माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगलींची मागणी
मुंबई: कोरोनाने बळी गेलेल्या महाराष्ट्रातील पत्रकारांच्या कुटुंबाला ५० लाखांची आर्थिक मदत करावी, अशी विनंती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि अन्य काही मंत्र्यांना लिहिलेल्या पत्राद्वारे सदर बाबीकडे लक्ष वेधले आहे. कोरोना काळात शासकीय निर्णय असो किंवा मुख्यमंत्री या नात्याने वेळोवेळी जनतेला केलेले संबोधन सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी पत्रकार, कॅमेरामॅन आणि अन्य सहकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे आणि आजही ते एक कर्तव्य अहोरात्र काम करून पार पाडत आहेत.
त्याचप्रमाणे गलगली म्हणतात की, "केंद्र शासनाने दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबाला रुपये पाच लाखाची मदत करण्याची घोषणा केलेली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस खाते, राज्य शासनातील अधिकारी-कर्मचारी यांस जशी ५० लाखांची रक्कम दिली जाणार आहे, त्याच धर्तीवर कोरोनाने बळी गेलेल्या महाराष्ट्रातील पत्रकारांच्या कुटुंबांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी गलगली यांनी केली आहे.