"धार्मिक कार्याच्या नावाखाली निवासी इमारती आणि चाळींमध्ये..."; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
24-May-2025
Total Views | 28
मुंबई : धार्मिक कार्याच्या नावाखाली अनेक निवासी इमारती आणि चाळींमध्ये बेकायदेशीरपणे बकरा कापला जात असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. शनिवार, २४ मे रोजी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
किरीट सोमय्या म्हणाले की, "दहशत माजवण्यासाठी आणि लॅण्ड जिहादसाठी मुस्लीम माफिया जाणूनबुजून हिंदू आणि जैन वस्त्यांमध्ये बकरे कापतात. माझ्याकडे याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. बकरी ईदचा बहाणा करून बकरे कापले जातात. सोसायटीच्या चाळी, जुन्या इमारतींच्या प्रांगणात बकरे कापणे हे बेकायदेशीर आहे. न्यायालयानेदेखील याबाबत आदेश दिले आहेत. परंतू, पोलिस याकडे दुर्लक्ष करत आहेत. यापुढे मुंबईत कुठल्याही सोसायटीच्या प्रांगणात खुलेआम बकरा कापू दिला जाणार नाही. या प्रकरणात दुर्लक्ष करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनाही आम्ही सोडणार नाही," असा इशारा त्यांनी दिला.
ते पुढे म्हणाले की, "नियमानुसार, कुठल्याही वस्तीत, इमारतीत किंवा चाळीत बकरा कापता येत नाही. पोलिस अधिकारी आणि महापालिका अधिकारी त्यांना घाबरतात. पण यापुढे असे चालणार नाही. ज्या वस्त्यांमध्ये मागील वर्षी बकऱ्या कापल्या गेल्या अशा वस्त्यांमध्ये मी भेट देणार असून यावेळी तिथे कोण बकरा कापतो ते बघतो," असेही किरीट सोमय्या म्हणाले.