नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
महानगरपालिकेच्या हद्दीतील जन्म - मृत्यू नोंदणीकरिता, महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्देशाने दिनांक दि. १ जानेवारी २०१६ पासून नागरी नोंदणी प्रणाली (Civil Registration System - CRS) चा अवलंब करण्यात आला आहे. भारताचे महाप्रबंधक तथा जनगणना आयुक्त कार्यालयाकडून नागरी नोंदणी प्रणालीमध्ये दि. २४ जून २०२४ पासून सुधारणा करण्यात येत आहेत. नागरिकांना सहज, सुलभ व वेगाने प्रमाणपत्र देता यावेत, यासाठी अद्ययावत वैशिष्ट्यांचा त्यामध्ये समावेश करण्यात येत आहे.
दरम्यान दि. २४ जून २०२४ नंतर जन्म - मृत्यू झालेल्या व्यक्तींची नोंद करतांना, नागरिकांनी त्यांचा अचूक ईमेल आयडी अर्जासोबत नमूद केल्यास महानगरपालिका विभाग कार्यालयांमधील (वॉर्ड) वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत त्यांनी दिलेल्या ई-मेल आयडीवर जन्म - मृत्यू प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात येतील. तसेच नागरिकांना नोंदणी कार्यालयास भेट देण्याची गरज भासणार नाही. ही सुविधा नागरिकांच्या अत्यंत सोयीची आणि पारदर्शक राहणार आहे. तसेच, जन्म - मृत्यू प्रमाणपत्र नोंदणीस विलंब होणार नाही. लवकरच सुधारित नागरी नोंदणी प्रणाली उपलब्ध होणार असल्याचे संबंधितांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे जन्म व मृत्यू नोंदणी प्रमाणपत्रांचे प्रणाली आधारित कामकाज सुरळीत होईपर्यंत सहकार्य करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.