डॉ. मुंजे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर : हिंदुत्वाच्या विचारांचे सहप्रवासी

    27-May-2025
Total Views | 40
Dr. Munje and Swatantryaveer Savarkar: Promotors of Hindutva ideas


भारताच्या इतिहासाची, स्वातंत्र्यलढ्याची अनेक सोनेरी पाने लिहिली गेली. यातील दोन महत्त्वाची नावे म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे. सावरकर आणि डॉ. मुंजे यांनी हिंदुत्ववादी विचारसरणीचा पुरस्कार करत, हिंदुत्वासाठी भरीव कामगिरी केली. त्यानिमित्ताने वि. दा. सावरकर आणि डॉ. मुंजे या हिंदुत्वाच्या विचारांच्या सहप्रवासींचे ऋणानुबंध उलगडणारा हा लेख...


भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील द्रष्टे नेते, लोकमान्य टिळकांचे निष्ठावान अनुयायी, हिंदू महासभा आणि भोंसला सैनिकी महाविद्यालयाचे संस्थापक धर्मवीर डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे. डॉ. मुंजे यांचा जन्म छत्तीसगढमधील बिलासपूर येथे दि. 12 डिसेंबर 1872 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बिलासपूर येथे झाले, तर पुढचे शिक्षण रायपूर येथे पूर्ण केले. 1891 साली डॉ. मुंजे मॅट्ट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. तसेच ते रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि विशेषतः संस्कृत विषयात प्रवीण होते. त्यांनी इंग्रजी कवितांचे संस्कृतमध्ये भाषांतरदेखील केले होते. 1893 साली डॉ. मुंजे इंटरमिजिएटची परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. नंतर मुंबईच्या ग्रॅण्ट मेडिकल महाविद्यालयात प्रवेश घेतला. नंतर काही काळ प्लेग प्रतिबंधक खात्यात नोकरीही केली.


पुढे डॉ. मुंजे दक्षिण आफ्रिकेत कोर्स अधिकारी म्हणून गेले होते. तेथेच डॉ. मुंजे यांची महात्मा गांधी यांच्याशी पहिली भेट झाली. तिथून परत आल्यानंतर डॉक्टरांनी नागपूरला दवाखाना सुरू केला. त्यांनी तब्बल 25 वर्षे अभ्यास करून डोळ्यांच्या शस्त्रक्रियेवर संशोधन करून ‘नेत्रचिकित्सा’ हा संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिला.


लोकमान्य टिळक हे डॉ. मुंजे यांचे राजकीय गुरू होते. एकीकडे समाजकार्य चालू असताना त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नागपूरच्या काँग्रेस अधिवेशनात त्यांनी महत्त्वाची भूमिकादेखील बजावली. 1920 साली असहकाराचे पर्व सुरू झाले. गांधीजींच्या असहकार तत्त्वावर डॉ. मुंजे यांचा अजिबात विश्वास नव्हता. गांधींच्या अव्यवहार्य अहिंसा धोरण व खिलाफत आंदोलनातील मुस्लीम तुष्टीकरणाला विरोध करून डॉ. मुंजे यांनी काँग्रेसपासून फारकत घेतली.


1921 साली केरळमध्ये ‘मोपल्यांचे बंड’ झाले. केरळमध्ये मोपल्यांनी केलेल्या हिंदूंवरील अत्याचारानंतर डॉ. मुंजे आणि स्वामी श्रद्धानंद केरळ येथे गेले. त्यांनी या अत्याचाराची संपूर्ण भारतभरात वाचा फोडली. हजारोंच्या संख्येत बळजबरी अथवा मोहाने परधर्मात गेलेल्या आपल्या हिंदू बांधवांना डॉ. मुंजे यांनी स्वधर्मात आणण्याकरिता आपल्या जीवाचे रान केले. मोपल्यांनी केलेल्या बंडापासून डॉक्टरांचे मन हिंदू संघटनेकडे वळू लागले. दि. 11 नोव्हेंबर 1923 रोजी ‘नागपूर हिंदूसभे’ची त्यांनी स्थापना केली. अध्यक्ष राजे लक्ष्मणराव भोसले, सहअध्यक्ष सर गंगाधरराव चिटणीस, उपाध्यक्ष व्यंकटराव गुजर आणि डॉ. मुंजे, सचिव गोपाळराव दळवी, डॉ. हेडगेवार आणि पांडुरंगराव काळे इत्यादी मंडळी या कार्यकारी मंडळात होती.


डॉ. मुंजे अगदी सुरुवातीपासून लष्करी शिक्षणाचे पुरस्कर्ते होते आणि त्याशिवाय देशाला तरणोपाय नाही, असे त्यांचे मत होते. म्हणून त्यांनी नागपूर येथे ‘रायफल असोसिएशन’ काढली आणि पुढे इ. स. 1935 मध्ये डॉ. मुंजे यांनी ‘द सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन’ नावाची संस्था स्थापन करून नाशिकमध्ये ‘भोंसला मिलिटरी स्कूल’ची उभारणी केली. “ही सैनिकी शाळा एकराष्ट्रीयत्व, बंधुभाव उत्पन्न करण्याकरिता, शिस्त, धर्मसंस्कृतीचा गौरव आणि राष्ट्राचा मान यांच्या संरक्षणासाठी स्थापन केली आहे,” असे ते अभिमानाने सांगत. ‘भोंसला मिलिटरी स्कूल’ उभी करणे डॉक्टरांचे स्वप्न होते. डॉक्टरांचे हे स्वप्न आजही दिमाखात सुरू आहे आणि खर्‍या अर्थाने त्यांचे स्मारक कुठे असेल, तर ‘भोंसला मिलिटरी स्कूल’च्या रूपात आहे, असे म्हणायला हरकत नाही.


1937 सालच्या मे महिन्यात सावरकरांची स्थानबद्धतेतून सुटका झाली. त्यांच्या सुटकेनिमित्त ठिकठिकाणी त्यांचे सत्कारही झाले. सावरकरांनी काँग्रेसमध्ये यावे, यासाठी काँग्रेसी मंडळींनी प्रयत्न सुरू केले. तेव्हाच डॉ. मुंजे यांनी ‘अखिल भारतीय हिंदू महासभे’च्या अध्यक्षस्थानी स्वातंत्र्यवीर सावरकरांची निवड केली. या निवडीनंतर स्वातंत्र्यवीरांचे अनेक ठिकाणी सत्कार होत होते. दि. 11 डिसेंबर 1937 रोजी ते नागपूरला आले. नागपूर स्थानकावर सावरकरांना पहिला हार डॉ. मुंजे यांनीच घातला. मुंजेंनी सावरकरांच्या गळ्यात हार घालण्यासाठी हात उंचावले, तोच सावरकरांनी त्यांच्या हातातून हार घेऊन मुंजेंच्याच गळ्यात घातला आणि त्यांच्याविषयीचा आपला आदर व्यक्त केला. मुंजेंनी उलट त्यांना विनम्र नमस्कार केला. त्यादिवशी पाहणार्‍या उपस्थितांचे डोळे पाणवले होते आणि कंठ सद्गतीत झाला होता. ज्यावेळी मुंजेंनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद सावरकरांकडे सोपवले, तेव्हा “सावरकरांकडे नेतृत्व का दिले?” असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यावर डॉ. मुंजे म्हणतात, “आज हिंदूराष्ट्राची जबाबदारी स्वीकारणारा त्यांच्याइतका योग्य माणूस दुसरा कोणी नाही. त्यांच्या ठिकाणी साहस, युक्ती, अन् बुद्धी हे तिन्ही गुण प्रकर्षाने वास करीत आहेत. त्यांच्यासारखे असीम साहसी वीरच देशाला पाहिजेत. या सार्‍यांहूनही त्यांचा सर्वांत मोठा गुण म्हणजे त्यांनी कीर्तीचा मोह झुगारून दिला हा होय. ते काँग्रेसमध्ये गेले असते, तर काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळही त्यांच्या गळ्यात पडती असती. कदाचित ते एखाद्या प्रांताचे मुख्यमंत्रीही झाले असते. जोपर्यंत हिंदू जातीच्या सेवेचे कार्य ते करीत राहतील, तोपर्यंत माझे मस्तक त्यांच्यासमोर विनम्र होईल. माझी सेवा मी त्यांच्या चरणी अर्पण केली आहे. त्यांना अध्यक्षपदी बसवून त्यांच्या कार्यात सर्वतोपरी साहाय्य करण्याची जबाबदारी आम्ही आपल्या शिरावर घेतली आहे.” डॉक्टरांचा द्रष्टेपणा आणि त्यांची ही निवड किती सार्थ होती, हे आपल्याला दिसून आलेच!


नागपूरला 1928 साली हिंदू युवक सभेचे तिसरे अधिवेशन झाले. डॉ. मुंजे या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष होते. या अधिवेशनात अनेक ठराव पास झाले, त्या ठरावांबरोबरच भागानगर निःशस्त्र प्रतिकाराची घोषणा स्वातंत्र्यवीरांनी केली आणि तेथील हिंदूंच्या साहाय्यासाठी चळवळ करण्याचा ठराव पास केला. शाळांमधून लष्करी शिक्षण देण्यात यावे, असाही एक ठराव डॉ. मुंजे यांनी मांडला आणि तोही पास झाला. या निःशस्त्र लढ्यासाठी सर्वत्र युद्ध मंडळे स्थापन झाली. ठिकठिकाणी समित्या स्थापन झाल्या. हैदराबाद संस्थानात हिंदूंचा अनन्वित, बेसुमार छळ होत असे. तेथील हिंदूंनी आपल्या न्याय मागण्या वारंवार केल्या. पण, निजाम सरकारने त्या वारंवार झिडकारल्यामुळे त्यांना सविनय कायदेभंगाचा मार्ग पत्करणे भाग पडले. प्रतिकारकांची पहिली तुकडी दि. 5 फेब्रुवारी रोजी गेली. या चळवळीत लाखोंच्या संख्येने हिंदूंनी सहभागी होऊन निजाम तुरुंगात कारावास पत्करला आणि आपल्या साहसाचा, रक्ताचा जिवंतपणा सिद्ध केला. “हिंदूंना निजामशाहीत पूर्ण हक्क मिळाल्याशिवाय ही चळवळ बंद होणार नाही,” असे सावरकरांनी जाहीर केले. प्रतिकारकांवर खटले झाले, शिक्षा झाल्या. अखेर निजामशाहीतील हिंदूंना धार्मिक बाबतीत स्वातंत्र्य आणि सभा स्वातंत्र्य देण्यात आल्याचे निजामाकडून घोषित करण्यात आले आणि हिंदू महासभेने प्रतिकाराची ही मोहीम तात्पुरती बंद केली.


1941 सालचे हिंदू महासभेचे अधिवेशन बिहार प्रांतात घेण्याचे ठरले होते. परंतु, ऐनवेळी हे अधिवेशन ईदच्या सणाजवळ होत असल्यामुळे दंगा होण्याची शक्यता म्हणून बिहार सरकारने दि. 1 डिसेंबर 1941 ते दि. 4 जानेवारी 1942 रोजीपर्यंत म्हणजे जवळजवळ महिनाभराच्यावर अधिवेशन भरवू नये, म्हणून बंदी हुकूम काढला. भागलपूर येथे ‘कलम 144’ लागू करून जमावबंदी घातली. ईदच्या कारणाने आडकाठी राहू नये म्हणून तडजोडीच्या दृष्टीने हिंदू सभेच्या कार्यकारी समितीने अधिवेशनाची तारीख ईदच्या चार दिवस आधी ठरवले. पण, तरीही बिहार सरकारचे विरोधाचे धोरण कायम होते. त्यांनी भागलपूरला झडत्यांचे सत्र सुरू ठेवले. कागदपत्रे जप्त केली. हिंदू सभेच्या अधिकार्‍यांनाच पकडले. अखिल हिंदूंच्या स्वाभिमानाला, सन्मानाला डिवचण्याचा प्रकार केला. हिंदू समाजाच्या आणि सर्वसामान्य नागरिकत्वाच्या मूलभूत हक्कावर हा घाला होता. म्हणून हिंदू समाजाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी हिंदू सभेने सरकारच्या अन्याय धोरणाचा प्रतिकार करण्याचे ठरवले. हिंदुस्थानातील सर्वच पक्षांनी यावेळी हिंदू महासभेला एकमुखी पाठिंबा दिला.


अधिवेशन दि. 24 ते दि. 27 डिसेंबर रोजी ठरले होते. परंतु, त्या आधीच आठ दिवस बिहार सरकारने अधिवेशनाचे मंडप पोलिसांनी मोडून-तोडून फेकून दिले. भागलपूरकडे येणार्‍यांची धरपकड सुरू केली. अधिवेशनाचे ठिकाण लजपतराय उद्यानाला सशस्त्र पोलिसांनी वेढा दिला. अधिवेशनाचे अध्यक्ष सावरकरांना दि. 24 रोजी गया स्थानकावर आणि डॉ. मुंजेंना भागलपूरपासून 16 मैलांवरील कोलगंज स्थानकावर अटक झाली. हे अटकसत्र दि. 25 रोजीपर्यंत चालले. या अटकसत्रामुळे तुरुंग भरून गेले. तेव्हा पकडलेल्या लोकांना मारझोड करून पोलीस सोडून देऊ लागले. सुटलेल्या लोकांनी नियोजित जागी भगवे ध्वज फडकावले. संपूर्ण भागलपूर शहरच अधिवेशनाचा मंडप म्हणून घराघरावर ध्वज फडकत होता. ‘हिंदू महासभा की जय’ आणि ‘स्वातंत्र्यवीर सावरकर की जय’ या घोषणांनी सर्व परिसर दुमदुमून गेला. एका धर्मशाळेच्या परिसरात हजारो लोकांच्या उपस्थितीत ग. वि. केतकर यांच्या अध्यक्षतेखाली बाळशास्त्री हरदास यांनी सावरकरांचे अध्यक्षीय भाषण वाचून दाखवले. अधिवेशनाचा पूर्वसंकल्पित ठराव तर पास झालाच. इकडे तुरुंगात असलेल्या लोकांनी डॉ. मुंजे यांना अध्यक्ष नेमून अधिवेशन घेतले. बिहार सरकारचा सर्वत्र धिक्कार झाला. हिंदू महासभेची कीर्ती अधिकच वाढली.


दि. 5 जानेवारी रोजी सारे बंदी सुटले. अधिवेशनाहून परतलेल्या वीरांच्या सत्कारार्थ सभा झाल्या. डॉ. मुंजे यांचादेखील सत्कार करण्यात आला. यावेळी डॉक्टरांनी आपल्या भाषणातून हिंदूंनी बहुसंख्येने सैन्यात शिरावे असा आदेश दिला आणि ते म्हणाले, “चालू महायुद्धाने आपणाला आत्मरक्षणार्थ राष्ट्राच्या सैनिकीकरणाचे हिंदू महासभेचे धोरणच बरोबर आहे, हे सिद्ध करून दिले आहे. ‘ज्याची फौज त्याचेच राज्य, त्याचीच सत्ता’ हेच तत्त्व खरे आहे. म्हणून हिंदुस्थानच्या 12 लक्ष फौजेत नऊ लक्ष हिंदूंची भरती झाली पाहिजे. अशा रीतीने हिंदू महासभेने दाखवून दिले की, न्याय हक्कासाठी हिंदू बांधव एकत्र येऊ शकतो. बिकट परिस्थितीला सामोरा जाऊ शकतो.”


स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. मुंजे यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत हिंदुत्वाच्या विचारांचा वसा घेत, अनेक लोकोपयोगी, हिंदू हितरक्षणासाठी हिंदू महासभेच्यावतीने आणि स्वतंत्र्यरित्यादेखील विविध कामे केली. म्हणूनच डॉ. बा. शि. मुंजे यांना ‘धर्मवीर’ म्हणून संबोधले गेले. राजकारणाच्या पलीकडे जात राष्ट्रउभारणीसाठी महत्त्वाचे आणि मोलाचे योगदान डॉक्टरांनी आणि स्वातंत्र्यवीरांनी दिले आहे. त्यांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे उजळत आहे. अशा या हिंदुत्वाच्या सहप्रवासी धर्मवीरांना आणि स्वातंत्र्यवीरांना कोटी कोटी प्रणाम!!


संदर्भ :


धर्मवीर डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे चरित्र - खंड 1 आणि खंड 2, लाखे प्रकाशन, लेखक-बाळशास्त्री हरदास आणि श्रीमती वीणा बाळशास्त्री हरदास


- अश्विनी भालेराव
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121