ठाणे : ठाण्यातील ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा ‘धनुष्यबाण’ या चिन्हावर निवडणुकीत उभे ठाकलेले शिवसेना महायुतीचे उमेदवार विकास पुरुष प्रताप सरनाईक ( Pratap Sarnaik ) यांनी मतदारांना दुप्पट विकासाची हमी दिली आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या प्रतिनिधीने त्यांच्याशी साधलेला हा संवाद...
शिवसेना महायुतीकडून ओवळा-माजिवडा मतदारसंघातून चौथ्यांदा रिंगणात आहात? याबद्दल काय सांगाल.
आमचे दैवत स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्वाचा वारसा आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांचे समाजसेवेचे व्रत अंगिकारून वाटचाल करीत आहे. त्यामुळेच शिवसेनेने किंबहुना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौथ्यांदा माझ्यावर विश्वास टाकला आहे. त्यामुळे माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि ठाणे-मिरा भाईंदरमधील समस्त जनता, यावेळीही हा विश्वास सार्थ ठरवेल, यात शंका नाही!
शहरातील रस्त्यांची अवस्था आणि वाहतूक कोंडीवर आपण काय उपाययोजना करणार आहात?
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तसेच रस्ते व वाहतुकीच्या समस्येवर विशेष लक्ष दिले आहे. कोस्टल रोड, मेट्रो मार्गी लागत असून अंतर्गत मेट्रो आणि ठाणे-बोरिवली बोगद्यालाही ग्रीन सिग्नल मिळाला आहे. जलवाहतुकीने शहरे जोडणार आहे. कापूरबावडी ते गायमुख ६० मीटर आणि गायमुख ते फाऊंटन ३० मीटर रस्त्याच्या ६० मीटरपर्यंत विस्तारीकरणाच्या कामास सुरुवात झाली आहे. यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे. दहिसर-भाईंदर लिंक रस्ता करणार आहे.
हा युतीचा बालेकिल्ला आहे. पण, आता दोन शिवसैनिकांमध्ये लढत असून त्यात मनसे फॅक्टरही आहे.
२०१४ सालापासून मागील तीन टर्म या मतदारसंघातील मतदारांनी युतीलाच कौल दिला आहे. त्यामुळे जरी दोन शिवसैनिकांमध्ये लढत असली तरी याही वेळेला मतदार राजा शिवसेना महायुतीच्याच पारड्यात भरघोस मतांचे दान टाकील. निवडणूक प्रत्येकाला जिंकायचे असते. तेव्हा, आम्ही कुणालाही कमी लेखत नाही. मनसे असो अथवा, उबाठा या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांना अद्याप या मतदारसंघाच्या सीमारेषा कळलेल्या नाहीत. त्यांना ठाणे ते मिरा-भाईंदरची सीमा कळेपर्यंत मतदान होऊन जाईल. त्यामुळे यावेळी एक लाखांहून अधिकच्या मताधिक्याने विजय मिळेल, अशी आशा आहे.
मतदारसंघात उच्च, मध्यम वर्गासह आगरी समाजाची लोकसंख्या आहे. गेली १५ वर्षे इथले आमदार आहात, हा अनुभव
कसा होता?
आमदारकीची कारकीर्द सुरू केल्यापासून सर्वधर्मीय उच्च, मध्यमवर्गीयांसह आगरी समाजानेही मला नेहमी साथ दिली आहे. १५ वर्षांच्या आमदारकीमध्ये मतदारसंघात आगरी समाजाच्या हितासाठी अनेक विकासकामे केली आहे. त्यांच्या समस्यांवेळी प्रसंगी आंदोलनातही सहभागी झालो. आता तर महायुती सरकारने आगरी-कोळी समाजासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून भूमिपुत्रांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येणार आहेत. दहीहंडी असो वा भव्य फेस्टीव्हल जात, धर्म, पंथ न पाहता सण-उत्सवाची संस्कृती जपून थोरा-मोठ्यांच्या गाठीभेटी आणि ऋणानुबंध कायम जपत आलो आहे.
मिरा-भाईंदर मधील १९८४ सालापूर्वीच्या इमारतींसाठी काय प्रयोजन आहे?
मिरा-भाईंदर शहरातील १९८४ सालापूर्वीच्या ३० वर्ष जुन्या व धोकादायक अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकासासाठी पुढाकार घेतला. मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून तांत्रिक बाबी तपासून यातील सर्व अडथळे दूर केले आहेत. त्यामुळे या इमारतीतील हजारो रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.