भालचंद्र नेमाडे यांच्या मुक्ताफळांवर भारतीय इतिहास संकलन समितीची नेमकी भूमिका

    07-Aug-2023
Total Views | 8265

itihas sankalan samiti  
 
मुंबई, दि. ७ प्रतिनिधी : शनिवारी दादर येथे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात पद्मश्री डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी अनेक निराधार वक्तव्ये केली. त्यातील औरंगजेबाशी निगडित मुद्द्याचे खंडन अनेक अभ्यासकांनी केले आहे परंतु त्यांच्या इतर धादांत खोट्या वक्तव्यांकडे दुर्लक्षच झाले. याबाबत भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांतने प्रदीर्घ प्रतिक्रिया देऊन सर्वच मुद्द्यांचे संदर्भासहित खंडन केले आहे.
 
नेमाड्यांच्या प्रयत्न खरंच केविलवाणा! - रविराज पराडकर
 
"मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी समारंभात ज्येष्ठ साहित्यिक श्री भालचंद्र नेमाडे ह्यांनी औरंगजेब आणि काशीविश्वनाथ मंदिर, शिवछत्रपतींचे मुस्लीम सेनापती आणि पेशव्यांसंदर्भातील केलेली द्वेषमुलक वक्तव्ये अनैतिहासिक आहेतच परंतु धादांत खोटी आहेत . ग्रंथवाचनासंबंधीत आपल्या भाषणात अशी अप्रासंगिक वक्तव्ये केवळ लोकांची दिशाभूल करण्यासाठी हेतुपूर्वक केल्याचे जाणवते . इतिहासाचा सखोल अभ्यास करून पुराव्यांची शहानिशा करून विधानं करण्याऐवजी इथून तिथून वाचलेलं काहीतरी खरं म्हणत रेटण्याचा भ्रामक पराक्रम नेमाड्यांनी आपल्या भाषणात केलाय . काशीविश्वनाथ मंदिरातील औरंगजेबासंबंधीत कच्छच्या राणीची गोष्ट ही निव्वळ काल्पनिक असून ती स्वर्गीय काँग्रेसी नेते डॉ. भोगराजू पट्टाभि सितारामय्या यांच्या 'फिदर्स आणि स्टोन्स ' ह्या पुस्तकातील केवळ हिंदुमुस्लीम ऐक्य आणि औरंगजेब हिन्दुद्वेष्टा नव्हता हे समजावून देण्यासाठी केलेला कल्पनाविलास आहे. त्याला कोणत्याही ऐतिहासिक कागदाचा आधार लेखकाने दिलेला नाही . औरंगजेबाने काशीविश्वनाथाचे मंदिर कधी व कशासाठी पाडले हे ऐतिहासिक सत्य दुसर्याी कुणी सांगण्याऐवजी खुद्द त्याला जवळून पाहणारा नोंदकर्ता साकी मुस्तैदखान ह्याने मासिर इ आलमगीरी ग्रंथात लिहून ठेवले आहे. औरंगजेबाच्या दख्खन मोहीमेत सहभागी असलेला भीमसेन सक्सेना तारीख इ दिलकुशा मध्ये औरंगजेबाच्या धर्मांधतेची माहिती पुरवतो . परंतु नेमाडेंना हिंदुच्या विरोधात केलेल्या औरंगजेबाच्या अनेक कृत्यांचे पुरावे असणारे असले तत्कालीन ग्रंथ अभ्यासण्यास वेळ मिळालेला नसावा . कदाचित म्हणून त्यांनी औरंगजेबाला हिन्दुद्वेष्टा ठरविणार्यास लोकांवरच गरळ ओकल्याचे दिसते. ज्या पेशव्यांनी स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर केले त्यांना नीच, दुष्कर्मी शब्द वापरून नेमाड्यांना नेमकं काय साधायचं होतं ? ज्या पेशवा नानासाहेबाच्या काळात मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकवले, अब्दाली सारख्या शत्रूपासून भारताचे रक्षण व्हावे म्हणून पानीपताची मोहीम काढली, रणांगणी ज्याचा भाऊ सदाशिवरावभाऊ आणि पोटचा पुत्र विश्वासराव यांनी देह ठेवले, त्या नानासाहेबांना आठदहा वर्षाच्या पोरींना अशुद्ध करणारा लंपट भोगी म्हणून चित्रित करण्यामागे नेमाड्यांचा नक्की हेतु कोणता ? छत्रपती शिवरायांचा मुख्य सेनापती मुस्लीम होता आणि मराठी - हिंदुंसारख्या आपल्या माणसांवर महाराजांचा विश्वास नव्हता म्हणून त्यांनी आयुष्यभर मुस्लीम अंगरक्षक ठेवले अशी धादांत खोटे बोलण्याची हिंमत नेमाड्यांनी बहुधा व्हॉटसअप युनिव्हर्सिटीचे आजीव सदस्य झाल्यामुळे केली असावी . शामराज, माणकोजी, नेतोजी, प्रतापराव, हंबीरराव असे एकामागोमाग झालेले शिवरायांचे मुख्य सेनापती त्यांच्या विश्वासातील नव्हते किंवा मदारी मेहतर ह्या काल्पनिक पात्राला शिवरायांनी आजन्म शेजारी बाळगले होते असा नेमाड्यांचा कयास बहुधा अज्ञानाने झाला असावा . मुस्लीमधार्जिणेपणाच्या नादात शिवरायांचे विश्वासू असलेल्या बाजी-तानाजींसारख्या कैक शूरवीरांनी स्वराज्यासाठी जे बलिदान दिले ते विसरुन शिवरायांचा आपल्या लोकांवर विश्वासच नव्हता हे ठासून सांगण्याचा नेमाड्यांचा प्रयत्न खरंच केविलवाणा असून त्याची कीव करावीशी वाटते . औरंगजेबाच्या सैन्यात पन्नास टक्क्याहून अधिक हिंदु होते हे कोणत्या यादीवरून नेमाड्यांनी परिक्षिले ते त्यांचे त्यांनाच ठाऊक . औरंगजेबासह अनेक मुस्लीम सत्ताधीशांनी केलेली हिंदुविरोधी कृत्ये आणि शिवरायांच्या कडील मुस्लीम सरदार, कधी, कोण, किती याचे जे विवरण मूळ पुराव्यांनिशी ज्येष्ठ इतिहासकार श्री गजानन मेहेंदळे ह्यांनी वेळोवेळी केले आहे त्याचा नेमाडेंनी जरूर अभ्यास करावा. मोडी शिकून पेशवे दप्तर नीट धांडोळावे . ऐतिहासिक दस्तावेज वाचावेत . पण नेमाड्यांनी जाणिवपूर्वक भाष्य केलं असल्यास यातील कदाचित काहीच ते करणार नाहीत . आपण मात्र सावध असावं . खोटा इतिहास ठामपणे मांडून संभ्रम निर्माण करण्याचा हा नेमाड्यांचा प्रयत्न निषेधार्ह असून सुजाण आणि सुशिक्षित समाजात तो यशस्वी होणार नाही हे नक्की!"

रविराज पराडकर
उपाध्यक्ष,
भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांत


अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121