मुंबई : आप्पापाड्यातील दुर्घटनाग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळावी यासाठी छात्रभारतीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. याची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने मदतीचे परिपत्रक आज जारी केले आहे. आगीमुळे विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक साहित्य व पाठ्यपुस्तके जळून गेलीत, परीक्षेच्या तोंडावर कुठलेही स्टडी मटेरियल त्यांच्याजवळ राहिलेले नाही म्हणून छात्रभारतीच्या वतीने मागण्यांचे निवेदन मा.कुलगुरुंना देण्यात आले होते त्यावर विचार करुन आज विद्यापीठाने विद्यार्थ्यांची आयडी कार्ड फी व तत्सम सर्व शुल्क माफीचे, पुस्तकपेढीतून पुस्तक उपलब्ध करण्याचे व सर्व जळालेली शैक्षणिक कागदपत्रे विनामुल्य देण्याचे नमुद केले आहे.
आप्पा पाड्यातील विद्यार्थ्यांसाठी मागच्या १५ दिवसांपासून छात्रभारती सातत्याने पाठपुरावा करत आहे. अखेर ठिय्या आंदोलनानंतर विद्यापीठाला जाग आली व त्यांनी परिपत्रक जारी केले असे छात्रभारतीचे राज्याध्यक्ष रोहित ढाले यांनी सांगितले. तद्प्रसंगी राज्याध्यक्ष रोहित ढाले, संघटक सचिन बनसोडे, मुंबई अध्यक्ष विकास पटेकर, निकेत वाळके, भवानजी कांबळे, आशिष जाधव, प्रदिप मिसाळ, वैभव गाडेकर, विशाल कदम हे उपस्थित होते.