मनसेसोबत युतीचं काय झालं? काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
30-Mar-2024
Total Views | 114
लातूर : मनसे आणि आमच्या बैठका झाल्या असल्या तरी यूतीबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे. शनिवारी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची सून अर्चना पाटील चाकूरकर यांनी शनिवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.
मनसे महायूतीमध्ये सहभागी होण्याबद्दल विचारले असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मनसेसोबत आमच्या बैठका झाल्या आहेत यात कुठलंही दुमत नाही. लोकसभा निवडणूका लढवत असताना सगळ्या प्रकारच्या शक्यतांच्या चर्चा होत असतात. मात्र, यासंदर्भात अद्याप आमचा कुठलाही निर्णय झालेला नाही."
महायूतीच्या जागावाटपाबाबत बोलताना ते म्हणाले की, "आमचं चार-पाच जागांवर अडलेलं आहे. एक जागा अडली की, तीन जागा अडतात. पण फार अडलंय अशी परिस्थिती नाही. थोडसं अडलं आहे ते एक दोन दिवसांत सोडवलं जाईल," असे ते म्हणाले. दरम्यान, लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायूतीच्या जागावाटपाची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
पुढे ते म्हणाले की, "माध्यमं अंबादास दानवेंची चर्चा करत आहे. पण आम्ही जर ऑपरेशन केलं तर तुम्हाला कळतंच नाही आणि तुम्हाला कळलं तर ते ऑपरेशन नाही. त्यामुळे अंबादास दानवेंशी आमचा कुठलाही संपर्क नाही आणि त्यांच्या प्रवेशाची आमच्याकडे कुठलीही चर्चा नाही," असेही ते म्हणाले.