दिल्ली : दरवर्षी राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकारची मंत्रालये/विभाग प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा भाग म्हणून कर्तव्य पथावर त्यांच्या संस्कृतीचे, वैशिष्ट्याचे सादरीकरण करतात. यावर्षी या सादरीकरणासाठी 'सुवर्ण भारत: वारसा आणि विकास' हा विषय (थीम) ठरवण्यात आला आहे.
या सोहळ्याचा सर्वात महत्वाचा भाग असतो तो म्हणजे ‘चित्ररथ’. विविध राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि मंत्रालयांनी मांडलेल्या चित्ररथ कल्पनांचा विचार करून, वैचारिक वेगळेपण, नाविन्यता, संदेशासह सर्जनशील अभिव्यक्ती, सूक्ष्मता आणि थेटपणा, वारसा आणि विकासाचे दर्शन या गोष्टींचा विचार करून कर्तव्यपथावर त्यांचे चित्ररथ सादर करण्यासाठी १५ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची निवड करण्यात आली आहे. या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आंध्र प्रदेश, बिहार, चंदीगड, दादर नगर हवेली आणि दमण आणि दीव, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाब, त्रिपुरा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे. याशिवाय, केंद्र सरकारच्या ११ मंत्रालय/विभागांची देखील या सादरीकरणासाठी निवड करण्यात आली आहे.