अनंत करमुसे प्रकरण : जितेंद्र आव्हाडांची झोप उडवणार, पाचशे पानी चार्जशीट दाखल
24-May-2023
Total Views | 855
मुंबई : ठाण्यातील अनंत करमुसे यांना मारहाण केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. आव्हाड आणि त्यांचा सहकाऱ्यांच्या बद्दलचा ९० दिवसांचा तपास पूर्ण झाला असून त्यांसंदर्भात पुन्हा अतिरिक्त चार्जशीट दाखल करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे मंत्री असताना फेसबूक पोस्ट केल्या प्रकरणी करमुसे यांना नाद या आव्हाडांच्या निवासस्थानी मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयीन लढाई सुरू असतानाच फिर्यादी असणारे करमुसे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर ठाणे पोलीसांना ९० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर त्यांनी पाचशे पानांची चार्जशीट दाखल केली आहे.
ठाण्यातील घोडबंदर रोड येथील कावेसर भागात राहणारे अभियंता अनंत करमुसे यांनी ५ एप्रिल २०२० रोजी ठाकरे सरकारमधील तत्कालीन मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात समाजमाध्यमावर आक्षेपार्ह टीप्पणी केल्याच्या रागातुन आव्हाड यांचे अंगरक्षक (पोलीस) आणि कार्यकर्त्यांनी करमुसे यांना घरातुन उचलुन आव्हाड यांच्या नाद बंगल्यावर नेत बेदम मारले होते. याप्रकरणी वर्तकनगर पोलीसांनी गुन्हा दाखल करून,आव्हाड यांच्या स्वीय सहायकासह सहा कार्यकर्त्याना अटक केली होती. यातील तिघाही पोलिसांची विभागीय चौकशी केली होती.मात्र, पोलिसांनी आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या बडग्याने तब्बल दीड वर्षानंतर दि.१४ ऑक्टो.२०२१ रोजी सायंकाळी वर्तकनगर पोलिसांनी आव्हाड यांना छुटपुट अटक करून तात्काळ त्यांची जामिनावर मुक्तता केली होती.
तर,महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगानेही पोलीस कॉन्स्टेबल सागर तुषार मोरे, पोलिस नाईक सुरेश आवाजी जनाठे आणि पोलीस हवालदार वैभव शिवाजी कदम यांच्याविरोधात कंटेप्ट ऑफ कोर्टचा ठपका ठेवला होता. दरम्यान,या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशीसाठी केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर करमुसे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने तीन महिन्यात चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश २४ फेब्रु.२०२३ रोजी दिले होते.
याच प्रकरणाचा आता माफीचा साक्षीदार बनायची तयारी दर्शवलेल्या वैभव कदम याने रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली आहे. वैभव कदम हा माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्ग आव्हाड यांचा सुरक्षारक्षक होता. महत्त्वाचे म्हणजे करमुसे प्रकरणात कदम यांचीही आरोपी म्हणून चौकशी सुरु होती. दरम्यान, अनंत करमुसे प्रकरणात मोहित कंबोज यांनी धक्कादायक आरोप केला आहे. ही आत्महत्या नसून खुन आहे, असा दावा मोहित कंबोज यांनी केला होता.