स्वातंत्र्यलढ्याला भारतीय मूल्यांचे अधिष्ठान देणारा महात्मा!

    01-Oct-2023
Total Views | 127
Article On Mahatma Gandhi contribution

महात्मा गांधींवरील आरोप किंवा मतभेद गृहीत धरूनही स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे योगदान नाकारता येणार नाही. प्रामुख्याने त्यांनी चळवळीला जे भारतीय अधिष्ठान दिले, त्यामुळे त्या योगदानाला झळाळी प्राप्त होते. त्यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या या योगदानाचा मागोवा घेणे औचित्याचे ठरावे.

"अफाट कर्तृत्वाची व्यक्ती असली, तरी ते कर्तृत्व अमर्याद नसते, त्या व्यक्तिमत्त्वात जसे गुण असतात; तसेच दोष असतात, जशी सामर्थ्यस्थळे असतात, तशा मर्यादाही असतात. त्या मर्यादा त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाला कमीपणा आणत नाहीत, तर त्याचे माणूसपण सिद्ध करतात,” या आशयाचे भाष्य नरहर कुरुंदकर यांनी केले होते. महात्मा गांधी यांच्या काही धोरणांशी, त्यांच्या काही निर्णयांशी आणि त्यांच्या व्यक्तित्त्वातील काही कंगोर्‍यांशी मतभेद निश्चितच असू शकतात. महात्मा गांधी यांनी पाठिंबा दिलेली खिलाफत चळवळ किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस यांना दुसर्‍यांदा काँग्रेसचे अध्यक्षपद मिळू देण्यात केलेली खळखळ किंवा आपल्या मुलांवर लादलेली आपली मते, या आणि अशा काही घटना-प्रसंगांमुळे महात्मा गांधींवर ते अधिनायकवादी असल्याची टीका त्यांच्या जीवनाकडे वस्तुनिष्ठ आणि चिकित्सक वृत्तीने पाहणारे करू शकतील आणि करतात.

स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे विसर्जन व्हावे, अशी इच्छा गांधीजींनी प्रदर्शित केली होती; पण त्या चळवळीचे रुपांतर राजकीय पक्षात होत असताना महात्मा गांधी ती प्रक्रिया थोपवू शकले नाहीत, असा आरोप त्यांच्यावर होऊ शकतो. हे मतभेद वैचारिक स्तरावरील आहेत, व्यक्तिगत नाहीत. त्यामुळेच हे आरोप किंवा मतभेद गृहीत धरूनही स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधी यांचे योगदान नाकारता येणार नाही. प्रामुख्याने त्यांनी त्या चळवळीला जे भारतीय अधिष्ठान दिले, त्यामुळे त्या योगदानाला झळाळी प्राप्त होते. त्यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या, या योगदानाचा मागोवा घेणे औचित्याचे ठरावे.

महात्मा गांधी हे जवळपास दोन दशके दक्षिण आफ्रिकेत वास्तव्याला होते. मात्र, तेथेही वसाहतवाद्यांच्या अरेरावीला त्यांना आणि भारतीय समुदायाला तोंड द्यावे लागत होते. भारतात त्याचवेळी महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक अशी उत्तुंग व्यक्तिमत्त्वे ब्रिटिश राजवटीस आपापल्यापरीने आणि पद्धतीने विरोध करीत होती. मात्र, त्यांच्या मार्गांमध्ये मूलभूत फरक होता. गोखले नेमस्त होते आणि त्यांचा कल हा राजकारणाच्या आध्यात्मिकीकरणाकडे होता. गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून काही काळासाठी भारतात आले, तेव्हा त्यांची भेट १८९६ साली लोकमान्य टिळकांशी झाली होती. लोकमान्यांचा मार्ग हा गोखल्यांचा मार्गापेक्षा भिन्न होता, तो जहाल मार्ग होता; पण तरीही तो क्रांतिकारकांचा नव्हता. किंबहुना, गोखले यांचा मार्ग आणि आणि क्रांतिकारकांचा मार्ग, हा असामान्यांचा मार्ग आहे, अशी लोकमान्यांची धारणा होती, ते मार्ग निषिद्ध आहेत, असे त्यांनी मानले नाही. उलट ‘साधनानाम अनेकता’ अशी त्यांची धारणा होती. पण, तरीही जनआंदोलन जोवर उभे राहत नाही, तोवर स्वातंत्र्य चळवळीला धार येणार नाही, असे लोकमान्यांचे मत होते. सार्वजनिक गणेशोत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव टिळकांनी सुरू केले, ते त्याच हेतूने. त्यांचा परिणामही दिसू लागला.

गांधीजींनी गोखले यांना आपले राजकीय गुरू मानले होते. मात्र, गांधीजींनी राजकारणात प्रयोग केले ते मात्र लोकमान्यांच्या धारणेशी जवळीक सांगणारे. गोखले यांनी राजकारणात नैतिकतेचा पुरस्कार केला होता, तो गांधीजींनी घेतला. पण, कार्यपद्धती टिळकांची पुढे नेली. ती म्हणजे स्वातंत्र्य चळवळीला जनआंदोलनाचे स्वरूप देण्याची. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी निशस्त्र प्रतिकाराचे आयुध वसाहतवाद्यांना विरोध करण्यासाठी वापरले होते. १९१५च्या सुमारास गांधीजी कायमसाठी भारतात परतले. गोखले यांचे देहावसान आणि मंडालेचा तुरुंगवास भोगून परतलेले टिळक, असा तो काळ होता. टिळक खर्‍या अर्थाने राष्ट्रीय लोकमान्य नेते ठरले होते, तो हा काळ होता. त्या पार्श्वभूमीवर गांधीजींनी भारतात आपल्या राजकीय-सार्वजनिक कार्याला सुरुवात केली. गोखले या आपल्या गुरुंच्या सूचनेवरून देशभर गांधीजींनी प्रवास केला आणि परिस्थिती जाणून घेतली.

टॉलस्टॉयचा प्रभाव गांधीजींवर होता, तसाच भारतीय परंपरांचाही होता. भगवद्गीतेचा होता, तसा सनातन हिंदू धर्माचाही होता. तेव्हा आपल्या राजकीय चळवळीला गांधीजींनी दिलेल्या दिशेला, या सगळ्या परिमाणांचे कोंदण लाभलेले होते. निशस्त्र प्रतिकार या शब्दांतून काहीशी निष्क्रियता प्रतीत होते; म्हणून अधिक सकारात्मक, असा सत्याग्रह हा शब्द गांधीजींनी वापरला. सत्यवादी हरिश्चंद्रावर बेतलेले नाटक आपण लहानपणी पाहिलेले होते आणि त्याच्या सत्यवादीपणाने आपल्याला प्रभावित केले होते, असे गांधीजींनी आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे. सत्याग्रह शब्दाची रचना कारणात तोही प्रभाव काही अंशी कारणीभूत असावा.

सत्याग्रह आणि अहिंसा या साधनांना गांधीजींनी व्यापक स्वरूप दिले. त्या दोन्हींचा उगम हा भारतीय दर्शनांमध्ये आहे, हे नाकारता येणार नाही. त्याचा राजकीय साधन म्हणून उपयोग गांधीजींनी केला. लोकमान्यांनी स्वातंत्र्य चळवळीला जनआंदोलनाचे स्वरूप दिले. गांधीजींनी तेच धोरण पुढे नेले. गोखले किंवा क्रांतिकारकांचा मार्ग हा उतुंग होता; पण असामान्यांच्या होता. मूठभर असामान्यांनी सर्वस्वाचा त्याग करावा आणि बाकीच्यांनी केवळ त्यांचे पोवाडे आणि गोडवे गावे, अशाने स्वातंत्र्य चळवळीला धार येणार नाही. सर्व जनतेने थोडा त्याग करावा, हे श्रेयस्कर असे गांधीजींनी म्हटले होते. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीला त्याच पद्धतीने आकार दिला. ‘असहकार आंदोलन’ असो किंवा ‘मिठाचा सत्याग्रह’ असो किंवा ‘चले जाव आंदोलन’ असो, त्यात सामान्य जनता सामील झाली. स्वातंत्र्य आंदोलनात आपलाही सहभाग असू शकतो, ही प्रेरणा गांधीजींनी उत्पन्न केली, ती ज्योत सामान्य भारतीयाच्या हृदयात प्रज्ज्वलित केली. त्यापुढचे योगदान म्हणजे मोठ्या प्रमाणावर महिला, या आंदोलनात सहभागी होऊ लागल्या. अवंतिकाबाई गोखले यांनी चंपारण्यमध्ये ज़ाऊन काम केले, हे त्याचे एक प्रातिनिधिक उदाहरण. याच अवंतिकाबाई गोखले यांनी टिळकांच्या हयातीत गांधीजींचे चरित्र लिहिले आणि टिळकांनी त्यास प्रस्तावना लिहिली होती.

सत्याग्रह, अहिंसा यांना गांधीजी स्वातंत्र्य चळवळीत आयुधांच्या रुपात उतरवू शकले, याचे कारण त्यामागे त्यांचे नैतिक पाठबळ होते. मार्क्सवाद्यांनी साधनापेक्षा साध्य वरचढ ठरविले होते. गांधीजींचा त्या विचाराशी मतभेद होता. ध्येय उदात्त असतानाच साधन शुद्ध असायला हवे, याचा गांधीजींचा आग्रह होता. चौरीचौरा येथे आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर गांधीजींनी ते आंदोलन तातडीने मागे घेतले, त्यासाठी रोषही पत्करला. पण, साधनाच्या शुद्धतेविषयी आपला आग्रह असल्याचे त्यांनी यातून अधोरेखित केले. उपोषणाला गांधीजींनी राजकीय आयुध बनविले. मात्र, उपोषण असो किंवा सत्याग्रह या सगळ्याची बीजे ही गांधीजींना हिंदू, बौद्ध, जैन या परंपरांत असणार्‍या आस्थेत आढळतील. आपण सनातनी हिंदू आहोत, असे गांधीजी म्हणत; मात्र याचा अर्थ त्यातील दोष स्वीकारणे, त्यांना मान्य नव्हते. अस्पृश्यतासारख्या दोषांचे निवारण होण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न म्हणजे हिंदू समाजाच्या संघटनेसाठी केलेलेच प्रयत्न होत.

स्वदेशीचा गांधीजींनी पुरस्कार केला; पण स्वदेशी म्हणजे केवळ वस्तूंपुरती मर्यादित नसून, त्याचा व्यापक अर्थ गांधीजींनी उलगडून दाखविला. त्यांच्यावर असणार्‍या भारतीय परंपरांच्या संस्कारांचे द्योतक हे की, स्वदेशीची आपली संकल्पना सांगताना त्यांनी भगवद्गीतेतील श्लोक उद्धृत केले. खादी, चरखा यांचा संबंध त्यांच्या दृष्टीने केवळ अर्थकारणाशी नव्हता, तर राजकीय विकेंद्रीकरणाशी होता. खेडेगावे स्वयंपूर्ण व्हावीत आणि स्वावलंबी व्हावीत, हा त्यामागचा विचार होता. राजकीय निर्णयांची ती केंद्रे बनवीत, ही त्यामागील भूमिका होती. ‘ग्रामीण सूर्यमालेत खादी हा सूर्य आहे,’ असे गांधीजी म्हणत. तेव्हा स्वातंत्र्याची उर्मी ही अनेक अंगांनी सामान्य माणसात फुलवत राहण्याचा गांधीजींचा विचार होता. शिक्षणाच्या बाबतीतदेखील गांधीजींचे विचार भारतीयत्वाशी सुसंगत होते. शिक्षणाने माणूस आधुनिक व्हावा, असे गोखले यांचे मत होते. तो देशभक्त व्हावा, अशी टिळकांची धारणा होती, तर जीवन आणि शिक्षण यांची सांगड असायला हवी, असे गांधीजींचे मत होते. इंग्रजीच्या गांधीजी विरोधात नव्हते.

तथापि, शिक्षण हे मातृभाषेतून होणे इष्ट, असे त्यांचे मत होते. किंबहुना असहकार आंदोलन पुकारले, तेव्हा त्यांनी सरकारी शाळांवर, महाविद्यालयांवर बहिष्काराचे आवाहन केले. राष्ट्रीय विद्यापीठे, महाविद्यालये त्यानंतर मोठ्या प्रमाणावर स्थापन होण्यास सुरुवात झाली. स्वातंत्र्य लढ्याचा हाही महत्त्वाचा आयाम आहे. परकीय भाषेतून शिक्षण घेणारे आपल्याच भूमीत परकीय झाले आहेत, अशी वेदना गांधीजींनी ‘यंग इंडिया’मध्ये १९२१ साली मांडली होती. राष्ट्र म्हणून स्वकीय भाषांना महत्त्व देणे आवश्यक, याचे ते पुरस्कर्ते होते. शासकीय कार्यालये आणि न्यायालयात स्थानिक-प्रादेशिक भाषेचा वापर सुरू होणे, ही या धोरणाची अंतिम कसोटी आहे, असे त्यांनी १९३८ साली ‘हरिजन’च्या अंकात लिहिले होते. त्यांच्या द्रष्टेपणाचे हे उदाहरण म्हटले पाहिजे. स्वातंत्र्यलढा म्हणजे केवळ ब्रिटिशांपासून मुक्तता असा नाही, तर स्वातंत्र्य-स्वराज्य यांना व्यापक अर्थ आहे, अशी गांधीजींची भूमिका होती. तिचा प्रत्यय यातून आल्याखेरीज राहणार नाही.

स्वातंत्र्य चळवळीला गांधीजींनी भारतीय अधिष्ठान दिले होते, याचे एक द्योतक म्हणजे त्यांनी सुरू केलेली वृत्तपत्रे आणि त्यांची भाषणे. सुभाषचंद्र बोस यांनी म्हटले होते की, “गांधीजी जेव्हा बोलतात, तेव्हा ते सामान्य माणसाच्या भाषेत बोलतात. स्पेन्सर किंवा एडमंड बर्कच्या भाषेत बोलत नाहीत, तर भगवद्गीता आणि रामायणाच्या भाषेत बोलतात, ते जेव्हा सामान्य माणसाशी संवाद साधतात, तेव्हा ते स्वायत्तता इत्यादी सांगत नाहीत, तर रामायणाचा गौरव करणारी त्यांची भाषा असते. ते बुद्ध आणि भगवान महावीर यांची आठवण करून देतात.“ भगिनी निवेदिता यांची भेट गांधीजींनी घेतली होती, तेव्हा निवेदिता यांच्या हिंदू धर्माविषयीच्या आस्थेने आपण भारावून गेल्याचे त्यांनी म्हटले होते. तेव्हा हिंदू धर्म, भारतीय प्राचीन परंपरा यांचा आधार घेऊन गांधीजींनी स्वातंत्र्य चळवळीला आपले नेतृत्व प्रदान केले.

सामान्य जनतेमध्ये स्वातंत्र्याची आकांक्षा निर्माण केली, नेतृत्वाच्या फळ्या घडविल्या. उद्योगपतींशी गांधीजींचे स्नेहाचे संबंध होते आणि भांडवलदारांची मदत गांधीजी स्वातंत्र्यलढ्यात घेतात, यावर मार्क्सवाद्यांना आक्षेप होता. भांडवलदारांच्या विरोधात गांधीजी कधीही भूमिका घेऊ शकणार नाहीत, अशी मार्क्सवाद्यांनी घेतलेली भूमिका होती. मात्र, कोणत्याही उद्योगपतीने गांधीजींच्या स्वातंत्र्यलढ्याच्या कार्यपद्धतीला, दिशेला आणि त्यामागील भूमिकेला प्रभावित केल्याचे आढळत नाही. उलटपक्षी आपल्याजवळील संपत्तीचे आपण केवळ विश्वस्त आहोत आणि त्यावर देशाचा आणि देशवासीयांचा अधिकार आहे, ही शिकवण गांधीजींनी बिंबविली. संपत्तीचे विश्वस्त असणे म्हणजे काय, या संकल्पनेची उमज आपल्याला भागवद्गीतेतून मिळाली, असे गांधीजींनी म्हटले होते. अपरिग्रह, अनासक्ती अशा संकल्पनांमधून विश्वस्त संकल्पना त्यांना स्पष्ट झाली.

स्वातंत्र्यलढ्याला व्यापक आयाम गांधीजींनी दिला. त्यांचे सर्वच निर्णय आणि धोरणे यांच्याशी सहमती होईल असे नाही. स्वातंत्र्यलढ्यात देखील अनेक प्रवाह आपापल्या कार्यपद्धतीने, विचारधारेने आपले योगदान देत होते आणि त्या प्रवाहांमध्ये अंतर्विरोध होते. ते नाकारता येणार नाहीत. मात्र, समान काही असेल तर स्वातंत्र्यप्राप्तीची उर्मी. गांधीजींनी अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्ग निवडला. त्यात देशातील लक्षावधी सामान्य माणसे सहभागी झाली. गांधीजींनी स्वातंत्र्य लढ्याला जनआंदोलनाचे व्यापक रूप दिले. त्याला भारतीय मूल्यांचे अधिष्ठान होते, ही त्यातील लक्षणीय बाब.

राहूल गोखले
९८२२८२८८१९

अग्रलेख
जरुर वाचा
भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

वसई विरार शहर महापालिका क्षेत्रातील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध शासकीय दाखल्यांची अत्यंत गरज भासत असते. त्यासाठी त्यांना व त्यांच्या पालकांना शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. वसई तहसीलदार ऑफिसला जाणे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शक्य होत नसल्याने ही गैरसोय टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाद्वारे वसई तहसील कार्यालयाकडील उत्पन्न दाखले, अधिवास दाखले, क्रिमिलेअर दाखले, ज्येष्ठ नागरिक दाखले, रेशन कार्ड ऑनलाइन करून घेणे अशा विविध कामकाजाचे शिबिर शनिवार १४ जून रोजी कातकरीपाडा, चंदनसार..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121