पराभव आणि राजीनामा सत्र
राजकारणानंतर क्रीडा क्षेत्रच अनपेक्षित निकालाचे क्षेत्र असावे आणि त्यानंतर सुरू होणारे राजीनामा सत्र, हे ना राजकारणातल्या लोकांसाठी नवखे आहे, ना क्रीडाक्षेत्रासाठी आणि त्यात नैतिक जबाबदारी वगैरे प्रकार आलेत. सध्या भारतीय क्रीडाप्रेमींचं लक्ष लागलेल्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेला एक वेगळेच वळण आले. अगदी अनपेक्षितरित्या शेवटच्या मिनिटात भारताचा साखळी सामन्यात पराभव झाला आणि साखळी फेरीतच भारतीय संघाला आपला गाशा गुंडाळावा लागला. मात्र, त्यानंतर अपेक्षितरित्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाइन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि हा राजीनामा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) त्वरित स्वीकारलाही. खरंतर एका चांगल्या सुरुवातीनंतर भारताला पूर्व उपांत्य फेरीत पोहोचण्याची खूप चांगली संधी होती. मात्र, स्पर्धेतील अखेरच्या साखळी फेरीत बहारीनकडून धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. सामन्याच्या शेवटच्या मिनिटात पेनल्टीवर गोल स्वीकारत १-० असा पराभव झाल्याने भारताला रिकाम्या हाताने मायदेशी परतावे लागले. मात्र, भारत हा चषक जिंकेल, अशी अपेक्षा कोणाचीच नव्हती, पण भारताची सुरुवात पाहता, जिंकण्याच्या आशा काहीशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, या पराभवानंतर तब्बल चार वर्षे भारतीय फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारलेल्या कॉन्स्टन्टाइन यांनी तडकाफडकी राजीनामा देण्याची गरजही नव्हती. कारणस, कॉन्स्टन्टाइन यांच्या प्रशिक्षकपदाखाली भारताने आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) क्रमवारीत १७३ व्या क्रमांकावरून ९६ व्या स्थानी झेप घेतली होती. यापूर्वी २००२ ते २००५ दरम्यान भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सांभाळणाऱ्या कॉन्स्टन्टाइन यांचा हा प्रशिक्षकपदाचा दुसरा कार्यकाळ होता. खरंतर भारतीय फुटबॉल महासंघाने कॉन्स्टन्टाइन यांची समजूत घालणे गरजेचे होते. कारण, कॉन्स्टन्टाइन यांच्या प्रशिक्षणामुळे भारत येत्या २०२० ऑलिम्पिक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करू शकला असता. मात्र, कर्णधार सुनील छेत्री आणि संघातील काही वरिष्ठ सहकाऱ्यांनी त्यांच्या प्रशिक्षणाच्या पद्धतीबद्दल व्यक्त केलेली नाराजी यामुळे कॉन्स्टन्टाइन यांची उचलबांगडी होणार, अशी चिन्हे दिसत होती. मात्र, आता नवीन प्रशिक्षकाबद्दलची उत्सुकता जास्त वाढली आहे.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात फरार असलेला निलेश चव्हाण याला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे...