द्रष्टा साहित्यिक, प्रखर राष्ट्रवादी पत्रकार : ग. त्र्यं. माडखोलकर

    27-Dec-2024
Total Views | 57
g t madkholkar


मराठी साहित्यविश्वातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे कादंबरीकार आणि समीक्षक गजानन त्र्यंबक माडखोलकर. कादंबरीकार म्हणून माडखोलकर प्रख्यात आहेतच, पण संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीतील त्यांचे योगदानही अविस्मरणीय. तसेच नागपूरच्या ‘तरुण भारत’चे संस्थापक-संपादकपद म्हणूनही आपल्या कारकिर्दीचा विशेष ठसा उमटविला. आज ग. त्र्यं. माडखोलकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीचा धावता आढावा घेणारा हा लेख...

मराठी साहित्यविश्वातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे कादंबरीकार आणि समीक्षक गजानन त्र्यंबक माडखोलकर. माडखोलकरांचा जन्म व शिक्षण मुंबईतच झाले. गणित विषयात गती नसल्यामुळे ते मॅट्रिकच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. त्यानंतर त्यांनी कायमची शाळा सोडली. मात्र, आयुष्याच्या शाळेत त्यांचे अध्ययन सुरूच होते. मराठी, इंग्रजी आणि संस्कृत वाङ्मयाचे त्यांनी विपुल वाचन केले. आवड म्हणून माडखोलकरांनी इटली आणि आयर्लंडच्या इतिहासाचाही अभ्यास केला. संस्कृत, मराठी आणि इंग्रजी साहित्याचा त्यांचा व्यासंग दांडगा होता. कादंबरी आणि समीक्षक होण्यापूर्वी त्यांनी पत्रकाराची धुरा हातात घेतली होती. साहित्यसम्राट न. चिं. केळकरांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी सुरुवातीच्या काळात काम केले. त्यानंतर विविध दैनिकांमध्ये विभाग संपादकापासून प्रमुख संपादकाच्या विविध जबाबदार्‍या त्यांनी त्यांच्या पत्रकारितेच्या कार्यकाळात पार पाडल्या. पुण्याच्या दैनिक ‘ज्ञानप्रकाशा’चे विभाग संपादक, नागपूरच्या दैनिक ‘महाराष्ट्रा’चे साहाय्यक संपादक नागपूरच्या ‘नरकेसरी स्मारक मंडळा’ने काढलेल्या ‘तरुण भारत’ या दैनिकाचे प्रमुख संपादक म्हणून 1944 ते 1967 पर्यंत त्यांनी दायित्व सांभाळले आणि त्यानंतर ते निवृत्त झाले. एक पत्रकार या नात्याने त्यांनी तात्कालिक महत्त्वाच्या अनेक विषयांवर लेखन केले. प्रखर राष्ट्रवादी वृत्ती, वाङ्मयगुणांनी युक्त अशी प्रसन्न भाषाशैली आणि तर्कशुद्ध विवेचनपद्धती ही त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनाची वैशिष्ट्ये होती. त्यामुळे पत्रकारितेत त्यांनी त्यांच्या लिखाणाचाएक वेगळा ठसा उमटवला. त्यांचे हेच पत्रकारितेतील लिखाण त्यांच्या वाङ्मयीन कारकिर्दीतसुद्धा खूप महत्त्वाचे ठरले.

आपल्या वाङ्मयीन कारकिर्दीच्या आरंभकाळात माडखोलकरांनी काही कविता लिहिल्या. मराठी कवितांसोबतच संस्कृत काव्यरचनाही त्यांनी केल्या. 1920च्या दशकांत पुण्यातील काही समविचारी कवींनी एकत्र येऊन स्थापनकेलेल्या आणि मराठी कवितेला एक वेगळी ओळख मिळवून देणार्‍या ‘रवीकिरण मंडळा’चेही ते सदस्य होते. त्या मंडळाच्या 1924 साली प्रकाशित झालेल्या ‘उषा’ या काव्यसंग्रहात त्यांच्या काही कविताही प्रसिद्ध झाल्या होत्या. 1964 साली त्यांनी ‘देवयानी’ हे नाटक लिहिले. ‘रातराणीची फुले’ आणि ‘शुक्राचे चांदणे’ या काही गाजलेल्या कथाही त्यांनी लिहिल्या. पण, कवी किंवा कथाकार म्हणून मराठी साहित्यविश्वात त्यांना तितकी प्रसिद्धी मिळाली नाही. त्यांना साहित्यजगत ओळखते, ते एक प्रसिद्ध कादंबरीकार म्हणून. 1933 मध्ये ‘मुक्तात्मा’ ही त्यांची पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली आणि त्यांच्या पहिल्याच कादंबरीने त्यांना खूप लोकप्रियता मिळवून दिली. ‘चंद्रशेखर’ या क्रांतिकारक नायक तरुणाच्या जीवनावर आधारित ही कादंबरी दहशतवादाच्या प्राथमिक अवस्थेतील महाराष्ट्रामधील समाजवादी कार्यकर्त्यांच्या कामगिरीचे वर्णन करते. त्या काळातील एक महत्त्वाची राजकीय कादंबरी म्हणून ‘मुक्तात्मा’ या कादंबरीकडे त्यावेळी पाहिले गेले. या कादंबरीनंतर दुसर्‍याच वर्षी माडखोलकरांनी ‘भंगलेले देऊळ’ ही कादंबरी लिहिली. ‘मुक्तामा’ राजकीय कादंबरीनंतर माडखोलकरांनी ‘भंगलेले देऊळ’ या कादंबरीत मानवी भावभावना, स्त्री-पुरुष संबंध आणि विवाहसंस्था यांचे धागे जोडून गुंफलेले कथानकसुद्धा वाचनीय होते. त्यानंतर ग. त्र्यं. माडखोलकरांनी 1936 साली अतिरिक्त ध्येयवादामुळे उद्ध्वस्त झालेल्या निशिकांत या सुशील तरुणाची प्रेमकथा असणारी ‘शाप’ ही कादंबरी लिहिली. 1939 साली त्यांनी लिहिलेल्या ‘कांता’ या राजकीय कादंबरीलासुद्धा प्रचंड लोकप्रियता मिळाली.

‘कांता’ या राजकारण, समाजकारण या विषयांची गंभीर चर्चा करणारी कादंबरी लिहिल्यानंतर लगेच दहाच महिन्यांत माडखोलकरांनी ‘दुहेरी जीवन’ ही एक वेगळ्या विषयावरची कादंबरी लिहिली. 1940 साली त्यांनी राजकीय कथानकाला शृंगारिकतेची जोड देऊन ‘मुखवटे’ ही कादंबरी लिहिली. ‘चंदनवाडी’ ही त्यांची कादंबरी अनेकांकडून सर्वोत्तम कादंबरी म्हणून त्याकाळात गणली गेली. ‘रुक्मिणी’, ‘उर्मिला’, ‘सत्यभामा’ या त्यांनी स्त्रीजीवनावर आधारित लिहिलेल्या कादंबर्‍याही गौरविल्या गेल्या. त्यासोबतच त्यांनी ‘नवे संसार’, ‘नागकन्या’, ‘डाकबंगला’, ‘प्रमद्वरा’, ‘अनघा’, ‘स्वप्नांतरिता’ यांसारख्या काही महत्त्वाच्या ठरलेल्या कादंबर्‍यांचे लेखन केले. त्यांच्या बर्‍याचशा कादंबर्‍या या राजकीय आहेत. गांधीवादी विचारसरणीलाविरोध, सशस्त्र क्रांतीबद्दलचे प्रेम आणि समाजवादाचा अंधुक पुरस्कार त्यांच्या राजकीय कादंबर्‍यांतून प्रत्ययास येतो. राजकारणानंतर निसर्ग आणि शृंगार हे विषय त्यांच्या कादंबर्‍यांमध्ये प्रामुख्याने दिसून येतात. ‘नागकन्या’ आणि ‘डाकबंगला’सारख्या त्यांच्या कादंबर्‍या त्यातल्या शृंगारिकतेमुळे त्याकाळी खूप चर्चेत राहिल्या होत्या. त्यांच्या कादंबर्‍यांमध्ये आलेली निसर्गवर्णने उल्लेखनीय होती. त्यांनी लिहिलेल्या निसर्गवर्णनांमधून त्यांची सौंदर्यदृष्टी आणि कलात्मक चित्रदर्शी वर्णनशैली प्रत्ययास येते. मराठी कादंबरी प्रवासातील महत्त्वाच्या टप्प्यांचा अभ्यास करताना माडखोलकरांचे नाव आवर्जून घ्यावे लागते.

कादंबरीकारासोबतच एक उत्तम समीक्षक म्हणूनही ग. त्र्यं. माडखोलकर यांच्या नावाची दखल घेतली जाते. 1921 साली ‘आधुनिक कविपंचक’ हे माडखोलकरांचे पहिले पुस्तक समीक्षात्मक पुस्तक प्रकाशित झाले. रेव्ह. टिळक, केशवसुत, गोविंदाग्रज, विनायक व बालकवी या पाच कवींच्या कवितेचा रसग्रहणात्मक परामर्श या पुस्तकात घेतलेला असून, या पहिल्या पुस्तकाने समीक्षक म्हणून ते प्रसिद्धीस आले. माडखोलकरांचे ‘आधुनिक कविपंचक’ हे पुस्तक रसास्वादी समीक्षेचे उत्तम प्रात्यक्षिक मानले जाते. समीक्षकाला आवश्यक असलेली चिकित्सा आणि रसिकता यांचा सुंदर समन्वय या पुस्तकात दिसतो. आस्वादक समीक्षेचा एक मानदंड त्या काळात माडखोलकरांनी घालून दिला. ग्रंथातून ग्रंथकारांचा अभ्यास कसा करायचा, याचे मार्गदर्शन त्यांनी त्यांच्या समीक्षेतून केले.

‘विष्णू कृष्ण चिपळूणकर : टीकात्मक निबंध’, ‘विलापिका’, ‘स्वैरविचार’, ‘माझे आवडते कवी’, ‘अवशेष’, ‘माझी नमोवाणी’, ‘जीवनसाहित्य’, ‘परामर्श’, ‘माझे आवडते लेखक’, ‘माझे लेखनगुरू’, ‘महाराष्ट्राचे विचारधन’ यांसारखे त्यांचे प्रबंध व लेखसंग्रह उल्लेखनीय आहेत. ‘व्यक्तिरेखा’, ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ आणि ‘श्रद्धांजली’ ही व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके आणि ‘दोन तपे’, ‘एका निर्वासिताची कहाणी’, ‘मी आणि माझे साहित्य’, ‘मी आणि माझे वाचक’ ही विशेष निर्देशनीय अशी आत्मपर पुस्तकेही त्यांनी लिहिली. कादंबरीकार आणि समीक्षक ही त्यांची ओळख महत्त्वाची ठरली असली, तरीही इतर अनेक साहित्यप्रकारही त्यांनी तितक्याच समर्थपणे हाताळले.

साहित्यनिर्मितीसोबतच महाराष्ट्राला आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीसाठी ग. त्र्यं. माडखोलकर यांची दखल घ्यावी लागते ती म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदान. दि. 12 मे 1946 रोजी बेळगाव येथे झालेल्या 30व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माडखोलकर अध्यक्ष होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कार केला आणि त्याबद्दलचे तीन ठरावही मान्यवरांच्या स्वाक्षर्‍यांसह त्या अधिवेशनात पारित करवून घेतले. 1946 नंतर संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात माडखोलकरांचा सक्रिय सहभाग होता. आपली लेखणी व वाणी त्यांनी त्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोगात आणली. त्याकाळातील त्यांचा पत्रव्यवहारही महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने मोलाचा खूप मोलाचा ठरला.

तत्कालीन राजकारण आणि समाजजीवनाचे अंतरंग ग. त्र्यं. माडखोलकरांनी आपल्या लिखाणातून मांडले आहेत. एकूण 55 ग्रंथसंपदा आणि पाच हजारांवर अग्रलेख अशी साहित्यनिर्मिती त्यांच्या नावावर आहे. एक माणूस आणि पत्रकार म्हणून अनुभवलेला काळ त्यांनी त्यांच्या साहित्यात चितारला आहे. त्यामुळे त्यांच्या काळाचे ते साक्षीदार राहिले आहेत. अशा या महान साहित्यिकाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

दिपाली कानसे 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121